धनगर समाजात जन्माला आलेली एकाच मातेची अर्थातच अहिल्याईची आम्ही लेकरं आज पोटजातीच्या विळख्यात अडकून बसलोय म्हणूनच माझा धनगर समाज इतरांपेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहे असे म्हणायला काही वावगं वाटणार नाही. आज कोणी म्हणतो मी हटकर, कोणी म्हणतो मी खूटेकर, कोणी म्हणतो झेंडे धनगर, तर कोणी म्हणतो बंडे धनगर, कोणी म्हणतो अहिर, तर कोणी म्हणतो डंगे धनगर, कोणी म्हणतो अमुक धनगर तर कोणी म्हणतो तमूक धनगर. अशा रीतीने प्रत्येकाने व्यवसायनुरूप, कुळानुरूप आणि कर्तव्याच्या आधारावर पोटजाती वाटून घेतल्या आणि एकत्रित गुण्यागोविंदाने जगणाऱ्या माझ्या धनगर समाजाचे विभाजन केले. अरे नुसतेच विभाजन केले नाही तर पार वाटोळे केले माझ्या धनगर समाजाचे, पण आजच्या सुशिक्षित युवा वर्गाने तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. असाच पोटजातींचा डंका मिरवत बसला तर आरक्षणाची अंमलबजावणी दुरच सोडा ज्या ज्या वेळी समाजातील आपल्याच आई-बहिणींवरती अन्याय अत्याचार होईल त्या त्या वेळी पोटजातीच्या अहंकाराने माजलेली आपलीच माणसं मदतीला धावून येणार नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.
एकाच रक्ताच्या आम्ही औलादी अर्थातच मल्हारबांचे मावळे, लोककल्याणकारी रणरागिणी महाराणी अहिल्याईची आम्ही लेकरं, अद्वितीय महाराजा भारताचा नेपोलीयन बोनापार्ट म्हणून अख्खं जग ज्यांना ओळखते त्या राजे यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार आज पोटजातीच्या नावाखाली वेगवेगळे बस्तान बसवतोय अन् प्रस्तापित जातींना डोक्यावर घेऊन मिरवतोय कीती दुर्दैव आमचे... जेवढे धनगर म्हणून जगाल आणि धनगर म्हणूनच एकत्रित याल तरच आपले हक्क/अधिकार आपण हिसकावून घेऊ शकतो पण पोटजातींचा स्वाभिमान बाळगून आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे बोंबलत बसला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही उलट धनगर समाज अजून जास्तच पोटजातीत विभागला जाईल आणि एकदा का धनगर समाज विभागला गेला तर या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतात सनातनी विचारांनी बरबटलेली आणि ज्यांनी धनगर समाजाला आजपर्यंत अंधारात ठेवले होते अशी प्रस्तापित पिलावळ एकेकाळी राजा समाज असणाऱ्या जमातीवर राज्यकारभार करायला एकहाती मोकळी होइल याचा विचार माझ्या धनगर समाजातील तरुण बांधवानी करावा.
आज समाजात विवाह असो अथवा कोणताही कार्यक्रम सोहळा असो जिथे तिथे पोटजातींचेच साखळदंड आडवे येताहेत मग पोटजातींचा अहंकार बाळगणारे धनगर कसले? असाच प्रश्न मला पडतो. होळकर(विरकर)-शिंदे यांचा हकटर-खुटेकर मधील रोटी बेटी व्यवहार, तद्नंतर अहिल्याईंनी मुक्ताचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी करुन दिला होता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर यांच्यातील भोसले-होळकर कुटुंबात झालेला रोटी-बेटी व्यवहार आजही चालत आहे मग त्याच माझ्या धनगर समाजात आज आम्हाला पोटजातींचा अडथळा कशासाठी?? जर तसे असेल तर धनगर समाजबांधवांनो ज्यांना ज्यांना पोटजातीला प्राधान्य द्यायचे असेल, पोटजातींचा डंका मिरवायचा असेल अथवा पोटजातींचाच उदोउदो करायचा असेल तर धनगर जमातीच्या प्रमाणपत्राऐवजी त्या त्या पोटजातींचीच प्रमाणपत्रे घ्या अन् स्वताला धनगर म्हणवून घेऊ नका.
एक कट्टर धनगर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
No comments:
Post a Comment