Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 14 November 2019

वासुदेव आला हो वासुदेव आला... ✍️नितीनराजे अनुसे


समाजाच्या भल्यासाठी जय मल्हार बोला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

जागा हो धनगरा, आता संधी ही अनमोल।
तुझ्या प्रगतीला पूर्वजांच्या इतिहासाचं रं मोल।।
मनगटाच्या जोरावर कसा इतिहास घडविला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

अंधारल्या दाही दिशा, गोंधळला समाज।
घालूनि झडप, धावून येते हो सावज।।
समाजाच्या हाती आता ज्ञानरूपी कंदील दिला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

अज्ञानाचं लक्षण, आलंय समाजाच्या नशिबी।
समतेचे गणित सारं झालंय बेहिशोबी।।
आजपर्यंत धनगरांचा नुसता वापरच झाला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

धनगर जमात, तशी आहे इमानदार।
आजपर्यंत दुसऱ्यांचीच भरली हो घरं।।
बुद्धिजीवी वर्ग आतातरी शहाणा झाला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

नेत्यांच्या अहंकारातून झाली समाजाची दशा।
द्यावी म्हणतोय आता पुन्हा एक नवी दिशा।
क्रांतीच्या मशाली इथूनच पेटवायला आला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

समाजाच्या भल्यासाठी जय मल्हार बोला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
            ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday 6 November 2019

आक्रोश मेंढपाळांचा... ✍️नितीनराजे अनुसे

 

         खरंतर नैसर्गिक आपत्ती कधी कोणाला सांगून येत नाही तर धुडगूस घालून निघून गेल्यावर नैसर्गिक आपत्ती आल्याचे समजते. या घटना घडू नयेत आणि घडल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)ची स्थापना करण्यात आली आहे. एकूण ११ ठिकाणी  बीएसएफ (BSF), सीआरपीएफ(CRPF), सीआयएसएफ(CISF), आणि आयटीबीपी (ITBP) यांच्या टीम आहेत. महाराष्ट्र राज्यात पुणे येथे तळेगाव जवळ सीआरपीएफ ची National Disaster Responce Force म्हणून टीम काम करते तर विदर्भातील नागपूर येथे National Disaster Management Training Institute आहे. ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या अखत्यारीत येणारी एनडीआरएफ ची टीम धावून येते. हे खरंतर सर्वांना माहीत असावे म्हणून लिहिले आहे. महाराष्ट्र राज्यात कितीतरी वेळा नद्यांना पुर येऊन गेला, भूकंप झाले, कधी मानवीकृत आपत्ती आली तर कधी नैसर्गिक परंतु अशा आपत्ती मध्ये श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्यांना काही फरक पडत नाही तर फरक त्यांना पडतो ज्यांचा संसार हातावर चालतो. म्हणजे कष्ट केल्यानंतरच एक वेळची भाकरी ज्यांच्या नशिबी असते त्याच संसाराला हातावर चालणारा संसार म्हंटलं जातं. प्रामुख्याने इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या, सत्ताधाऱ्यांच्या कृपेने देशोधडीला लागलेला शेतकरी, एकवेळच्या अर्ध्या-कोर भाकरीच्या तुकड्यासाठी मिळेल ते काम करणारा गोरगरीब मजूर/कामगार आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात वणवण भटकणारा मेंढपाळ यांचे संसार हे हातावरती चालणाऱ्या संसारापैकी आहेत.

         अशाच हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ कुटूंबांवरती नैसर्गिक आपत्तीने घाला घातला आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील गणेशपुर, लाखनवाडा, हिवरखेड या भागातील मेंढपाळ बांधवांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. एकीकडे प्रशासन व्यवस्था ही शेतीचे पंचनामे करण्यात व्यस्त आहे तर दुसऱ्या बाजूला मेंढपाळांवरती संकट आ वासून उभे राहिले आहे. आज इथे तर उद्या तिथे अशी भटकंती करत जीवन जगणारे मेंढपाळ बांधव हे फिरस्ते आहेत घरदार सोडून ते भटकंती करत असतात. चाऱ्याच्या शोधात ते सतत भटकत असतात त्यातूनच त्यांच्या पोटाची खळगी भरली जातात, लेकरांबाळांचे शिक्षण सुद्धा याच व्यवसायावर अवलंबून आहे. त्या भागात सततच्या पावसाने झालेल्या चिखलातून मेंढ्यांना चालणं तर मुश्कील झालेच होते त्यात पाऊस पडत असताना चारा न मिळाल्याने शेकडोंच्या वरती मेंढ्या उपासमारीने मेल्या तर पोटात अन्नाचा कण नसलेल्या मेंढ्या मुसळधार पावसातून वाहून सुद्धा गेल्या. ज्यांच्या जीवावर पोट भरायचं त्याच मेंढ्या डोळ्यासमोर तडफडून मरून जात असतील आणि शेकडो मेंढ्या वाहून जात असतील तर खरोखरच मेल्याहून मेल्यासारखे आहे. त्यांच्यासाठी कोणती एनडीआरएफ टीम धावून येऊ शकत नाही आणि नाही त्यावरती कोणते व्यवस्थापन...  कारण काही टग्यांच्या (ज्यांना धनगरांनी बहुमताने निवडून दिले अशा मस्तावलेल्या नेत्यांच्या) मते ती कोंबड्या-गाढवे-कुत्री आहेत म्हणूनच की काय जवळच्याच नागपूरच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण विभागाला सुद्धा जाग आली नसावी हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल. तरीही सुशिक्षित मेंढपाळ आनंद कोकरे यांचे सहकारी मेंढपाळपुत्र आंदोलनातील लढवय्ये आमचे मित्र सौरभ हटकर, डॉ. संतोष हटकर शिवाय अन्य सुशिक्षित मेंढपाळपुत्रांनी मेंढपाळांच्या हाकेला  धावून जात घटनास्थळी पोहचून संबंधित मेंढपाळ बांधवांना आधार दिला आहे, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सद्यस्थितीचा आढावा दिला आणि पंचनामे करून घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यांच्याच माध्यमातून शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष ना.बाळासाहेब दोडताले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पिडीत मेंढपाळ बांधवांना दिलासा दिला. त्याबद्दल या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत...

      असो याच धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे ही प्रस्थापित नेत्यांनी, सरकारने स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून लवासा सारखी सिमेटची जंगले वसवली आहेत, कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणाऱ्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणाऱ्या, एका धनगर समाजातील मंत्र्याचा पराभव केला म्हणून ३०-३० जेसीबी मधून गुलाल उधळणाऱ्यांनी आणि त्याच्या घरातील राज्यकर्त्यांनी पूर्वीच लक्ष घातले असते तर आज धनगर समाजावर ही वेळ आलीच नसती, धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणाऱ्या आणि झगडणाऱ्या भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना अशा नैसर्गिक तथा मानवीकृत आपत्तीमध्ये नुकसान भरपाई म्हणून थोडाफार का होईना मदतीचा हात द्यावा, प्रशासनाच्या वतीने जेवढा निधी उपलब्ध करता येईल त्यासाठी प्रयत्न करावेत शिवाय शेळ्या-मेंढ्यासाठी चराऊ कुरणे राखीव केली आणि मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
     एक मेंढपाळपुत्र...
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123

Saturday 26 October 2019

धनगरांनो आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा : नितीनराजे अनुसे



       भारत हा तसा सर्वात मोठी लोकशाही असलेला लोकशाही प्रदान देश आहे. हे आजपर्यंत नागरिकशास्त्रात वाचायला भेटायचे परंतु खरंतर लोकशाही (?) म्हटलं की आता प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. खरंच इथे लोकशाही आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले, मतदानाचा अधिकार दिला परंतु आम्हाला त्याचा योग्य वापरच करता येत नसेल तर त्या व्यक्तिस्वातंत्र्याला आणि मतदानाच्या दिलेल्या अधिकाराला अर्थच काय उरतो बरे?
       असो आता थोडसं मी माझ्या धनगर समाजाकडे वळतो. कदाचित काहीजण मला जातीयवादी म्हणतील सुद्धा... पण हरकत नसावी कारण या भारत देशात मला कळतंय असे जातपात विरहित आणि धर्मनिरपेक्ष पणे राज्यकारभार चाललेला कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे मला जातीयवादी म्हणणारे अगोदरच जातीयवादी असतील त्यात तीळमात्र शंका नसेल. एकेकाळी राजा समाज असणाऱ्या या धनगर जमातीने आज स्वतःचीच अवस्था काय करून ठेवली आहे ते लोकसभा आणि विधानसभेच्या निकालातून स्पष्ट दिसून आलेच असेल. इ.स.च्या पूर्वीपासून या धनगर जमातीने हिंदुस्थानच नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावर जवळपास १८०० वर्षे राज्यकारभार केला होता. त्यावेळची सत्ताधारी आणि शक्तिशाली असलेली ही धनगर जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत बसली आहे यापेक्षा सर्वात मोठे दुर्दैव काहीच नसावे.
       जेव्हा बापूसाहेब कोकरे अर्थातच धनगरांचा क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब नावाचे वादळ महाराष्ट्र राज्यात घोंघावत होते. तेव्हा त्या माणसाने स्वतःच्या घरादाराची राखरांगोळी करून यशवंत सेना स्थापन केली आणि त्या माध्यमातून बी.के.कोकरे साहेब महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागे करत होते तेव्हा एका माजी मुख्यमंत्र्याला भरसभेतून सांगावे लागले की "बाबांनो या महाराष्ट्र राज्यातील जो धनगर समाज आहे तो धनगर समाज शांत निपचित झोपला आहे. त्या समाजाला तसेच झोपू द्या, हवं तर एकाऐवजी दोन दोन घोंगडी टाकून तसेच झोपी घाला. नाहीतर तो धनगर समाज जर जागा झाला आणि राजकारणात/सत्ताकारणात येऊ लागला तर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना राजकारण करता येणार नाही." त्या गुरूचे शब्द शिष्याने नीट ध्यानात ठेवले आणि पहिला बळी घेतला तो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांचा... प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एखाद्या समाजाला अजून ४०-५० वर्ष मागे फेकायचे असेल तर त्या समाजाच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे आणि नेतृत्व संपवायचे ही चाणक्य नीती नव्हे तर पवार नीती आहे. असे इतिहासातील कितीतरी दाखले देता येतील. त्यातीलच एक म्हणजे खुद्द चाणक्याने चंद्रगुप्त मौर्य यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मगधचा राजा धनानंदाचा नाश केला. आजही महाराष्ट्र राज्यातील चाणक्याच्या वारसदारांनी धनगरांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून धनगरांचेच नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला तो तर उघडच आहे.
         खरंतर आम्ही अभिमानाने सांगतो की कधीकाळी अर्धा संसार घोड्याच्या पाठीवर लादलेल्या त्या घोड्याचा लगाम हातात धरून आई-बापासोबत माळराने, दगडधोंडे तुडवत, काट्याकुट्यातून अनवाणी पायाने वाट काढत चालणारी धनगर समाजातील युवा पिढी शिकली/सवरली आहे तीच युवा पिढी आज समाजाला आंधकारातून आणि अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढेल. परंतु तसे झाले नाही उलट त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दोन-चार शब्द शिकायला शाळेत पाठवणाऱ्या त्या आई-बापाचा विश्वासघात झाला आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. अरे ज्या बापाने पायाच्या नडग्या वाळवत माळरानं तुडवली, जो पहाडासारखा शेळ्या-मेंढ्यामागे उभा राहिला. ऊन पाहिले नाही, वारा पाहिला नाही ना पाऊस... धो धो कोसळणाऱ्या पावसात सुद्धा तो उभा राहून मेंढ्या राखत होता तो दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नव्हे तर माझा पोरगा शिकला तर सावलीतली ती पण खुर्चीवरची नोकरी करून आम्हाला सुख लावेल म्हणून... भरपावसात त्या बापाने घेतला असता थोडासा अडोसा आणि घेता ही आला असता, झोपला असता डेरेदार वृक्षाच्या सावलीखाली शांत निपचित पण काय करणार एखादा गावगुंड आला तर कोकरू उचलून घेऊन जाइल, एखादा लांडगा आला तर मेंढरू पळवून घेऊन जाइल मग मी माझ्या पोराला शिकवायचा कसा? त्याला अधिकारी बनवायचा कसा? पोरीचं लग्न करायचं कसं? हा विचार करत करत पोटाच्या तुंबड्या भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, जिथे रात्र होईल तिथे तीन दगडाच्या चुलीवर स्वयपाक करून अर्धीकोर खाऊन जमिनीचे अंथरूण आणि आकाशाचं पाघरून करून दगड उशाला घेऊन झोपणारे व पाऊस आला तर भरपावसात चवढ्यावर बसून रात्र रात्र काढणारे आई-बाप आमच्या समाजातील पोरांना आठवले नाहीत मात्र पुढच्या सात पिढ्या राजकारणातून बरबाद होऊ नयेत म्हणून एकदाच पावसात भिजत भाषण ठोकणारे शरद पवार त्या पोरांना बाप वाटले. इथंच आमच्या पोरांच्या शिक्षणाचा आणि त्यांनी शिक्षण घेऊन प्रगती करावी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, त्यांच्यासाठी भर उन्हातान्हात, भर पावसात ठेचा खाणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचा पार सत्यानाश झाला.
          समाजाला काय हवं आहे आणि काय दिले आहे प्रस्थापित नेत्यांनी? याचा आम्ही कधी विचार केलाच नाही ना...? कदाचित करणार पण नाही कारण आम्ही आमची बुद्धी दुसऱ्यांच्या बुटाखाली गहाण ठेवली आहे. म्हणूनच... या महाराष्ट्र राज्यात कोपर्डी मध्ये ज्या बहिणीची हत्या झाली तिच्या समर्थनार्थ प्रत्येक जिल्ह्यातून क्रांती मोर्चा, मूक मोर्चा निघाला त्या कोपर्डी घटनेचा निषेध आम्हीही केला, आमचेही धनगर समाजबांधव त्यात सहभागी झाले. कारण विषय माणूसकीच्या नात्याचा आणि कोपर्डीच्या बहिणीचा होता. मग पुरंदर येथे आमच्या मेंढपाळांच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा कोणी साधा निषेधही करत नाही. तेव्हा कुठे जाते माणूसकी? तेव्हा कुठे असतात पावसात चिंब भिजून मजा घेत भाषण करणारे नेते? कुठे असतात जिजाऊंच्या लेकी? ज्या लोकसभा मतदारसंघात ती घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार सुप्रिया सुळे कुठे होती? एक स्त्री असूनसुद्धा ती कधी विचारायला तरी तिथपर्यंत गेली का? धनगर नेत्यांच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणी मॉसाहेबा जिजाऊचा शिवबा तिथे गेलाच नाही, नाही शिवबाचा मावळा तिथे पोहचला. मग त्या पिडीतांना कोण कोण भेटायला गेले होते, ज्या मेंढपाळांना मारहाण झाली त्यांना कोणी भेटी दिल्या? ज्यांच्या मेंढ्या कोणी उचलून नेल्या होत्या त्यांच्या मेंढ्या कोणामुळे परत मिळाल्या? कोण कोण मुंबईच्या विधनभवनात घुसून पुरंदरच्या ताईला न्याय मागत होते, कोणा-कोणावरती त्यासंदर्भात केसेस झाल्या ते बातम्या काढून बघा,  मग विचार करा धनगर नेत्यांव्यतिरीक्त कोणी केसेस घ्यायला का नाही आला? ज्यांच्यावर केसेस झाल्या त्या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करून सांगितले होते की बाबांनो धनगरांचे राजकीय आस्तित्व धोक्यात आहे त्यामुळे धनगर उमेदवारांना निवडून आणा... मग कितीजणांनी त्याचे आचरण केले? का त्यांनीच काय मक्ता घेतलाय का? घरात बसून सोशल मीडियावर गप्पा मारायला कोणालाही आणि खूप जमतं पण... ग्राउंड लेव्हलला कधी तुम्ही संघर्ष केला आहे का? जो धनगर समाजातील प्रत्येक नेत्यांनी केला आहे. कोणी मदतीला आला नाही कोणी निषेध करायलाही आला नाही तरीसुद्धा त्या धनगर नेत्यांनी घातलेली बिरोबाची शपथ तुम्हाला आठवते पण धनगर समाजाचं वाटोळं ज्या प्रस्थापितांनी केले तेच तुम्हाला बाप वाटतात वाह! रे पोट्टे हो... आणि पुन्हा सांगत बसता बिरोबाने कोप केला म्हणून...? तुमच्या लाचारीचे, तुमच्या उचलेगिरीचे, अन्याय अत्याचार सहन करण्याचे बिरोबाला तरी चांगले वाटते का? पण काय बिरोबाच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहचलेले धनगर नेते दिसत नाहीत, बिरोबाच्या रूपाने विधानभवनात घुसून न्यायासाठी घोषणा केलेले महाराष्ट्र यशवंत सेनेचे मावळे कदाचित दिसले नसतील. कारण त्या पुरंदरच्या घटनेतील ती बहिण आम्हाला आमची कधी दिसलीच नाही पण तेव्हा नक्कीच दिसेल जेव्हा तुमच्या-आमच्या पैकी स्वतःची बहिण तीच्या जागी असेल... तेव्हा धनगर नेत्यांच्या नावाने खडे फोडू नका म्हणजे झालं. परंतु इथून पुढच्या काळात एखाद्या मेंढपाळाची मेंढरं एखाद्याच्या शेतात गेली तर मारहाण झाल्यावर मुडदे जरी पडले तर कोण येणार आहे का विचारायला? तुमच्या-आमच्या आई-बहिणींची जरी अबू लुटली तर कोण येणार आहे का वाचवायला? तुमच्या जमिनी लुबाडल्या नरडीवरुन फासाचा नांगर जरी चढवला तर आता कोण आहे का तुम्हाला विचारायला? एकवेळ अशी होती जेव्हा ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेवजी जानकर साहेब मंत्री होते तेव्हा मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांच्या ऑफिसमधून फोन करायला लावले होते. पण आता अशा घटना घडल्यानंतर सांगायचे कोणाला? बोलायचे कोणाला? पावसात भिजत भाषण ठोकणाऱ्यां त्या बापाला धनगरांची एवढी काळजी असती तर स्वतःच्या पोरीला पुरंदरच्या त्या आमच्या ताईची विचारपूस पाठवले नसते का?
         दोन-चार शब्द लिहायला वाचायला शिकला, पुण्या-मुंबई सारख्या शहरात राहिला, दोन-चार रूपडं कमवायला लागला म्हणजे तुम्हाला फार मोठी अक्कल यायला लागली असे होत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असला तरी ५ वरून १ वरती येणे म्हणजे परिवर्तन नव्हे तर राजकारणापासून परावर्तन होय. राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने जाऊ द्यायचे असते भले ते भावनिकतेवरती चालत नसते हे जरी मान्य असले तरी प्रस्थापितांच्या गुलामगीरीचं ओझं कधीपर्यंत वाहायचं, अन्याय अत्याचाराच्या रहाटगाडग्यात कधीपर्यंत पिचत राहायचे? हे जर समजत नसेल तर त्या शिक्षणाचा काय अर्थ? जे शिक्षण आई-वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्हा-आम्हाला दिले. इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजातील नेतृत्व संपवण्यासाठी चंग बांधून बसली होती हे सर्वज्ञात असताना आपल्याच समाजातील खुळचट मंडळी स्वतःचाच आणि स्वतःच्या समाजाचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत बसत असतील तर धनगर समाजाचे २०१४ ला ५ आमदार विधानसभेत गेले होते त्यावरून ते २०१९ ला १ वरतीच येणार आणि हे असेच जर चालत राहिले तर २०२४ ला इतिहासात जमा होणार. राजकारणाच्या चाली एकट्या पवारांनी अथवा पेशव्यांच्या औलादींनी खेळाव्या असे नाही तर धनगर समाजाचा एखादा नेता अशी चाल खेळला तर भावनिक व्हायचे नसते. वस्तुस्थिती अशी आहे की धनगर
नेत्याचे आपणच असे खच्चीकरण करत असतो की शरद पवारांची आणि ब्राह्मणांची चाणक्य नीती आपल्यावर कधी लागू झाली तेच कळत नाही. कारण आम्ही अभ्यास करत नाही, इतिहास वाचत नाही. फक्त तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे होतो आणि निकाल हाती आल्यावर त्याच धनगर नेत्यांच्या नावाने तुणतुणे वाजवत बसतो हीच का आमची राजकीय प्रगल्भता? हीच का आमची सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता? यास नेते सुध्दा अपवाद नाहीत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत जेवढा समाज जबाबदार आहे... एखादा सांगायला गेला तर तो फार शहाणा वाटतो परंतु जो सांगतोय तो अभ्यास करूनच विचार करूनच सांगतोय याकडे लक्ष नसते. फक्त अहंकार नसानसात ठासून भरलेला असतो. आणि तोच अहंकार आज धनगर समाजाचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसलाय.
         खरंतर संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधी संपत नाही. जरी धनगर समाजातील नेते निवडणुकीत पडले असतील पण ते हरले नाहीत आणि हरणार सुद्धा नाहीत. खरंतर प्रस्थापितांच्या पवार नीतीमुळे नेत्यांचेच नाही तर अखंड धनगर समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे हे जर शिकलेल्या सवरलेल्या युवा पिढीला कळत नसेल, अन्यायची चीड येत नसेल तर काबाडकष्ट करून, भटकंती करण्यासाठी गेल्यावर शेतकऱ्यांच्या शिव्याशाप खाऊन तुम्हा-आम्हाला शहाणपण यावं म्हणून शिकवणाऱ्या आई-बापाचं कष्ट हे निरर्थक म्हणावे लागेल. जर समाजाचा विकास करायचा असेल/प्रगतीपथावर जायचे असेल तर समाजाला राजकारणाशिवाय दुसरा तिसरा कोणताही मार्ग नाही. अजून कधीपर्यंत झोपेचं सोंग घेऊन बसणार आहात? अजून कधीपर्यंत अन्याय सहन करणार आहात? आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा आणि घोंगड्याची ताकद दाखवून द्या. त्यासाठी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवूनच एक व्हा, नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     ✍️️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123

Saturday 19 October 2019

समाजाने सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता जोपासावी : ✍️नितीनराजे अनुसे



          राजसत्ता आणि राजपथ कधी मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्त्व आदरणीय ना.महादेवजी जानकर साहेब आजही सांगतात.  शिवाय राजकारण हा विकासापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग आहे असे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. *आजच्या राजकारणात समाजकारणात तुमच्या-आमच्या सारख्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या व्यक्तिंमुळे आणि सहकार्यामुळे समाजातून अशी कितीतरी नवनविन नेतृत्वं घडत असतात तयार होत असतात.* अपवादात्मक काहीजण त्याचा गैरवापर करून स्वताची घरं भरत असतात म्हणून त्याचा दोष उर्वरित इतरांना देऊन चालत नाही अथवा सत्तेचा वापर केवळ जनतेच्या विकासासाठीच करणारे नेतृत्व खोडून चालणार नाही कारण ते नेतृत्व घडण्यासाठी फार मोठा संघर्ष केलेला असतो फार मोठा लढा दिलेला असतो. प्रस्तापितांकडून होणाऱ्या त्रासाला न जुमानता नजरेस नजर मिळवून छातीठोकपणे त्यांच्या विरोधत त्यांच्या नाकात दम ठोकून तयार झालेली नेतृत्व सहजासहजी मिळत नाहीत. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठीचा लढा अर्थातच धनगर समाजाचा जीवनमरणाचा, आत्मियतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सर्वजण आपापल्या परीने वेगवेगळ्या मार्गाने लढा उभारत आहोत. मग रस्त्यावरची लढाई असो अथवा ती न्यायालयीन लढाई असो. असे असताना आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये सर्वच पक्षातून तर कोणी अपक्ष मधून धनगर समाजाचे उमेद्वार जय्यत तयारी करून मैदानात उतरले आहेत. अर्थातच सामाजिक प्रबोधनातून जनजागृतीतून समाजात हळूहळू परिवर्तन होत चालल्यामुळे पुर्वीपेक्षा राजकारणात आणि समाजकारणात धनगर समाजाचा टक्का वाढतोय हे कोणीही नाकारू शकत नाही. पण एवढ्यावरच आपल्याला थांबून चालणार नाही तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर जास्तीत जास्त उमेद्वार पाठवल्यानंतर विधानसभा/विधानपरिषद आणि लोकसभा/ राज्यसभा यांसारख्या ठिकाणी धनगर समाजाची माणसं पोहचणे आवश्यक आहे जेथून जनतेच्या विकासाच्या चाव्या फिरवल्या जातात. ज्याठिकाणी कायदे बनवले जातात त्याठिकाणी आपली माणसं असायला हवीत आणि ती काय सहजासहजी तयार होत नाहीत ते नेतृत्व घडावयास फार काळ लागतो मग *विधानसभेच्या निवडणूकांमधून आपल्याच माणसांना पाडायचा विचार करत असाल तर महाराष्ट्र राज्यातून परिणामी भारत देशातून कित्येक नेतृत्व उभे करायच्या ऐवजी जर ते खोडायचंच काम करणार असाल तर मग कशाला हवंय समाजप्रबोधन? कशाला पाहिजे समाजजागृती?? कशाला पाहिजे समाजाला सत्तेत वाटा?? जे आजपर्यंत पुर्वीपासून चालत आले आहे तेच चालुद्या ना मग...* आम्ही पाठीमागे आहोत आमचा समाज पाठीमागे आहे, आमचा विकास होत नाही, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत आजपर्यंत धनगर समाजाव्यतिरिक्त ज्याला ज्याला पाठवले त्यांनी समाजाचे नव्हे तर जनतेचे काहीच काम केले नाही या गोष्टी ओरडून ओरडून सांगायची गरजच काय? इतर नेते चुकीचे वागले तर त्यांची चुक पोटात घालून ठेवता मग धनगर नेत्यांकडून चुका झाल्या तर लगेच पित्त का खवळते? का तर आपला आहे म्हणूनच ना? मान्य आहे की आपला आहे म्हणून परंतु तुमची माथी भडकवणारी इतर जातीमधील लोकं आपल्याच समाजात भांडण लावताहेत हे कधी समजणार आपल्याला?
         आज कुठेतरी संघर्षात्मक लढा देऊन धनगर समाजातून तयार झालेले नेतृत्व उदयास येत असताना त्याचा फायदा समाजाला मिळेलच त्यात काही वाद नाही पण भाजपाने धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल काही पाऊले उचलली नाहीत म्हणून जर त्या पक्षातील आपल्याच जमातबांधवांना पाडणार असाल तर मग विरोधकांच्यात आणि आपल्यात फरक तर काय राहिला? असेही विरोधकांनी धनगर आरक्षणासाठी किती दिवे लावून ठेवलेत? एकीकडे इतर समाजातील काही मंडळी त्यांच्या आरक्षणासाठी जातबांधवांनाच मतदान करायचे ठरवून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा कशा ताब्यात घेतां येतील याची व्यूहरचना आखून ते यशस्वी सुद्धा झाले, मग तो उमेद्वार कोणत्याही पक्षाचा असो एका पक्षातून मजबूत नेतृत्व उभा करायचे तर दुसऱ्या पक्षातून केवळ नाममात्र उमेद्वार द्यायचा जेणेकरून मजबूत आणि जनतेत ओळख असलेल्या उमेद्वारांना निवडून आणायचे ही त्यांची खेळी आहे. आपल्या समाजात मात्र तसे काही होताना दिसून येत नाही केवळ पाय ओढायचेच काम चालू आहे असे दिसून येतेय. मग आपल्यातलेच जमातबांधव आपल्यातल्याच जमातबांधवांना घरात बसवण्याच्या वल्गना करताना दिसून येतात यात कोणते शहाणपण आहे ते मला तर कळत नाही. मग कसा होणार समाजाचा विकास? कोण करणार समाजाचा विकास?? आजपर्यंत इतरांनी किती आपला विकास केला? म्हणून आता करणार आहेत? मग आपल्याच जमातबांधवांना घरात बसवून काय साध्य करणार आहात??
         बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत आहे अशातला विषय नाही पण मला जे विचार सुचले जे योग्य वाटले म्हणून ते मी या माध्यमातून मांडले. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात त्याबद्दल दुमत नाही पण आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाईसाठी देखिल आपण सज्ज आहोत. जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्या आरक्षणाच्या आधारे अनेक राखीव जागा मिळतीलही पण आतापर्यंत संघर्षातून तयार झालेले आणि संघर्षातून, सामाजिक लढ्यांतून तयार होणारे नवयुवकांचे नेतृत्व खोडून टाकले तर ते पुन्हा तयार व्हायला, पुन्हा नेतृत्व घडायला फार वेळ लागेल आणि त्यामुळे अजून कितीतरी पिढ्या यामध्ये भरडल्या जातील या गोष्टीची जाण असायला हवी. *पायात पाय अडकवून पाडणाऱ्यांपेक्षा हातात हात देऊन पडलेल्यांना उठवण्यास मदत करणारा श्रेष्ठ असतो हे लक्षात असु द्या.*विधानसभेच्या माध्यमातून आपल्या समाजबांधवांच्या मुलभूत गरजांची पुर्तता आपण करू शकतो म्हणूनच मला म्हणायचे आहे की *एकवेळ जास्तीत जास्त उमेद्वार उभे करायला शिका एकवेळ नाही निवडून आले तरी चालतील पण तो केवळ भाजपाचा आहे, राष्ट्रवादीचा आहे आमुक पक्षाचा आहे तमूक गटांचा आहे म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न करू नका एवढीच कळकळीची नम्र विनंती.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday 15 October 2019

कोण आहेत गोपीचंद पडळकर? ✍️नितीनराजे अनुसे

कोण आहेत हे गोपीचंद पडळकर?

         एकेकाळी कोणतेही वर्तमानपत्र अथवा मिडिया साधे ज्या माणसाचे नाव सुद्धा घ्यायला टाळत होती आणि आज मात्र महाराष्ट्र राज्यातील युवकांनी अगदी डोक्यावर घेतलेले व्यक्तिमत्त्व, टीव्ही चैनल्स, वर्तमानपत्र आणि समाज माध्यमांना गोपीचंद पडळकर यांच्या नावाची, घोषणेची दखल घेतल्याशिवाय त्यांची हेडलाईन बनत नाही असे गोपीचंद पडळकर आहेत तरी नक्की कोण? राजकारणात नावारूपाला आलेल्या पडळकर यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी आणि त्यांचा राजकीय प्रवास काय याबद्दल काहीजणांना उत्सुकता लागली असावी.
        माणदेश हा तसा दुष्काळी पट्टा म्हणून सर्वज्ञात आहे.          त्याच माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका तसा आजही संघर्षाच्या कथाच गिरवतोय. तिथला शेतकरी स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुष्काळाशी दोन हात करून आजही टिचभर पोटाच्या तुमड्या भरायला अर्धीकोर खाऊन कसाबसा जगतोय म्हणजेच संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याच मातीतील थोर साहित्यकार  ग.दि.माडगूळकर, बनगरवाडी या गाजलेल्या कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगूळकर, तराळ-अंतराळचे कादंबरीकार शंकरराव खरात, ना.सि.इनामदार अशा प्रख्यात लेखकांनी, कादंबरीकरांनी संघर्षातूनच संघर्ष गाथा गिरवल्या आणि त्या गाथा साता-समुद्रापार ऐकवल्या.
         तेव्हाचा तो आटपाडी तालुका तसेच जत, कवठेमहांकाळ व खानापूरचा काही भाग आजही दुष्काळाच्या छत्रछायेखाली असून त्या झळया सोसतोय. परंतु तिथली हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्थापित घराणी सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला आहे. स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडी तालुक्यासाठी पाण्याचा संघर्ष सुरू केला. त्यांना स्वातंत्र्य सैनिक स्व.जी डी बापू लाड, जेष्ठ अभिनेते स्व.निळू फुले तसेच जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचीही साथ मिळाली. दरवर्षी २६ जून ला पाणी परिषद व्हायची परंतु क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर ती पाणी परिषद बंद झाली. आटपाडी, सांगोला, जत, माण तालुक्यातून, प्रत्येक गावागावांतून हजारोंच्या संख्येने लोक एकत्रित यायचे, पाण्यावरती चर्चा व्हायची, मनोगते व्हायची, उन्हातान्हात मिळेल त्या जागेवर बसून लोक सभा ऐकायचे सभा संपायची आणि सगळे जिकडच्या तिकडे निघून जायचे. परंतु प्रस्थापित व्यवस्था, राज्य सरकार याची दखल घेत नव्हते. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या अथक प्रयत्नानंतर/संघर्षानंतर १९९६ साली टेंभूसाठी (Tembhu Lift Irrigation Scheme) मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि स्व.नागनाथअण्णा नायकवडी हे टेंभू योजनेचे खरे जनक ठरले. परंतु २३ वर्षे उलटून देखील ही योजना अजून पुर्णत्वास आली नाही हे आटपाडी तालुक्याचेच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आजपर्यंतच्या लोकसभा/विधानसभा निवडणूक या केवळ आणि केवळ पाण्यावरतीच झाल्या परंतु जातपातीचे/गुंडगिरीचे/जिरवाजिरवीचे राजकारण करण्यापलीकडे एकानेही सांगलीचा खऱ्या अर्थाने विकास केला नाही.
    जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर संघर्षाशिवाय दुसरा तिसरा चौथा कोणता मार्ग शिल्लकच नाही असा विचार करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या नैऋत्येस असलेल्या पडळकरवाडी गावचे सुपूत्र गोपीचंद कुंडलिक पडळकर या तरूणाने २००६ मध्ये राजकारणात पाय ठेवला. वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर हे उमदे नेतृत्व पुढे आले. खरंतर जन्मापासूनच या तरूणाने संघर्ष कोळून प्याला आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ब्रेन ट्यूमर सारख्या भयंकर आजाराने वडिलांचे छत्र हरपले. वडिलांची सेवा करता करता मोठे बंधू देखील देवाघरी गेले. आई सोबत मोलमजुरी करून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे द्वितीय बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी गलाई दुकानदारी केली त्यातून उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण करून नागज फाटा येथे  ढाबा सुरू केला. त्यातून हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली आणि २००६ साली रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.महादेवजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय समाज पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. बघता बघता गोपीचंद पडळकरांची तोफ सांगली जिल्हाभर धडकू लागली, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जागृत होऊ लागला, सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वाभिमान धडधडू लागला तशी आटपाडी तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली, पडळकरांच्या तोफांच्या माऱ्याने आगगोळे प्रस्थापितांवर दणादण आदळू लागले आणि त्या आगगोळ्याने प्रस्थापित, आमदार, खासदार, मंत्री देखील होरपळू लागले, पडळकरांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी मेळावे, चारा छावण्यांसाठीची आंदोलने, मोर्चे होऊ लागले तसतसे दुखलेले खुपलेले लोक पडळकरांच्या भोवती गोळा होऊ लागले नव्हे तर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताइत बनले. पुढे अल्पावधीतच २००९ साली विधानसभेची निवडणूक लढवून जवळपास २०,००० हजाराच्या संख्येने मतदान खेचून आणले आणि तिसऱ्या नंबरचे दखलपात्र नेते ठरले. याची धास्ती प्रस्थापितांनी घेतली आणि त्यांच्यावर खोट्या केसेस घालण्यात आल्या. अगदी स्त्रियांच्या मंगळसूत्र चोरीच्या केसेस ज्यामधे गोपीचंद पडळकर यांना कोर्टाने निर्दोष सिद्ध केले. पुढे २०१२ ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पडळकरांच्या पैनल कडे होते त्यामुळे प्रस्थापितांची अजूनच डोकेदुखी वाढली आणि मग पुन्हा सुरू झाल्या चोरीच्या खोट्या केसेस. पुढे २०१३  साली तालुक्यातील २० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर पडळकरांच्या नेतृत्वाखाली रासपचा झेंडा फडकवला आणि युवकांना सोबत घेऊन पाण्याचा संघर्ष हाती घेऊन तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांची गाडी आडवणे, शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून टेंभू कार्यालय फोडले, आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे म्हणून राजेवाडीचा उजवा कालवा फोडला अशी एक ना अनेक जनतेच्या हिताचे प्रश्न हाती घेऊन पडळकर यांनी संघर्ष केला परंतु त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्यामुळे त्यांना जिल्हा हद्दपारीचे नोटीस बजावली होती. परंतु वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे केले नव्हते तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सुखात जगता यावे, त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, न्याय मिळावा या हेतूसाठी त्यांच्यावर केसेस झाल्या असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्या केसेस हटवायला लावून गोपीचंद पडळकर यांचे जिल्हा तडीपार रद्द झाले. जिथं तिथं संघर्ष आणि संघर्षच अनुभवायला आल्याने गोपीचंद पडळकर एक संघर्ष रत्न म्हणून नावारूपास येऊ लागले. 
तालुका दुष्काळात होरपळत असताना मागितले म्हणून पवाराच्या सरकारने लाठीचार्ज करायला पोलिसांना भाग पाडले होते.

       पुढे २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा लढवली आणि तब्बल ४५००० हजारांचे मताधिक्य मिळवून स्वताला संघर्ष पुत्र म्हणून सिद्ध केले पण एवढ्यावरच त्यांनी हार मानली नाही. आमदार नसताना देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून आटपाडी-खानापूर मतदासंघातील रस्त्यांसाठी भरघोस निधी त्यांनी आणला, आटपाडी तालुक्यासाठी एमआयडीसी, तसेच एकूण २६ बंधारे मंजूर करून आणले. जी कामे आमदारांनी करायची होती ती कामे पडळकरांनी आमदार/खासदार नसताना देखील केली त्यामुळे जनतेच्या मनात गोपीचंद पडळकर हे आमदार/खासदार/मंत्री म्हणून मिरवू लागले. टेंभूच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी भुमिपूजनासाठी मंत्री महोदयांना ते घेऊन आले शिवाय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आले ते पडळकरांमुळेच.
कृषिमंत्री असताना पवारांनी आटपाडीला येण्याऐवजी दुरूनच पळ काढून तासगावला गेले होते.
   गोपीचंद पडळकरांनी नाम फौंडेशनच्या माध्यमातून, लोकसहभागातून अनेक कामे करून घेतली शिवाय निधीअभावी रखडलेल्या टेंभूच्या अर्धवट कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. जनता हेच माझे मायबाप म्हणून पडळकर अहोरात्र जनतेसाठी काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी स्वार्थासाठी काहीच केले नाही. जर खरोखरच पडळकरांना स्वार्थ साधायचा असता तर भाजपच्या मोठ्या ऑफर्स धुडकावून ते स्वाभिमानाने खासदारकीसाठी उभे राहिले नसते. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा निवडणूक केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, न्याय व हक्कासाठी लढले होते आणि तब्बल ३ लाख २३४ मतदान त्यांनी स्वबळावर मिळवले होते. त्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाचा अनुभव हा सर्वात मोठा गुरु त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या संघर्षात साथ देणारे सर्वसामान्य तरूण, शेतकरी, कष्टकरी हे त्यांच्या हातात हात देऊन काम करत आहेत त्यामुळे "कष्टाने हाल होतात पण हार होत नाही" हे ब्रीदवाक्य घेऊन पडळकरांचा संघर्षरथ दिवसेंदिवस मजल मारत पुढे चालला आहे.
       आज गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवताहेत. बारामती तालुक्यातील उपेक्षित बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने दादागिरी, टगेगिरी, घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्यांचा पोरगा बारामतीची सुत्रे हलवणार हे काळ्या दगडावरची पांढरी आणि ठळक रेषा आहे. पवारांची उचलेगिरी करणारी मिडिया बारामती मतदारसंघातील जनतेमध्ये जातीच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण करत असले तरी बारामती मधील जनता हुशार आहे. तेथील काही पत्रकार हे पवारांच्या दहशतीखाली त्यांची लाचारी करत असले तरी गोपीचंद पडळकर यांची सोशल मिडिया ही भारत देशातील सर्वात स्ट्राँग आणि निशुल्क काम करते त्यामुळे बारामती मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांचा विजय निश्चित आहे.
बारामती मधील जनतेनंच घेतलंय पडळकरांना डोक्यावर
संघर्षपुत्रा तु विजयी भवः
    ✍️नितीनराजे अनुसे (लेखक व व्याख्याते)
                8530004123

Saturday 12 October 2019

संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधीच संपत नसते... ✍️नितीनराजे अनुसे


        लोकसभा झाल्या की लगेच विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याने राजकीय खेळींना आणि त्यावरती होणाऱ्या चर्चांना मात्र उधाण आले आहे. राजकारण म्हंटलं की चढ-वरचढ, हल्लाबोल-प्रतिहल्लाबोल, टिका-टिप्पणी इत्यादी इत्यादी आलेच. मग त्यातून काहीजण भाजून निघतात, पोळून निघतात तर काहीजण सुखावतात.
        पैशातून सत्ता मिळवून पुन्हा सत्तेतून पैसा मिळवणे व पुन्हा पुन्हा तेच चक्र चालू ठेवून काही ठराविक जातीतील प्रस्थापित नेत्यांनी राजकारण म्हणजे जणू काय परंपरागत व्यवसाय/साधन करून ठेवले आहे. मग त्यातूनच अहंकार, दादागिरी, टगेगिरी, गुंडगिरी, अरेरावी, शिवीगाळ, उगरटपणा/उर्मटपणा स्वाभाविकपणे येतोच कारण सत्तेचा आणि पैशाचा माज त्यांना चढलेला असतो. आणि विशेष म्हणजे अशी माजलेली आणि मस्तावलेली नेतृत्वं लवकर संपतात त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र तो "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा." डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच अशा लोकशाहीसाठी मारक असलेल्या तथा माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्थापित व्यवस्थेला राजकारणातून संपण्याशिवाय पर्याय नाही.
       मात्र जे जे नेतृत्व संघर्षातून, खाचखळग्यातून, काट्याकुट्यातून, दगडधोंडे तुडवत, डोंगर-दऱ्यांच्या कड्याकपाऱ्यांतून वाट काढत काढत पुढे आले आहे नेतृत्व कधीच संपणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अलिकडेच भाजप ने ना.महादेवजी जानकर साहेब यांना धोका देऊन रासपच्या उमद्वारांचा भाजपच्या ए बी फॉर्म वरती उमेद्वारी अर्ज भरल्याने महादेवजी जानकर साहेबांना समाजाने ट्रोल करत भाजपने फसवणूक केल्याबद्दल चिंता व्यक्त केली शिवाय काल परवा वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये गेलेले मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बारामती विधानसभा लढण्यासाठी पाठवल्याने पडळकर साहेब हे सुद्धा चांगलेच ट्रोल झाले.
       खरंतर ही दोन्ही नेतृत्वंच नाही तर धनगर समाजातील अनेक नवनवीन नेतृत्वं ही संघर्षातूनच पुढे आलेली आहेत. पावलोपावली आस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत हे नेते आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्य पटलावरती येऊन पोहचले आहेत. परंतु त्यासाठी त्यांना काही राजकीय चाली खेळाव्या लागल्या आणि स्वाभाविकच ते खेळले सुद्धा. ज्या प्रमाणे बुद्धीबळाच्या खेळात प्यादे, वजीर, घोडा, उंट, हत्ती (आणि शेवटी राजाचा चेकमेट असतो ) यांच्या प्रत्येकाच्या चाली वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे उत्तम नेतृत्वाला राजकारणाच्या प्रत्येक चाली खेळाव्या लागतात आणि त्या चाली अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ना.महादेवजी जानकर साहेब व मा.गोपीचंद पडळकर साहेब खेळत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. काही लोकांना वाटते की त्यांनी समाजाला धोका दिला, समाजाशी गद्दारी केली पण अभ्यासाच्या आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मला तर तसे काही दिसून आले नाही. त्यासाठी थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास वाचायला हवा. काहीजण म्हंटले महादेव जानकर संपणार त्यांचे रासप संपणार शिवाय गोपीचंद पडळकर यांना बारामती मध्ये उभा करून बळीचा बकरा बनवले आहे अशा प्रकारच्या चर्चांना सोशल मिडियावर खरंतर उधाण आले आहे. परंतु माणदेशी मातीतले हे दोन्ही वाघ कोणताही राजकीय वारसा नसताना आज राजकारणात आहेत शिवाय आज महाराष्ट्राचे राजकारण हे या दोन्ही नावाभोवती फिरतंय याचा अभ्यास आमचे समाजबांधव कधी करणार? ना भाऊ आमदार ना काका खासदार ना वडील पंचायत समिती/जिल्हा परिषदेत नाही आई ग्रामपंचायत सदस्य तर सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातील प्रसंगी अनवाणी पायानं रस्ता तुडवून काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून, डोंगर-दरी-खोऱ्यांतून माळरानं तुडवलेली ही नेतृत्वं आहेत ज्यांच्यावर राजकारणाच्या सुरवातीलाच येथील मस्तवाल प्रस्थापित नेत्यांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर दबावतंत्र वापरून छोट्या मोठ्या खोट्या केसेस घालून ही नेतृत्वं संपवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला पण "जो हार मानून माघारी घेईल तो धनगर कसला?" ह्या "झुंज" कादंबरीतीलच नव्हे दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासातील इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी एकमेवाद्वितीय राजाधिराज चक्रवर्ती महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्याप्रमाणेच या नेत्यांनी कधीच हार मानली नाही. ते लढत राहिले आणि आजही लढताहेत. मान्य आहे की इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर नेत्यांचे खच्चीकरण करत आहेत, धनगर नेतृत्व संपवण्याचा घाट रचत आहेत. मग तिथे भाजप-शिवसेना असो अथवा कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असो हे जातीयवादी पक्ष  धनगर नेत्यांना काळाच्या ओघात राजकारणातून बाजूला फेकायचे बघत असले तरी धनगर नेतृत्व काय मेल्या आईचं नाहीत प्याले. संघर्षातून पुढे आलेले हे नेतृत्व संपत नाही तर ते उसाळी घेत असते फक्त योग्य काळाची आणि वेळेची गरज असते. हेच संघर्ष कोळून प्यालेले नेते त्याच प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून नक्कीच दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा धनगरांच्या हातात घेऊन राजा सम्राट अशोकांचं, होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराजे होळकर यांचे स्वप्न साकार करतील. धनगर समाज बांधवांनी संयम राखून आपल्याच माणसाला साथ द्यायचं व त्याचे मनोबल वाढवायचं आद्यकर्तव्य बजावायला हवे असे मला वाटते. समाजात अजूनही एकीचे बळ तयार झाले नाही परंतु ज्यादिवशी हे एकीचे बळ तयार होईल तेव्हा पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी खाली उतरले तरी समाजाचे कोणी वाकडे करू शकणार नाही हे समाजबांधवांनी लक्षात घ्यायला हवं.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday 1 October 2019

आज वाढदिवस संघर्ष योद्ध्याचा :✍️नितीनराजे अनुसे

संघर्षयोद्धा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब


            माणदेशी मातीत जन्माला आलेलं संघर्ष रत्न म्हणून ओळखल्या युवक ह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज जन्मदिवस... सर्वसामान्य कुटुंबातील मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय ना. महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सन २००६ ला प्रवेश केला. गेल्या १२-१३ वर्षांपासून जनतेत मिळून-मिसळून रात्री अपरात्री गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा, अत्याचारीत पिडीतांना न्याय मिळवून देणारा आणि जनतेच्या हितासाठी अहोरात्र संघर्ष करणारा एक संघर्ष योद्धा म्हणजेच गोपीचंद पडळकर साहेब अल्पावधीतच युवकांच्या गळ्यातील ताईत बनले.
          राजकारण हा नुसता खेळ नव्हे तर गोरगरिबांच्या/सर्वसामान्यांच्या विकासाचा तो दरवाजा आहे जो सर्वसामान्यांना डावलून प्रस्थापित व्यवस्थेने कपटी भावनेने फक्त पाहुण्याराऊळ्यांसाठीच उघडा ठेवला. तो दरावाजा तोडून त्याची कवाडे सर्वसामान्यांसाठी सदैव उघडी ठेवावीत याच उदात्त भावनेने गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटले. परंतु लोकशाही प्रदान भारत देशामध्ये  अशा दरवाजाला प्रस्थापित व्यवस्थेने मात्र जातीयवादाचे भक्कम कुलूप लावून ठेवले आहे की ज्या कुलूपाची किल्ली मात्र त्याच विशिष्ट जातींच्या लोकांसाठी आणि त्यांच्याच कारखान्यात तयार होते. त्यामुळे जर सर्वसामान्यासांठी हा सत्तेचा दरवाजा सताड उघडा ठेवायचा असेल तर त्या कुलूपाच्या किल्लीऐवजी बहुजन समाजाला एकत्रित करून घनरुपी घाव घालून तो दरवाजा तोडावा लागेल यासाठी ते वंचित बहुजन आघाडीमधून सांगली लोकसभा निवडणूक लढले होते. परंतु "एसटी गेल्यावर हात करणे" या वाक्यप्रचाराप्रमाणे धनगर आणि धनगरेत्तर बहुजनांना कळून चुकले की जर त्यांचे बहुमोल मत हे पडळकरांच्या पारड्यात टाकले असते तर एक सर्वसामान्यांचे धडाकेबाज नेतृत्व संसदभवनात सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी तथा हितासाठी लढले असते.
            असे कितीतरी वेळा गोपीचंद पडळकर हा उमदा नेता जनतेच्या बाजूने, जनतेच्या पैशावर मातब्बर प्रस्थापितांच्या विरोधात लढला आणि लढता लढता पडला पण प्रस्थापितांना मात्र त्यांनी घामच फोडला. अर्थातच पडळकर साहेब लढता लढता मतपेटीतून हरले परंतु जनतेच्या मनात भरले.  मात्र "लढता हारलो तरी हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठून पुन्हा लढेन कारण शांत बसायला मी काही संत नाही." या विचाराने प्रेरित होऊन ते पुन्हा जनतेसाठी राजकारणाच्या रणांगणात प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभे असतात हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कालपरवा ते वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरती अनेकजणांचे मतभेद आहेत काहीजण राजकीय द्वेषापोटी तर काहीजण व्यक्तिदोषापोटी तोंडसुख घेताना पाहिले. परंतु एकमात्र नक्की आहे की मा.गोपीचंद पडळकर साहेब हे कोणत्याही पक्षातून निवडणूक लढले तरी ते लोक पडळकर साहेब यांच्यावर टिका करणारच... मग जानकर साहेबांच्या रासप मधून लढू द्या, भाजप-शिवसेनेतून लढू द्या नाहीतर कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस मधून अन्यथा वंचित मधून कोणतीही निवडणूक लढू द्या. गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर प्रेम करणारे सच्चे कार्यकर्ते हे कोणत्याही पक्षाला मानत नाहीत तर ते पडळकर साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहतात कारण त्यांच्या दृष्टीने मा.गोपीचंद पडळकर हाच त्यांच एकमेव आणि उत्तम पक्ष होय.
            अशा उमद्या आणि कणखर नेतृत्वाला अर्थातच सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या, लढणाऱ्या तथा झगडणाऱ्या संघर्षयोद्ध्याला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा। मल्हारी मार्तंड तुमच्या मनगटात बळ देवो, तुम्हास बुद्धी व चातुर्य देवो हीच प्रार्थना🙏
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Saturday 28 September 2019

समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे ✍️नितीनराजे अनुसे




         भारत देश हा खरंतर लोकशाही प्रदान देश असून इथे प्रत्येकाला सरकारविरोधात न्यायासाठी आवाज उठवण्याचा, अन्यायाविरुद्ध लिहण्याचा आणि बोलण्याचा देखील अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिला आहे. गेल्या ७२ वर्षांपासून धनगर समाज आपल्या न्याय व हक्कासाठी लढतोय झगडतोय, संघर्ष करतोय पण सत्ताधाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही. आजच्या या संघ पुरस्कृत हिटलरशाहीत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे मला तरी वाटत नाही.... असो.
          एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत आहे. मनगटाच्या जोरावर अन् तलवारीच्या धारेवर या मातीवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरुषांच्या जमातीत जन्माला आलेल्या औलादी आज आपला दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास विसरून निमूटपणे अन्याय सहन करत बसले आहेत. इथे मेंढपाळांवरती अन्याय होतोय, समाजातील माता-भगिनींवर अन्याय अत्याचार होतोय, समाजातील विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय हे सांगायचे कोणाला आणि बोलायचे तरी कोणाला? धनगर समाजातील नेते मात्र स्वार्थासाठी समाजाला प्रस्थापितांंच्या दावणीला बांधायचे काम करताहेत मग तिथे कोणीही असो... सत्तेमध्ये असलेले आणि नसलेले देखील सर्व सारखेच, सर्वजण एकाच माळेचे मणी.
        घशात घातलेली चराऊ कुरणे, गायरानं मेंढपाळांसाठी सरकारने मोकळी केली असती तर रोज मेंढपाळांना भटकंती करावी लागली नसती ना कोणा शेतकऱ्यांचा मार खावा लागला असता. अन् नाही समाजातील माता-भगिनी वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनल्या असत्या. मेंढपाळांची भटकंती थांबली असती तर मेंढपाळांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची वाताहत झालीच नसती. मेंढपाळांना पुढे करून त्यांच्याच जीवावर आणि आरक्षण प्रश्नावर राजकारण करणारे आणि करू पाहणारे आज कुठेतरी प्रस्थापितांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात धनगर समाजाचे दोन दोन मंत्री असताना देखील समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. नुसत्या योजना जाहीर केल्या परंतु त्या किती धनगर बांधवांपर्यंत पोहचल्या अथवा किती धनगरांना त्याचा लाभ झाला? सत्ताधारी पक्षाची आणि प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभाळण्यासाठी दाखवलेल्या गाजराच्या (१००० कोटी रुपये आणि त्या घोषित केलेल्या २२ योजनांच्या) जाहिराती सोशल मिडियावरून चांगल्याच प्रकाशित झाल्या आणि त्यांचा प्रचार सुद्धा झाला पण त्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रशासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवता झिजवता पायातील पायथान कधी झिजले ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला कळलेच नाही. परंतु तेच पायथान हातात घेऊन प्रस्थापितांच्या आणि त्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या धनगर नेत्यांच्या मुस्काटात मारली असती तर कदाचित त्या सोशल मिडियावरून पसरवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचून त्याचा लाभ समाजबांधवांना झाला असता.
        गेल्या कित्येक वर्षांपासून एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार त्यांचे दुखणे मांडून मांडून थकले पण त्यांची साधी दखल कोणत्याही नेत्याने घेऊ नये एवढे दुर्दैव समाजाचे... लोकसंख्येच्या मानाने दोन नंबरची जमात असलेल्या धनगर जमातीसाठी महाराष्ट्र राज्यापुरते केवळ आणि केवळ ३.५% आरक्षण असताना त्यातही अनेक कुरघोड्या... ओपन मधून जरी अर्ज केला तरी पुन्हा जातीच्या आधारावरच त्या जागा भरल्या जातात मग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर उमेद्वारांनी करायचे काय? गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी माझ्या डोळ्याने पाहतोय आणि त्यांचे दुखणे ऐकतोय. धनगर समाजातील तरुण हजारो-लाखो रूपये खर्चून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासकीय सेवेच्या हलगर्जीपणामुळे जागांच्या अभावी खचून जातोय याकडे धनगर नेत्यांनी दुर्लक्ष करावं ही किती लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. पदं भेटली, खुर्च्या भेटल्या म्हणून समाजाचा विकास झाला असे होत नाही तर समाजाचे दुखणे विधानभवनात, संसदभवनात मांडून समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवून घेणे आवश्यक आहे तरच समाजाचा विकास होईल नाहीतर ये रे माझ्या मागल्या... असेच होईल. ज्या ज्या पक्षांना लोकसभेसाठी धनगर उमेद्वार चालत नाहीत अशी प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजाला काय न्याय देईल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर जे संसद भवन आणि राष्ट्रपती भवन दिमाखात उभे आहे ती संसद ही देशाची तिजोरी तर आहेच परंतु जिथे कायदे बनवले जातात त्या कायदेमंडळात कायदे बनवण्यासाठी संघ पुरस्कृत सत्ताधारी सरकारला तसेच अन्य प्रस्थापित व्यवस्थेला धनगर समाजाची माणसं चालत नसतील तर ते काय धनगर समाजाला खाक न्याय देणार आहेत का?
       या गोष्टीचे समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण तथा आत्मचिंतन करावे कारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून मिळेल त्या वेळेत शक्य तेवढे समाजप्रबोधन करतोय. त्यामुळे जास्त काही सांगायचे नाही. तसे तुम्ही सुज्ञ आहातच....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Friday 27 September 2019

धनगर समाज आणि सामाजिक प्रगल्भता : ✍️नितीनराजे अनुसे


     वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास असे लक्षात येईल की परिवर्तन हा एक निसर्गाचा नियम आहे. निसर्गात वारंवार बदल होत असतात त्यामुळे तर निसर्गाचा समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे समाजात सुद्धा परिवर्तनाची नितांत आवश्यकता असून त्यावरच समाजाची प्रगल्भता अवलंबून आहे. मग तिथे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक असो अथवा राजकीय क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रांत बदल आवश्यक आहे अर्थातच परिवर्तन असायलाच हवे.
       आज समाजात वावरताना असे दिसून येते की इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाजाची सामाजिक प्रगल्भता कुठेतरी कमी पडत आहे. सोशल मिडीयावर तर धनगर समाजातील तरूणांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे ते काही आज नवे नाही. या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तेव्हा तेव्हा राजकारणात अनेक घडामोडी घडल्या अन् त्यांवरती अनेक कुरघोड्या देखील झाल्या.
       नुकतेच गोपीचंद पडळकर हे वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्र तसेच टीव्ही न्यूजप्रमाणे सोशल मिडियावरून देखील वाऱ्यासारख्या वायरल झाल्या. परंतु गोपीचंद पडळकर यांच्यावरती मात्र टिकेची झोड उठवण्यात आली त्याचे कारण असे की अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यात त्यांनी आरेवाडीच्या बिरोबा बनात भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली होती आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर टिकेस बळी पडले.
          खरंतर इथे मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही अथवा कोणत्याही नेत्यांच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही आणि विरोध सुद्धा नाही. कारण प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे जसा मला लिहण्याचा... आज धनगर समाजात अनेक नेते आहेत शिवाय नवनवीन नेतृत्व उदयास येत आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षात कार्यरत आहे. परंतु समाजासाठी एकत्रित यायचे कोणी नाव घेत नाही. तसे झाले असते आज चित्र काही वेगळेच दिसले असते, असो... आमची सामाजिक प्रगल्भता तेवढी नाहीये जेवढी असायला हवी होती. आम्ही मात्र सोशल मिडियावरच एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असतो आणि आपल्याच हाताने समाजाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. थोडक्यात काय तर तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ....
        खरंतर टिका करणाऱ्या युवकांमध्ये (मग तो कोणीही असो तो कोणत्याही पक्षाचा असो) सामाजिक प्रगल्भता असती तर तेव्हाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ना.महादेवजी जानकर हे खासदार झाले असते. रिडालोसमधून गोपीचंद पडळकर हे २००९ साली खानापूर-आटपाडी विधानसभा लढले, २०१४ ला भाजपमधून लढले तर २०१९ ला सांगलीची लोकसभा निवडणूक वंचित मधून लढले होते मग सामाजिक प्रगल्भता असती तर ते सुद्धा आमदार खासदार झाले असते. २०१४ ला बाळासाहेब गावडे बारामती मधून आणि प्रकाश शेंडगे जत मधून आमदार झाले असते ना.... आता २०१९ ला डॉ यशपाल भिंगे आणि सखाराम बोबडे हे सुध्दा परभणीमधून खासदार झाले असते. असे कितीतरी धनगर समाजातील उमेद्वार सहज निवडून आले असते पण काय करणार यास सर्वस्वी जनतेबरोबरच नेत्यांची सुद्धा प्रगल्भता महत्त्वाची आहे. इतर समाजातील कितीतरी नेते पक्ष बदलतात, कोणाचा जावई दुसऱ्या पक्षात, तर कोणाचा भाऊ, साडू, मेव्हणा, पुतण्या तिसऱ्या चौथ्या पक्षात असतो. तेव्हा मात्र ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्या जातीतील लोकांनी त्यांना कधी विरोध केला नाही त्यांच्यावर टिका केली नाही. यावरून तरी त्यांच्या सामाजिक प्रगल्भतेचा अभ्यास करायला हवा. मग धनगर समाजातच हा एवढा उपद्व्याप का?
       म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक तर एकत्रित या नसेल तर कोणीही कोणत्याही पक्षात जात असेल तर जाऊद्या, संधी मिळत असेल तिथून विधानसभा लोकसभा लढू द्या आपण सर्वांनी सामाजिक प्रगल्भता जोपासून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विधानभवनात आणि संसदभवनात समाजाचा टक्का वाढवूया. परंतु आपल्याच समाजातील नेत्यांवर टिकेची झोड उठवून समाजाचेच वाभाडे काढू नका एवढीच नम्र विनंती.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Tuesday 13 August 2019

समाजासाठी आक्रमक होऊन नेहमीच आंदोलन करणारे सुरेश होलगुंडे,शांततेच्या मार्गाने उपोषण करत जीवाची बाजी लावताहेत, सुरेश होलगुंडे आणि सर्व उपोषणकर्त्यांंना सलाम.....

महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे


            समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार-खासदारांच्या गाड्या आडवणारे, न्याय व हक्कासाठी भांडणारे महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे हे एक हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व असून धनगर आरक्षण लढ्यातील एक संघर्षमय नेतृत्व सुद्धा आहे. १४ ऑगस्ट २०१४ रोजी धनगर आरक्षण संदर्भात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले सुरेश(भाऊ) होलगुंडे हे निस्वार्थीपणे या आंदोलनात धनगर समाजाचे नेतृत्व केले होते. याच धनगर समाजाच्या आंदोलनात मुंबईची Life Line अर्थातच जीवन रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे आडवण्यात मा.सुरेश भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालून प्रत्येक आमदारांना गुलाब पुष्प देत आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे गांधी मार्गाने केलेल्या आंदोलनात शिवाय त्यानंतरच्या अधिवेशन काळात विधानसभेत घुसून सरकार विरोधात आरक्षणाच्या घोषणा देऊन यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करण्यात देखील ते हिरारीने सहभागी झाले होते. धनगर आरक्षण संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मधुकर पिचड याचा निषेध करत राष्ट्रवादी भवनावर जे आंदोलन झाले होते त्यातही मधुकर पिचड च्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनात मा.सुरेश भाऊ होलगुंडे सहभागी होते. अशा एक ना अनेक आंदोलनात मोर्चात सहभागी होऊन समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे नेतृत्व, गावभागातून मुंबई मध्ये येणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन तथा मदत करणाऱ्या सर्वच जाती-धर्मातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिलेदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि पुरंदरच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाच्या प्रांगणात गोंधळ घालून घोषणाबाजी केली होती त्याच महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे हे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पंढरपूर येथे सलग पाचव्या दिवशीही सहकाऱ्यांसह केवळ आणि केवळ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्न त्यागून आमरण उपोषणात ते देखील कोणत्याही उपचाराशिवाय बसले आहेत. सुरेशभाऊ सलाम तुमच्या कार्याला
        सरकार या आंदोलनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असले तरी धनगर समाजाने आणि समाजातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष घालून त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Sunday 11 August 2019

लढाई हक्काच्या आरक्षणाची... ✍️नितीनराजे अनुसे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेले वाघ

   भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होत आली तरी राज्यघटनेने बहाल केलेला घटनादत्त अधिकार अर्थातच धनगर जमातीच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण आजपर्यंत समाजाला मिळू शकले नाही हे भारत नावाच्या महा'राष्ट्रा'तील सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे इथल्या प्रस्थापित औलादी आश्वासने देऊन, धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर पुन्हा त्याच समाजाची ससेहोलपट करतात हे कधीपर्यंत चालायचं?
        आजपर्यंत जे झाले गेले ते इतिहासात जमा झाले परंतु इथून पुढे तरी सर्वांनी कंबर कसून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लढायला सज्ज व्हायला हवे. नाहीतर धनगर समाजाची आणि समाजातील नेत्यांची "एक ना धड भाराभर चिंध्या" अशीच अवस्था होईल.  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हवे आहे जेणेकरून पुढच्या पिढ्या तरी स्वाभिमानाने जगतील नाहीतर आजच्या पिढीच्या तोंडात शेण घालायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तरच समाजाची प्रगती होऊ शकते. १००० कोटी रूपयांचे गाजर दाखवून धनगर समाजाची बोळवण केली जात आहे जे राज्यघटनेत नाही.
        जुलै २०१४ च्या बारामतीच्या आंदोलनात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते ते फडणवीस यांनी पाळले नाही उलट पुन्हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अन्य आश्वासनांचे, सवलतींचे गाजर दाखवले आहे त्याविरोधात ९ ऑगस्ट या क्रांतीदीवशी धनगर समाजातील पांडुरंग मेरगळ (दौंड), सुरेश होलगुंडे(मुंबई), विजय तमनर (राहुरी), सतीश झंजे(माळशिरस), प्रकाश थाडके (नांदेड), धनाजी बंडगर (सांगोला), गंगाप्रसाद खारोडे (हिंगोली), राजेंद्र तागड (अ.नगर) आणि नागुराव बारसे(नांदेड) ९ लढवय्ये पंढरपूर येथे आमरण उपोषण करत आहेत. धनगर समाजाला आणि समाजातील प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. आजच गंगाप्रसाद खारोडे या उपोषणकर्त्यास पोलिस जबरदस्तीने उपचारासाठी घेऊन गेले त्यावरून असे दिसते आहे की हे आंदोलन चिरडण्यासाठी फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायची जबाबदारी तुमची आमची आहे. त्यासाठी पेटून उठणे ही काळाची गरज आहे अन्यथा भविष्यात कोणीही धनगर समाजाची दखल घेणार नाही हे लक्षात ठेवा.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Saturday 6 July 2019

आम्हाला न्याय द्या... खेकड्यांची आर्त किंकाळी... ✍️नितीनराजे अनुसे


      गावाकडे आल्यावर काल वडिलांना पेरणीसाठी जायचे असल्याने मी मेंढरं घेऊन शेताकडे गेलो. काही दिवस अगोदर पडलेल्या थोड्याफार पावसामुळे शिवार हिरवंगार झालं होतं. ओल्या गवतामुळे तशी मेंढरांना लवकर तहान लागत नाही म्हणून दुपारपर्यंत मेंढरं चारून पाण्यावर घालायची म्हणून खाली विहीरीवर घेऊन गेलो. विहीर तशी फार खोल नव्हती अगदी परूसभर सुध्दा नाही आणि त्यात पाणी सुद्धा जेमतेमच होते. थोड्याफार तहानलेल्या मेंढ्या पळतच विहीरीत उतरल्या आणि गटागटा पाणी पिऊन बाहेर पडायला लागल्या. तेवढ्यात कसलातरी आवाज यायला लागला म्हणून कान टवकारून त्या दिशेने बघतो तर काय विहीरीच्या आसपास असलेल्या बिळांमधून एकेक खेकडा बाहेर पडू लागला. मला वाटलं की मुके प्राणी आहेत बिचारे, मेंढ्यांच्या पळण्याच्या आवाजाने घाबरले असतील नाहीतर अन्नाच्या शोधात बाहेर पडत असतील. पण वास्तविक पाहता तसे काही नव्हते. सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले. कसलातरी विचित्र आवाज करत ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत करत होते. खरंतर त्यांच्या भावनेतूनच त्यांची भाषा आता स्पष्टपणे ऐकायला येत होती. काल परवाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या दुर्गम भागातील तिवरे (भेंडवाडी) गावानजीक असलेले तिवरे धरण फुटून जवळपास २४ जण बेपत्ता झाले त्यातील आतापर्यंत ६ जणांचेच मृतदेह सापडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तेथील स्थानिकांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावर गांभीर्याने लक्ष न देता गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी म्हणून त्या धरणातील गाळ उपसून डागडुजी करण्यात आली होती. मात्र धरण कसे फुटले त्याबद्दलचा अहवाल मागितल्यानंतर जंलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी चक्क सांगितले की निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे नव्हे तर खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळे तिवरे धरण फुटले. माझ्या अंदाजानुसार जगाच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी की खेकड्यांमुळे धरण फुटले थोडक्यातच त्याचा अर्थ असा होतो की खेकड्यांनीच तिवरे धरण फोडले.
         म्हणूनच की काय ते सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले होते. त्यांच्या जमातबांधवांवरती धरण फोडल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रत्येकजण जणू काय आपले जमातबांधव निर्दोष असल्याची विनवणी करत माणसं कशी स्वार्थी आहेत ते सांगत होता. तेवढ्यात मध्येच एकजण म्हातारा खेकडा समोर आला आणि सांगू लागला की "हे बघा, आमच्या बापजाद्यांपासून आमची खेकडा जमात ही अखंड भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. तिथे तिथे आमची ही जमात सुखासमाधानाने जगत आहे. जगभरात असंख्य धरणे आहेत. एवढेच काय तर भारतात सुद्धा आहेत. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी सुद्धा धरणे बांधून ठेवली आहेत. तद्नंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा राधानगरीचे धरण बांधले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या आराखड्यानुसार गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण असो अथवा त्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काळात बांधलेली अनेक धरणे आहेत. अगोदरच्या बांधलेल्या धरणाजवळ देखील आमची खेकडा मोठ्या प्रमाणात जमात वास्तव्यास आहे हवे तर त्यासंदर्भात तुम्ही अहवाल मागवू शकता. मात्र विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की त्याकाळी बांधलेली धरणे अजून जशीच्या तशीच आहेत मग आता २००४ साली कार्यान्वित करण्यात आलेले तिवरे धरणच आम्ही कसे काय फोडले? निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून माणसांच्या जीवाशी खेळ चाल्लाय हे माणसांना कसं काय दिसत नाही?"
          तेवढ्यात दुसरा एक खेकडा मध्येच उभा राहिला आणि म्हणाला की, "आम्ही बोलू शकत नाही हे मान्य आहे त्यामुळे आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतील परंतु बोलत्या-चालत्या ज्या माणसांचे जीव गेले आहेत, त्यांचे काय? काही गुन्हा नसताना त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे ते सुद्धा बोलत्या-चालत्या माणसांमुळेच... मग आमच्यावर आरोप करण्यागोदर कमीत कमी माणूसकीची लाज वाटून तरी संबंधितांनी स्वतःच्या हलगर्जीपणाची लाज बाळगायला हवी होती. परंतु माणूसकी हरवलेल्या या जगात मुक्या प्राण्यांवर आरोप करून बाजूला होणारी हीच माणूसकी आज आम्ही नव्याने पाहतोय. हेच का ते कलियुग? जर आम्हा खेकड्यांना धरणे फोडायची असती तर आजपर्यंत एकही धरण ठेवले नसते सगळी धरणे फोडली असती. तसंही त्या तिवरे (भेंडवाडी) गावच्या ग्रामस्थांनी आमचे काही बिघडवले नव्हते. त्यामुळे संबंधित जलसंधारण मंत्र्यांनी जबाबदार अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. माणसांचा जीव काय असतो हे आम्हाला चांगलंच माहीत आहे कारण आम्हीच त्यांच्या आजारावर उपयोगी येतो, माणसांच्या आरोग्यासाठी आम्ही आमचे जीव देतो. मग आम्ही कशाला त्या गोरगरिबांचे जीव घेऊ? माणसातील माणूसकी शिल्लक राहिली नसल्यानेच माणसंच माणसांचा जीव घेत आहेत, खून करत आहेत, अन्याय अत्याचार करत आहेत. मग त्यांच्या चुकीसाठी आम्हाला का जबाबदार धरले जातेय...? जनाची राहीली कमीत कमी मनाची लाज बाळगून आम्हा मुक्या प्राण्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनवणी आहे."
     खेकड्यांच्या त्या विनवण्या ऐकून खरंतर मलाच माणूसकीची लाज वाटायला लागली. स्वतःच्या नपुंसकतेमुळे मुक्या प्राण्यांवर आरोप करून स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या औलादी खरंच माणूसकीच्या नावाला लागलेला एकप्रकारचा कलंक आहे. मेंढरामागेच या गावावरून त्या गावाला भटकंती करत असताना तत्कालीन परिस्थिती पाहून आमचे तात्या कधीकधी एक गाणं गुणगुणत होते त्या गाण्याच्या पहिल्या ओळी आज स्पष्टपणे आठवताहेत त्या म्हणजे "कलियुगात झाली भेळ, लावली रताळं आली केळं" या वरून तरी असंच वाटतंय की सध्याच्या युगात माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला जबाबदार धरेल आणि काय करेल हे सांगणे अशक्य आहे. कारण या जगात माणूसकी शिल्लक राहिली आहे की नाही? असा प्रश्न पडतोय....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Monday 17 June 2019

षंढ लोकप्रतिनिधींकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात? ✍️नितीनराजे अनुसे

पुरंदर येथे मेंढपाळाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतिप्रसंग घटनेबद्दल....


       खरंतर लहान तोंडी मी मोठा घास घेतोय... परंतु आसपासच्या वातावरणातील वस्तुस्थिती पाहीली तर माझ्याच काय प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशित असलेल्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला ती पुरंदर तालुक्याची माती खरंतर पवित्र असायला हवी होती परंतु कसली पवित्र म्हणायची? त्याच मातीत दि.१० जून २०१९ रोजी एका मेंढपाळाच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग होतो आणि शिवछत्रपतींचा वारसा सांगणारा, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा म्हणवून घेणारा एकही मर्द पुढे येऊन निषेध करू शकला नाही. यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट काय असावी? या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी एका मेंढपाळास पुढे यावे लागते मग बाकीचे लोक, नेते, समाज काय झोपा काढताहेत का?  म्हणजे कोपर्डी सारखे प्रकरण घडल्यावरच सबंध महाराष्ट्र मूक मोर्चे काढणार आणि मेंढपाळांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय म्हणून तुम्ही हातात बांगड्या भरून षंढ होऊन घरात बसणार? जातीयवादाचे बुरखे पांघरूण बसणाऱ्या औलादी आज इतरांना धर्मनिरपेक्षतेचे धडे शिकवतात हाच का महाराष्ट्रातील मावळ्यांना लाभलेला शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा? कारण ज्या मतदारसंघात ही घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार ही सुद्धा एक महिला असूनसुद्धा साधी चौकशी करायला येत नसेल तर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे की असे जातीयवादी लोकप्रतिनिधी आरोपींना पाठीशी घालताहेत.
          आज इथे तर उद्या तिथे असे भटके जीवन जगत पोटाची खळगी बडवणाऱ्या मेंढपाळांनी आता जगायचं कसं आणि मरायचं तरी कसं? असा प्रश्न पडतोय. समाजातील संघटना नुसत्या प्रसिद्धीसाठीच स्थापन करण्यात येतात काय? ज्या समाजाच्या न्याय हक्कासाठी म्हणून डंका पिटला जातोय त्या संघटनांकडून आणि ज्या मेंढपाळांच्या नावाने जे नेते आरक्षण मागताहेत ते नेते जर एका मेंढपाळाच्या मुलीला न्याय देऊ शकत नसतील तर त्या नेत्यांकडून समाजाने काय अपेक्षा कराव्यात? स्वतःची खळगी भरली म्हणून, पं.समिती सदस्य, जि.प.सदस्य, आमदार, खासदार, मंत्री झाला म्हणून समाजाला वाऱ्यावर सोडून देणार का? आज एका मेंढपाळाची मुलगी नव्हे तर तुमची आमची भगिनी अतिप्रसंगास बळी पडली आहे त्याविरोधात तुम्ही आवाज उठवू शकत नसाल तर उद्या तुमच्यापैकीच तुमच्या रक्ताची आई, बहिण, बायको, मुलगी अशा अतिप्रसंगास बळी पडू शकते त्यावेळी कितीही बोंबलत बसला तरी तुमचं कोणी ऐकून घेणार नाही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा.
अधिक माहितीसाठी संपर्क
मेंढपाळ आनंद कोकरे : +91 87887 97032
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Friday 31 May 2019

डोळ्यांत अंजन घालणारी काव्यरचना ✍️कवी राजू झंजे

जय मल्हार.....
     आज  तुझी  जयंती  माउली  ,
      दाही  दिशा साजरी होणार ;
      बेंबीच्या देठापासून  ,
     " जय अहिल्या" नारे देणार !

       चौका-चौकात  अभिवादनाचे ,
        मोठं  मोठाले  बॅनर  लागतील ;
        वर्षभर  "झोपलेले  " ,
       आज  " जातीसाठी ?" जागतील !
 
       समाज  "माझा"च ,
        अशी स्पर्धा देखील लागतेय आता ;
       मीच "मालक" यांचा ,
        काही "मंडळी" अशी वागतेय आता !
 
        जयंतीच  "व्यासपीठ "माउली आता,
        "अस्तित्व" दाखवण्याचं ठिकाण झालंय;
         समाज तुझा काही  "व्यापारियांचे"
        ठरलेले "दुकान " झालंय !
 
          या  दुकानातूनच आम्हांला,
          कोणालाही  विकलं  जातंय  ;
           वापरून झालं कि ,
          पुन्हा कुठेही टाकलं जातंय !

           राज्यकर्ती जमात माउली ,
           आज  लाचारीच जिणं  जगतेय  ;
          देण्याची  दानत  ठेवणारी  ,
           आज  लाचार  होऊन  मागतेय !
   
          साधा भोळा समाज भरडला  जातोय
          काही  नसतानाहि  गुन्हा  ;
          प्रस्थापितांनीहि आरक्षणाचा ,
         मोडून ठेवलाय कणा ;
          शासनाचा  चालू  आहे  इथे  ,
         हुकूमशाही  बाणा ;
    हे माऊली ... प्रशासन  कसे असावे हे दाखवण्यासाठी तरी ,
          जन्म घे पुन्हा....जन्म घे  पुन्हा !

देवी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र    अभिवादन!

                 कवी. राजु दादासाहेब झंजे
                       ९५९४८१५५८५

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आज २९४ वी जयंती... ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या २९४ व्या जयंती निमित्त मानाचा जय मल्हार

       एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...
       खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. 
        जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी'  अहिल्याई होळकर होत.
      अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेला जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.
     अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे.  अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे.  गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
 📧nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday 29 May 2019

उठ धनगरा आतातरी जाग। ✍️नितीनराजे अनुसे


उठ धनगरा आतातरी जाग।
तूच आहेस रे खरा ढाण्या वाघ ।।
उसळत्या लाव्हारसाची तूच तप्त आग।
खूप झाला रे अत्याचार येवू दे आता राग ।।
उठ धनगरा आतातरी जाग ॥धृ॥
         लखलखत्या विजेचा तूच कडकडाट ।
         बेभान ढगांचा तूच रे गडगडाट।।
         अन्यायाच्या विरोधात दे रे आता आरोळी।
         अंगी शुरता सिंहाची फोड तू डरकाळी।।
         कसा झालास तू इतका षंढ? येवू दे आता राग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥१॥
शञूवरची चाल तू।
निधड्या छातीची ढाल तू।।
अहिल्यामातेची तलवार तू।
तळपत्या तलवारीची धार ही तू।।
पेटू दे तुझ्या नसानसात आग।
उठ धनगरा आतातरी जाग॥२॥
         आठव तुझ्या पुर्वजांचा इतिहास ।
         रचली होती त्यांनी शत्रूंच्या देहांची रास।।
         मनगटाच्या जोरावर लढले ते बहाद्दर खास ।
         तलवारीला असायची शत्रूच्या रक्ताची आस।।
         नडणाऱ्यांना एकदाचेच तू बजावून सांग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥३॥
जाण असुदे सदैव धनगरांच्या इतिहासाची।
जरातरी लाज राख रे सळसळत्या रक्ताची।।
क्षणमाञही नकोस करू तू विचार ।
उपस आता तू म्याणातील तलवार ।।
राजा आहेस ना तू तर राजासारखंच वाग ।
उठ धनगरा आतातरी जाग॥४॥
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
        +91 853 000 4123
📧 nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday 28 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प चौथे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

राज्यकारभार/सामाजिक कार्य/आर्थिक तथा सांस्कृतिक दूरदृष्टी
          माळवाधिपती थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सून अहिल्याई होळकर यांस युद्धनीती सोबतच राजकारणाचे धडे देखील शिकवल्यामुळे तथा पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली होती. पुरूषप्रधान मानसिकता असलेल्या काहींनी अहिल्याईंनी शासन करण्यास (राज्य कारभार करण्यास) माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले,  हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात धार्मिक कार्याबद्दल अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे.
आर्थिक दूरदृष्टी:- भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात आजपर्यंत अहिल्याई होळकर एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की ज्यांना सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता. अहिल्याईंची दुरदृष्टी पाहिल्यावर व्यावसायिक क्षेत्रात देखील त्या काही कमी नव्हत्या कारण आर्थिक क्षेत्रात राज्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली होती.
सामाजिक कार्य : राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. अठराव्या शतकात अहिल्याईंचे तत्त्वज्ञान किती महान होते हे त्यांच्या त्यावेळच्या शासन काळावरून लक्षात येते. दारूमुळे कितीतरी संसार उध्वस्त होत असल्याने अहिल्याईंनी दारूबंदी केली शिवाय हुंडाबळी थांबवण्यासाठी हुंडा पद्धत बंद करण्यासाठी कडक कायदे करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या पहिल्या राज्यकर्त्या होत्या. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते तेव्हा त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायपट पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याच्या अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी त्या मंत्र्याला कडक शासन करून दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्याई होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. अहिल्याईंच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे एवढेच नव्हे तर इंदौर हवाई अड्ड्याला (विमानतळाला) सुद्धा अहिल्याई होळकर यांचे नाव मध्यप्रदेश सरकारने दिले आहे.
           भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (ब्रिटिश लेखक) 'माल्कम' यांच्या मतानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
सांस्कृतिक ठेवा:-  राष्ट्रमाता अहिल्याईंचे सांस्कृतिक कार्य म्हणाल तर महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. सदरची संस्कृती आणि संगीत व कलेचा वारसा जतन करण्यात अहिल्याईंचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. 
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. पृथ्वीवरील ज्या पाच लोकांना "पुण्यश्लोक" ही उपाधी दिली त्यात अहिल्याई होळकर यांचेही नाव सन्मानाने घेतले जाते. तर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महाराणी अहिल्याई होळकर होत.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी इंदौर राज्याव्यतिरीक्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तर गुजरात पासून आसाम पर्यंत विकासाचा अफाट डोंगर रचून ठेवला आहे. काही इतिहासकार, संशोधक, होळकरशाहीचे अभ्यासक त्यावरती संशोधन करत आहेत तथा समाजातील युवक-युवतींनी पुढे येऊन संशोधन करावे त्यामुळे येणाऱ्या काळात नव्याने काही घटनांची भर इतिहासात पडेल...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Sunday 26 May 2019

माळवाधिपती थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर ✍️नितीनराजे अनुसे

माळवाधिपती थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर


#होळकरशाहीची_स्थापना
दि.२६ मे १७२९
    मराठेशाहीचा इतिहास म्हणजे खरंतर ती एक अंधाधुंदीच होती. त्या अंधाधुंदीच्या काळात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात होता हे कळायलाच मार्ग नव्हता. तमाम मराठ्यांचीच काय तर अखंड हिंदूस्थानातील राजा-महाराजांची देखील हीच अवस्था होती. परंतु हिंदूस्थानातील काही राजांनी केवळ स्वतःचेच राज्य न पाहता राष्ट्रप्रेमाने जो काही अद्भूत इतिहास रचला त्याला मुळात तोडच नव्हती. परंतु जातीयवादाच्या आणि श्रेयवादाच्या नादात "ज्याच्या हाती ससा तोच पारधी" अशा प्रचलित म्हणीप्रमाणे शिकल्या सवरलेल्या जातीयवादी इतिहासकारांनी मातृभूमीतीलच महापराक्रमी योद्ध्यांना उपेक्षित ठेवले त्यातीलच एक म्हणजेच अटकेपार झेंडे फडकवणारे तथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य अबाधित राखणारे स्वबळावर आपले स्वराज्य उभा करणारे माळवाधिपती होळकरशाहीचे संस्थापक थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर.
            स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराचा सामना करत त्याला आस्मान दाखवले व माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. तोच आजचा हा गौरवशाली दिवस त्याला २९० वर्षे पूर्ण झालीत आणि तोच होळकरशाहीचा गौरवशाली तथा जाज्वल्य इतिहास आज इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलाय.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com