Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 13 August 2022

लोकराज्ञी राजयोगिणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचा आज स्मृतिदिन... ✍️नितीनराजे अनुसे

एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २२७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम... खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world" अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर तथा मुत्सद्दी योद्धा राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी' अहिल्याई होळकर होत. अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेने जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. अहिल्याईंनी प्रजेच्या हितासाठी अनेक कायदे बनवले होते त्यातील महत्वाचे म्हणजे अबला महिलांना सबला बनविण्यासाठी विधवांना त्यांच्या पतीच्या संपत्तीवर असलेला हक्क, निपुत्रिकांना दत्तक घेण्याचा अधिकार, हुंडाबळीच्या विरोधातील हुंडा पद्धत बंद केली, स्वतः मनुस्मृतीच्या रूढी लाथाडून सतीप्रथेला विरोध, अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी तर ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत बारवे बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे. अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील. जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।। ✍️ नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली 8530004123

Thursday 11 August 2022

आजची भारतीय शिक्षणपद्धती आणि आपण... ✍️लेखन - नितीनराजे अनसे

काल परवा माझ्या एका पत्रकार मित्राची फेसबुक वर पोस्ट वाचली फिनलंडमध्ये मूल 7 वर्षांचे झाल्यावर त्याची शाळा सुरू होते. फिनलंडची शिक्षणपध्दती जगात सर्वोत्तम मानली जाते. शाळेचा तास ६० मिनिटांचा असतो त्यात ४५ मिनिटे शिकवणे व पंधरा मिनिटे छोटी सुट्टी अथवा ब्रेक. शाळा सोमवार ते गुरुवार दिवसाचे ८ तास, शुक्रवार दुपारी १ वाजे पर्यंत आणि शनिवारी सुट्टी. फिनलंडमध्ये शालेय शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. पालक कोणत्याही गोष्टीसाठी एक पैसाही देत ​​नाहीत. हे सर्व शिक्षण सरकारी खर्चाने आहे. प्रत्येक मुलाला सरकार कडून मोफत टॅबलेट मिळतो आणि सर्व पाठ्यपुस्तके टॅबलेटवर लोड केलेली असतात जेणेकरून मुलांची दप्तरापासून सुटका होते. शालेय भोजन मोफत असते. ते वैविध्यपूर्ण आणि स्वच्छ असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हवे तेवढे मिळू शकते. देशाच्या शिक्षणातील प्रत्येक गुंतवणूक ही त्याच्या भविष्यातील गुंतवणूक असते. ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. सुशिक्षित राष्ट्र हे अर्थव्यवस्था, आरोग्य शिक्षण आणि न्याय या सर्वांचा गाडा ओढते. भारतात अशी शिक्षण व्यवस्था सुरू व्हायला हवी भारतातील गो गरीब जनेसाठी या शिवाय पर्याय नाही असे त्याचे वैयक्तिक मत होते. परंतु भारत देशामध्ये याउलट चित्र पाहायला मिळते. भारतातील शिक्षणपद्धती ही शिक्षणसम्राटांनी स्वतःची जहागिरदारी बनवून ठेवली आहे. त्यासाठी जबाबदार आहे ती येथील सर्वसामान्य जनता जी १००-२०० रूपयांसाठी स्वतःला विकले गेले जातात जिथं गाढव १०-२० हजार रूपयांना विकले जाते. कर बुडवणारे, कर चोरी करणारे उद्योगपती आणि त्यावरती पांघरूण घालणारे आयकर विभागातील अधिकारी. भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी. डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी बांधलेला सुशिक्षित युवा वर्ग जो राजकारणी नेत्यांना आपला बाप मानतो आणि स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन घेतो ते फक्त भ्रष्ट नेत्यांसाठी आणि समाजमाध्यमावर नको तो वेळ खर्ची घालतो. विकला गेलेला लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना आपण पत्रकार, न्यूज चॅनल (इलेक्ट्रॉनिक मिडिया), प्रींट मिडिया म्हणून ओळखतो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जी एकमेकांशी जोडली गेली आहेत. ज्या देशाची व्यवस्था (System) डळमळणारी असेल त्या विरोधात आवाज न उठवता अन्य देशांमध्ये तेथील नागरिकांना मिळणाऱ्या सुविंधा सारख्या अपेक्षा करू नयेत कारण आपण स्वतः प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी जबाबदार असतो. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. विशेष म्हणजे काही अपवाद सोडले तर पूर्वी सारखे गुरू-शिष्य आजकाल इथे पाहायला मिळत नाहीत आणि पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणारे पूर्वी सारखे पालकही पाहायला मिळत नाही हे आजच्या भारत देशाचे फार मोठे दुर्दैव आहे. या सर्व कारणांमुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय शिक्षणपद्धती ही बॅकफूटवर जाताना दिसत आहे हे नाकारू शकत नाही. यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करून आपल्या देशाप्रती जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. ✍️ नितीनराजे अनसे अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली 8530004123

Tuesday 2 August 2022

पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे

       

माणदेशी सुपुत्र संकेत महादेव सरगर

          पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे माणदेशातील आटपाडी तालुक्याच्या मातीतला तळेवाडी गावचा सुपुत्र म्हणजे सध्या चर्चित असलेला सांगलीतील चहावाल्याचा मुलगा वेटलिफ्टर संकेत सरगर याने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे, त्याचे सुवर्णपदक फक्त एक किलोने हुकले.

         उज्वल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावरती प्रभुत्व गाजवणाऱ्या चक्रवर्ती सम्राट द ग्रेट अशोक पासून होळकरशाहीच्या गौरवशाली इतिहासाचा आणि जाज्वल्य परंपरेचा वारसा लाभलेली ही पोरं भारताला एकटं दुकटं रौप्य पदक नव्हे तर अशी अनेक सुवर्णपदकं देऊ शकतात. परंतु इथे त्यांना गरज त्यांच्यातील टॅलेंट ओळखून मार्गदर्शन करण्याची, गरज आहे सहकार्याची, प्रेमाची आणि आपुलकीची. 

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देणारा संकेत सरगर 

        वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या माणमातीनं आपलं इमान कधीच ढळू दिलं नाही. आम्ही दुष्काळात होरपळलो तरीही या माणमातीनं ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना सि इनामदार असे सातासमुद्रापार विख्यात तथा प्रख्यात साहित्यिक या महाराष्ट्राला परिणामी भारतभूमीला दिले, ११ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आदर्श संसदपटू माजी आमदार स्व भाई गणपरावजी देशमुख उर्फ आबासाहेब, आज कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य पदक देणारा संकेत सरगर सुद्धा याच माणमातीनं दिला पण माणदेशाच्या वाट्याला काय आले? हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर येतं ते म्हणजे बारमाही दुष्काळ... आणि कधीही न संपणारा संघर्ष... जेव्हा सांगली कोल्हापूर ला पूर येतो आणि ओला दुष्काळ जाहीर होतो तेव्हा राज्य सरकारच्या अगोदर याच माणदेशी मातीतील वाघ त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. मात्र पाण्याविना आमची पिकं जळून जातात, जनावरे तडफडून मरतात, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, पायऱ्या नसलेल्या खोल विहीरीतून पाणी काढण्यासाठी जीव पणाला लावून कसरत करावी लागते. तेव्हा कोणीच आम्हाला हातभार लावायला येत नाही म्हणून धडपड आम्ही कधी थांबवली नाही.

पान टपरी चालवणारा ते रौप्य पदक 🏅 (Silver Medal) जिंकणारा जिद्दी योद्धा 

        शेळ्या -मेंढ्या च्या पोटाची खळगी भरण्यासाठी मग भटकंती करावी लागते, भटकंती करत असताना तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा शिव्याशाप, मारहाण सहन करून मग पारंपरिक व्यवसायाला पूर्ण विराम देत महादेव सरगर सारखी अनेक माणदेशी मातीतील माणसं शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होतात तिथेच छोटा मोठा व्यवसाय सुरू करून, चहाचा गाडा, पानाची टपरी सुरू करतात आणि आपल्या पोरांना देशासाठी रौप्य पदक, सुवर्ण पदक मिळावं म्हणून घडवतात. भलेही राज्य सरकार, केंद्र सरकार, इथली प्रशासकीय व्यवस्था माणदेशाच्या दुष्काळ निवारणासाठी काही करू शकत नसेल, नद्या जोड प्रकल्प करू शकत नसतील म्हणून इथला माणदेशी माणूस कधी हरला नाही, दुष्काळाशी दोन हात करत तो नेहमीच जिंकत आला आहे. त्यामुळे एकच काय असे हजारो संकेत सरगर या माणदेशी मातीतून पुढे येतील आणि भारतासाठी पदकांचा पाऊस पाडतील. कष्टातून, संघर्षातून संकेत ला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना आणि आई-वडिलांच तथा गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं परिणामी भारताचं नाव उंचावणाऱ्या या माणदेशी सुपुत्राचे (संकेत महादेव सरगर चे) त्रिवार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

जय मल्हार जय! अहिल्या!! जय यशवंतराजे!!! 

           ✍️नितीनराजे अनुसे

  (अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली)

          📱 8530004123