Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 28 September 2019

समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे ✍️नितीनराजे अनुसे




         भारत देश हा खरंतर लोकशाही प्रदान देश असून इथे प्रत्येकाला सरकारविरोधात न्यायासाठी आवाज उठवण्याचा, अन्यायाविरुद्ध लिहण्याचा आणि बोलण्याचा देखील अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिला आहे. गेल्या ७२ वर्षांपासून धनगर समाज आपल्या न्याय व हक्कासाठी लढतोय झगडतोय, संघर्ष करतोय पण सत्ताधाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही. आजच्या या संघ पुरस्कृत हिटलरशाहीत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे मला तरी वाटत नाही.... असो.
          एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत आहे. मनगटाच्या जोरावर अन् तलवारीच्या धारेवर या मातीवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरुषांच्या जमातीत जन्माला आलेल्या औलादी आज आपला दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास विसरून निमूटपणे अन्याय सहन करत बसले आहेत. इथे मेंढपाळांवरती अन्याय होतोय, समाजातील माता-भगिनींवर अन्याय अत्याचार होतोय, समाजातील विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय हे सांगायचे कोणाला आणि बोलायचे तरी कोणाला? धनगर समाजातील नेते मात्र स्वार्थासाठी समाजाला प्रस्थापितांंच्या दावणीला बांधायचे काम करताहेत मग तिथे कोणीही असो... सत्तेमध्ये असलेले आणि नसलेले देखील सर्व सारखेच, सर्वजण एकाच माळेचे मणी.
        घशात घातलेली चराऊ कुरणे, गायरानं मेंढपाळांसाठी सरकारने मोकळी केली असती तर रोज मेंढपाळांना भटकंती करावी लागली नसती ना कोणा शेतकऱ्यांचा मार खावा लागला असता. अन् नाही समाजातील माता-भगिनी वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनल्या असत्या. मेंढपाळांची भटकंती थांबली असती तर मेंढपाळांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची वाताहत झालीच नसती. मेंढपाळांना पुढे करून त्यांच्याच जीवावर आणि आरक्षण प्रश्नावर राजकारण करणारे आणि करू पाहणारे आज कुठेतरी प्रस्थापितांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात धनगर समाजाचे दोन दोन मंत्री असताना देखील समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. नुसत्या योजना जाहीर केल्या परंतु त्या किती धनगर बांधवांपर्यंत पोहचल्या अथवा किती धनगरांना त्याचा लाभ झाला? सत्ताधारी पक्षाची आणि प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभाळण्यासाठी दाखवलेल्या गाजराच्या (१००० कोटी रुपये आणि त्या घोषित केलेल्या २२ योजनांच्या) जाहिराती सोशल मिडियावरून चांगल्याच प्रकाशित झाल्या आणि त्यांचा प्रचार सुद्धा झाला पण त्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रशासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवता झिजवता पायातील पायथान कधी झिजले ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला कळलेच नाही. परंतु तेच पायथान हातात घेऊन प्रस्थापितांच्या आणि त्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या धनगर नेत्यांच्या मुस्काटात मारली असती तर कदाचित त्या सोशल मिडियावरून पसरवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचून त्याचा लाभ समाजबांधवांना झाला असता.
        गेल्या कित्येक वर्षांपासून एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार त्यांचे दुखणे मांडून मांडून थकले पण त्यांची साधी दखल कोणत्याही नेत्याने घेऊ नये एवढे दुर्दैव समाजाचे... लोकसंख्येच्या मानाने दोन नंबरची जमात असलेल्या धनगर जमातीसाठी महाराष्ट्र राज्यापुरते केवळ आणि केवळ ३.५% आरक्षण असताना त्यातही अनेक कुरघोड्या... ओपन मधून जरी अर्ज केला तरी पुन्हा जातीच्या आधारावरच त्या जागा भरल्या जातात मग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर उमेद्वारांनी करायचे काय? गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी माझ्या डोळ्याने पाहतोय आणि त्यांचे दुखणे ऐकतोय. धनगर समाजातील तरुण हजारो-लाखो रूपये खर्चून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासकीय सेवेच्या हलगर्जीपणामुळे जागांच्या अभावी खचून जातोय याकडे धनगर नेत्यांनी दुर्लक्ष करावं ही किती लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. पदं भेटली, खुर्च्या भेटल्या म्हणून समाजाचा विकास झाला असे होत नाही तर समाजाचे दुखणे विधानभवनात, संसदभवनात मांडून समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवून घेणे आवश्यक आहे तरच समाजाचा विकास होईल नाहीतर ये रे माझ्या मागल्या... असेच होईल. ज्या ज्या पक्षांना लोकसभेसाठी धनगर उमेद्वार चालत नाहीत अशी प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजाला काय न्याय देईल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर जे संसद भवन आणि राष्ट्रपती भवन दिमाखात उभे आहे ती संसद ही देशाची तिजोरी तर आहेच परंतु जिथे कायदे बनवले जातात त्या कायदेमंडळात कायदे बनवण्यासाठी संघ पुरस्कृत सत्ताधारी सरकारला तसेच अन्य प्रस्थापित व्यवस्थेला धनगर समाजाची माणसं चालत नसतील तर ते काय धनगर समाजाला खाक न्याय देणार आहेत का?
       या गोष्टीचे समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण तथा आत्मचिंतन करावे कारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून मिळेल त्या वेळेत शक्य तेवढे समाजप्रबोधन करतोय. त्यामुळे जास्त काही सांगायचे नाही. तसे तुम्ही सुज्ञ आहातच....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Friday 27 September 2019

धनगर समाज आणि सामाजिक प्रगल्भता : ✍️नितीनराजे अनुसे


     वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास असे लक्षात येईल की परिवर्तन हा एक निसर्गाचा नियम आहे. निसर्गात वारंवार बदल होत असतात त्यामुळे तर निसर्गाचा समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे समाजात सुद्धा परिवर्तनाची नितांत आवश्यकता असून त्यावरच समाजाची प्रगल्भता अवलंबून आहे. मग तिथे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक असो अथवा राजकीय क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रांत बदल आवश्यक आहे अर्थातच परिवर्तन असायलाच हवे.
       आज समाजात वावरताना असे दिसून येते की इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाजाची सामाजिक प्रगल्भता कुठेतरी कमी पडत आहे. सोशल मिडीयावर तर धनगर समाजातील तरूणांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे ते काही आज नवे नाही. या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तेव्हा तेव्हा राजकारणात अनेक घडामोडी घडल्या अन् त्यांवरती अनेक कुरघोड्या देखील झाल्या.
       नुकतेच गोपीचंद पडळकर हे वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्र तसेच टीव्ही न्यूजप्रमाणे सोशल मिडियावरून देखील वाऱ्यासारख्या वायरल झाल्या. परंतु गोपीचंद पडळकर यांच्यावरती मात्र टिकेची झोड उठवण्यात आली त्याचे कारण असे की अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यात त्यांनी आरेवाडीच्या बिरोबा बनात भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली होती आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर टिकेस बळी पडले.
          खरंतर इथे मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही अथवा कोणत्याही नेत्यांच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही आणि विरोध सुद्धा नाही. कारण प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे जसा मला लिहण्याचा... आज धनगर समाजात अनेक नेते आहेत शिवाय नवनवीन नेतृत्व उदयास येत आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षात कार्यरत आहे. परंतु समाजासाठी एकत्रित यायचे कोणी नाव घेत नाही. तसे झाले असते आज चित्र काही वेगळेच दिसले असते, असो... आमची सामाजिक प्रगल्भता तेवढी नाहीये जेवढी असायला हवी होती. आम्ही मात्र सोशल मिडियावरच एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असतो आणि आपल्याच हाताने समाजाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. थोडक्यात काय तर तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ....
        खरंतर टिका करणाऱ्या युवकांमध्ये (मग तो कोणीही असो तो कोणत्याही पक्षाचा असो) सामाजिक प्रगल्भता असती तर तेव्हाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ना.महादेवजी जानकर हे खासदार झाले असते. रिडालोसमधून गोपीचंद पडळकर हे २००९ साली खानापूर-आटपाडी विधानसभा लढले, २०१४ ला भाजपमधून लढले तर २०१९ ला सांगलीची लोकसभा निवडणूक वंचित मधून लढले होते मग सामाजिक प्रगल्भता असती तर ते सुद्धा आमदार खासदार झाले असते. २०१४ ला बाळासाहेब गावडे बारामती मधून आणि प्रकाश शेंडगे जत मधून आमदार झाले असते ना.... आता २०१९ ला डॉ यशपाल भिंगे आणि सखाराम बोबडे हे सुध्दा परभणीमधून खासदार झाले असते. असे कितीतरी धनगर समाजातील उमेद्वार सहज निवडून आले असते पण काय करणार यास सर्वस्वी जनतेबरोबरच नेत्यांची सुद्धा प्रगल्भता महत्त्वाची आहे. इतर समाजातील कितीतरी नेते पक्ष बदलतात, कोणाचा जावई दुसऱ्या पक्षात, तर कोणाचा भाऊ, साडू, मेव्हणा, पुतण्या तिसऱ्या चौथ्या पक्षात असतो. तेव्हा मात्र ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्या जातीतील लोकांनी त्यांना कधी विरोध केला नाही त्यांच्यावर टिका केली नाही. यावरून तरी त्यांच्या सामाजिक प्रगल्भतेचा अभ्यास करायला हवा. मग धनगर समाजातच हा एवढा उपद्व्याप का?
       म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक तर एकत्रित या नसेल तर कोणीही कोणत्याही पक्षात जात असेल तर जाऊद्या, संधी मिळत असेल तिथून विधानसभा लोकसभा लढू द्या आपण सर्वांनी सामाजिक प्रगल्भता जोपासून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विधानभवनात आणि संसदभवनात समाजाचा टक्का वाढवूया. परंतु आपल्याच समाजातील नेत्यांवर टिकेची झोड उठवून समाजाचेच वाभाडे काढू नका एवढीच नम्र विनंती.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123