Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 1 October 2022

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे अथवा तो कोणत्या कुटूंबातील आहे यावरून मत मतांतर करणे उचित नाही तर त्या नेत्याचे कर्तृत्व काय आहे यावरून त्याची ओळख निर्माण होते आणि तेच नेतृत्व सर्वसमावेशक जनतेच्या हिताचे असते आणि त्याचा राज्याच्या परिणामी राष्ट्राच्या उन्नती साठी, जडणघडणीसाठी मोलाचा अर्थातच अनमोल वाटा असतो. त्यापैकीच एक दमदार व्यक्तिमत्त्व असलेले कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी तालुक्याच्या कुशीत वसलेल्या पडळकरवाडी या छोट्याशा खेड्यात गोपीचंद पडळकर यांचा जन्म झाला. ते काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत, तर सर्वसामान्य कुटुंबातून संघर्षाला आवाहने देत इथपर्यंत पोहचलेलं एक उमदं नेतृत्व आहे. इथल्या काही जुलमी राजकीय सत्ता पिपासू प्रस्थापितांनी डोंगराएवढी संकटं उभारून ठिकठिकाणी त्यांना आडवण्याचा, त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरीही कधीही न डगमगता, न खचता निधड्या छातीने त्या संकटांना पायदळी तुडवत, प्रस्थापितांच्या छाताडावर थायथाय नाचत त्यांनी त्यांचा संघर्षरथ आजतागायत कधीच थांबू दिला नाही. 'माझा जन्म संघर्षासाठी झाला असून, येथील अठरापगड जातीतील, तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे' असे ते छातीठोकपणे सांगतात. या महाराष्ट्र राज्यातील तसेच अन्य राज्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद पडळकर आज महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून ओळखले जातात. कधी काळी एखादं वर्तमानपत्र, टी व्ही न्यूज चॅनल गोपीचंद पडळकर साहेब यांची साधी दखलही घेत नव्हते म्हणून त्यांनी कधी धीर सोडला नाही. ते लढत राहिले, समाजासाठी अहोरात्र झगडत राहिले, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात प्रहार करत राहिले आणि तीच वर्तमानपत्रे आणि टी व्ही न्यूज चॅनल आज त्यांच्या मागेपुढे करतात हे त्यांनी अविरतपणे दिलेल्या झंझावाताचे यश आहे. गोपीचंद पडळकर साहेब यांची कोणतीही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया दखल घेत नव्हती तेव्हा त्यांच्यावरती जिवापाड प्रेम करणारा प्रत्येक हाडामांसाचा कार्यकर्ता स्वखर्चाने सोशल मिडिया द्वारे प्रचार प्रसार करत होता आणि आजही करतोय. तेव्हा काहीजण या कार्यकर्त्यांना Paid कार्यकर्ता म्हणायचे, एवढंच नाही तर माझ्यावर सुद्धा काही बिनडोक लोकांनी कुठल्यातरी फाळकूट माणसांच्या सांगण्यावरून Paid कार्यकर्ता म्हणून बिनबुडाचे आरोप केले होते, आज ते मूग गिळून गप्प बसलेत. असो आज महाराष्ट्र राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांची सोशल मिडिया एक क्रमांकावर आहे. इथल्या काही राजकीय नेत्यांनी त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मिडियाची कार्यालय उघडली परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे या महाराष्ट्र राज्यात कुठेही सोशल मिडियाचे ऑफिस नाही तर त्यांच्यावर प्रेम करणारा, माळरानावर मेंढ्या राखणारा, शेतात शेतमजूरी करणारा हा प्रत्येकजण अगदी निःशुल्कपणे पडळकर साहेब यांचा प्रचार प्रसार करतो आणि तेच त्यांचे २४ × ७ खुलं ऑफिस होय. वक्तृत्वाच्या जोरावर अनेक सभा गाजवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जशी तमाम युवकांच्या ह्रदयावर छाप पाडली तशीच त्यांनी विधानभवनात प्रत्येक विषयाला हात घालत अखंड महाराष्ट्रवाशीयांच्या मनाला भुरळ घातली आहे हे त्यांच्या विधानभवनातील भाषणातून दिसून येते. आजपर्यंतच्या इतिहासात छोट्या छोट्या जात समुहाचे प्रश्न कोणी सहसा मांडत नव्हते परंतु आमदार गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी जेव्हा जेव्हा विधानभवनात पाऊल ठेवले तेव्हा तेव्हा गोरगरीब जनतेचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, कलावंतांचे, विधवा स्त्रियांच्या हक्कासाठी प्रश्न उपस्थित करून सरकार दरबारी त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून दुर्लक्षित केलेल्या महापुरुषांचा इतिहास त्यांच्या स्मारकाच्या रूपाने जगासमोर यावा यासाठी देखील त्यांनी विधानभवनात आवाज उठवला. काही स्मारकांसाठी तर त्यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला. आटपाडी खानापूर मतदारसंघांमध्ये त्यांनी तर विकासाचे जाळे विणले आहे जे आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदारांना जमले नाही. तसेच इतर मतदारसंघांमध्ये देखील अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे करून त्यांनी 'बोले तैसा चाले' हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळेच कर्तृत्वातून सिद्ध झालेलं सक्षम नेतृत्व असेच मी म्हणेन. मी पडळकर साहेबांची बाजू का घेतो? मी त्यांच्याबद्दल सतत का लिहितो? मला काहीजणांनी विचारलेल्या या सर्व प्रश्नांची सर्व उत्तरे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या आजपर्यंतच्या कार्यातून त्यांना नक्कीच मिळाली असतील आणि इथून पुढे देखील मिळतील कारण पडळकर साहेब यांच्या राजकारणातील प्रवेशापासून ते आजपर्यंतच्या संघर्षात्मक प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आज त्यांच्यामुळे माझ्यासारख्या युवकांना ताठ मानेने जगण्याची उर्जा मिळते, उमेद येते. आटपाडी तालुक्यात एक काळ असा होता की राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलण्याची कोणी हिंमत करत नव्हते, त्यांच्या विरोधात कोणी आवाज उठवत नव्हते, अन्याय झाला तरी तो निमूटपणे सहन केला जात होता. परंतु गोपीचंद पडळकर साहेब यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तालुक्यातील युवा वर्ग आज जागृत झाला आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मग टेंभू चा पाणीप्रश्न असो, राजेवाडी तलावाच्या उजव्या कालव्याचा प्रश्न असो ज्या ज्या वेळी त्यांनी इथल्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारला त्या त्या वेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सोबत अंगावर केसेस घ्यायला त्यांचे कार्यकर्ते कधी मागे राहिले नाहीत, आणि म्हणूनच प्रस्थापित नेत्यांच्या बुडाला आग लागत होती. मग हा उधळलेला वारू कसा रोखायचा म्हणून हांडग्यापणाचं राजकारण करून शरद पवार यांच्या चेल्यांनी तेव्हा त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्यांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु वायू वेगाने यशाच्या दिशेने धावणाऱ्या या वारूला सहजासहजी अडवण्याची त्यांची लायकी नव्हती हे सिद्ध झाले. पुढे गाडीवर दगडफेक करण्याचे घाणेरडे प्रकार देखील झाले, दगडफेक करणाऱ्यांचे सत्कार करून गुन्हेगारांना आशीर्वाद देणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेका घेणारे पवार घराणे अख्ख्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले. परंतु हा वाघ काही नमला नाही कारण संकटांना सामोरे जाणारे नव्याने इतिहास घडवतात मग ती संकटे नैसर्गिक असोत अथवा इथल्या सत्तापिपासू वृत्तीने बरबटलेल्या माणसांनी निर्माण केलेली असोत. त्या संकटांना निधड्या छातीने सामोरे जायला देखील काळीज लागतं आणि ती धमक, ती रग आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यात आहे. आज १ ऑक्टोबर रोजी दुष्काळात उमललेल्या संघर्षपुत्राचा जन्मदिवस आहे त्यानुषंगाने त्यांच्या लढ्याला अजून बळ येवो, त्यांच्या हातून सर्वसमावेशक जनतेचे कल्याण होवो तथा पुढील राजकीय वाटचालीत घवघवीत यश मिळो हीच श्री बिरोबा चरणी प्रार्थना. महाराष्ट्र राज्याची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना जन्मदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी प्रचंड शुभेच्छा 💐💐💐 जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥ ✍️नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली nitinrajeanuse123.blogspot.com

Monday 26 September 2022

अनुभवाचे बोल...

एकवेळ आयुष्यात शिकलेलं फार काही अनुभवायला मिळत नाही, परंतु आयुष्यात अनुभवलेलं खूप काही शिकवून जातं. ✍️नितीनराजे अनुसे

Saturday 17 September 2022

आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगना भिमाई होळकर... ✍️नितीनराजे अनुसे

आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगना भिमाई होळकर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी सेनानी विरांगणा भिमाई होळकर यांना पुर्वीच्या इतिहासकारांनी जाणूनबुजूण उपेक्षित ठेवलं असा आरोप करायला मला वावगं वाटणार नाही. खरंतर त्यावेळचे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. भारताच्या आधुनिक इतिहासामद्ये झाशीच्या राणीचा उदो उदो करून तिचा इतिहास आम्हासमोर ठेवला पण झाशीची राणी कधीच तलवार घेऊन रणांगणात उतरली नाही तर इंग्रजांशी बंड करुन झुंज देणारी ती राणी लक्ष्मीबाई नसून सेनापती विरांगणा झलकारीबाई होती हा खरा इतिहास आहे. आणि या झलकारीबाईंना देखिल उपेक्षित ठेवायचं काम जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजूनच केलेलं आहे. दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून जगभर ओळखले जाणारे आणि राजा शिवछत्रपति नंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर धुरंदर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर यांना धर्मपत्नी लाडाबाई पासून १७ सप्टेंबर १७८५ कन्यारत्न झाले त्याच विरांगणेची म्हणजेच रणरागीणी भिभाई होळकर यांची आज २२७ वी जयंती. पुण्यात असताना मल्हारराव दुसरे, राजे यशवंतराव व विठोजी होळकर यांच्या डेर्यावर दौलतराव शिंद्यांनी काशीरावच्या मदतीने अचानकपणे पहाटेच्या सुमारास हल्ला केला त्यात मल्हारराव दुसरे गंभीर जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. यशवंतराव होळकर त्या अंधार्या रात्री गर्दीतून कसेबसे बाहेर पडले होते या हल्ल्यात त्यांच्या हातातून तलवार निसटून पडली होती पण यशवंतरावांच्या मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व कन्या भिमाई, तसेच मल्हारराव दुसरे यांचे पुत्र खंडेराव यांना शिद्यांनी कैद करून पुण्यात ठेवले. भिमाईंचे बालपण कैदेतच गेले. होळकांची गादी रहावी का नको यासंदर्भात पेशव्यांशी सल्ला मसलत करण्यासाठी आलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांना शिंद्यांच्या आणि पेशव्यांच्या सैन्यानी युद्धासाठी मजबूर केले. मग हिंदूस्थानातील गाजलेली फौज बाळगणारे यशवंतराव होळकर माघार घेतील हे कशावरून? पेशवे आणि शिंदे यांच्या फौजेकडून युद्धास सुरुवात केल्यानंतर व २५ तोफांची सलामी घेतल्यानंतरच महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आदेशानुसार होळकरी फौजांनी लढायला सुरुवात केली. पुण्याच्या वाणवडी पासून हडपसर पर्यंत दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन बेभान होऊन शिंद्यांच्या सैनिकांना कापत सुटले आणि ती हडपसरची लढाई जिंकून त्यांनी मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व भिमाई यांची सुटका केली पण ज्याच्या नावाने सुभेदारीची वस्त्रे घेऊन राज्यकारभार करायचा होता त्या मल्हारपुत्र खंडेरावांना सोबत घेऊन पेशवे कोकणात पळून गेले होते याचं दुख यशवंतरावांना होतं. भिमाईंस वडिलांप्रमाणे म्हणजेच यशवंतरावांसासरखे घोड्यावर बसून तलवारबाजी, बाणभाले चालवायची आवड होती. कधीकधी तर फजरफटका मारण्यासाठी मुद्दामहून अट्टहास धरून भिमाई आपल्या बाबासाहेबांसोबत जायच्या. महाराजा यशवंतराव होळकर यांनी पेशव्यांच्या दौलतीचा कारभार अमृतरावावर सोपवून इंदौरला निघून गेले तोच पुण्यातून पेशव्यांनी पत्र पाठवून होळकर संस्थान फिरंगी लेकसाहेबाकडे विलीन करावं असं सांगितलं होतं पण लेक साहेब नावाच्या फिरंग्याने उत्तरेत पाय पसरायला सुरवात केली होती आणि हिंदुस्थानातली अनेक संस्थाने ताब्यात घेऊन भारतावर राज्य करण्याचा फिरंग्यांचा डाव यशवंतराव होळकर ओळखून होते. पण इंग्रजांना शरण न जाता प्रत्येक लढाया जिंकत ते इंग्रजांना कापून काढायचे. कधीकधी इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे. भिमाई होळकर ही बुळे घराण्याची सून झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आतच त्यांच्या पतीचे निधन झाले. अशा प्रकारे त्यांच्या पदरी दुख वाढून ठेवलं असताना भिमाई आपल्या वडिलांच्या सैन्यात दाखल होऊन सैन्यांचं नेतृत्व करू लागल्या. कालांतराने यशवंतरावांचे निधन झाल्यानंतर मल्हारराव (तिसरे) यांना गादीवर बसवून यशवंतरावांची दुसरी पत्नी तुळसा राज्यकारभार बघू लागल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विरांगणा भिमाई व मल्हारराव तिसरे हे सैन्यांचं नेतृत्व करू लागले. महिदपूरच्या युद्धापूर्वी माल्कमने यशवंतरावांचे सरदार गफुरखान याला फितवले व ९ नोव्हेंबर १८१७ रोजी होळकर कुटंबियांना ठार मारायचे ठरवले पण यशवंतरावांचा सुरवातीपासूनचा अनुयायी धर्मा याच्यामुळे तुळसाबाईंना ठार मारायचा माल्कमचा प्रयत्न फसला पण गफूरखानने धर्माला ठार करून त्याच्यावरच हा कट उलटवला. स्वातंत्र्यासाठी लढणार्या तुळसाचा अखेर शिरच्छेद करून माल्कमने मृतदेह नदीत फेकून दिला तिकडे महिदपूरचाया युद्धात २२ वर्षाची विरांगणा भिमाई होळकर व ८ वर्षाचा मल्हारराव होळकरांच्या सैन्यांचं नेतृत्व करत सैन्यांना प्रोत्साहन देत होते त्यांचं कौतुक करताना माल्कमने लिहून ठेवलंय "आमच्या देशात असे लढवय्ये का जन्माला येत नाहीत आणि आलेच असते तर आम्ही या जगावर राज्य केलं असतं." महिदपूरच्या युद्धात होळकरांकडे पंधरा हजारांचं घोडदळ व दहा हजाराचे पायदळ होते पण ठरल्याप्रमाणे माल्कमने फितवलेल्या गफूरखानने आपले सैन्य बाजूला करून रणांगणातून पळ काढला. वाघीणीसारख्या भिमाईला फक्त ३००० पेढार्यांसोबत जीव मुठीत धरून रणांगणातून बाहेर पडावं लागलं. यशवंतराव व तुळसाबाई यांच्यानंतर भिमाई यांनी उत्तरेत इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. भिमाई लहानपणापासूनच निर्भिड होत्या त्यांच्यां डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. त्या न डगमगता इंग्रजांशी लढायला सज्ज असायच्या. यशवंतराव होळकरांप्रमाणे भिमाई सुद्दा शिस्तबद्ध आणि तोफासहित सज्ज असलेल्या इंग्रजांना वायूवेगानं कापत सुटायच्या. रणांगणात एक स्त्री सैन्याचं नेतृत्व करुन दुश्मनांना वायूवेगाने कापून काढते आहे हे पाहून माल्कम चक्क आश्चर्यानं तोंडात बोटं घालून बघत बसायचा. गफूरखानने गद्दारी केल्यानंतर विरांगणा भिमाईनं छुप्या पद्धतीनं माल्कमच्या तळावर हल्ले करून, लुटालुट करून माल्कमला अगदी हातघाईला आणलं होतं. माल्कमच्या लष्कराचा दाणागोटा लुटायच, तळावर हल्ले करायचे हे षडयंत्रच भिमाईने रचले होते. इंग्रज अधिकार्यांची पुरती दमच्छाक झाली होती. विरांगणा भिमाईनं हिंदुस्थानातील सर्व संस्थानाच्या राजांना पत्रव्यवहार करून इंग्रजाच्या विरोधात लढण्यास आवाहन केले परंतू सर्व संस्थाने इंग्रजांशी विलीन झाली होती. शेवटी भिमाई सोबत असलेले पेंढारीही माल्कमला फितुर झाले आणि त्यांनी भिमाईला कैद करून दिलं. माल्कमने अशा या रणरागीणीला तुरूंगात डांबून खून केला. रणांगणात कधीही भिमाईला इंग्रज हारवू शकले नव्हते अशा एका स्त्रीला कैद करून ठार मारणं याला कोणतं पौरूषार्थ म्हणायचं?? पण शेवटपर्यंत ही वाघिणी, रणरागीणी हातात तलवार घेऊन स्वातंत्र्यासाठी लढत राहीली. इथल्या जातीयवादी इतिहासकारांना १८५७ च्या उठावातील झाशीची राणी लक्षात राहिली मात्र त्याच्या ३० वर्ष अगोदर इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी इंदौर ची वीरांगना भिमाई दिसली हे या भारताचे फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. होळकरशाहीची दौलत ही रक्त सांडून मिळवलेली होती ती भिमाईंनी रक्त सांडेपर्यंत हातातून जाऊ दिली नाही. आजच्या भारतदेशवाशीयांना आध्यमहिला स्वांतंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाईचा खरोखरच विसर पडला आहे ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज अशा या विरांगणेला २२७ व्या जयंतीनिमीत्त मानाचा मुजरा व विनम्र जय मल्हार! " वीर शेरनी लडनेवाली , रण से हूई सगाई थी । खूब लडी मर्दानी रणमें , वह तो इंदोर की भीमाई थी ।। " जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥ ✍️नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली 8530004123 nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday 13 August 2022

लोकराज्ञी राजयोगिणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचा आज स्मृतिदिन... ✍️नितीनराजे अनुसे

एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २२७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम... खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world" अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर तथा मुत्सद्दी योद्धा राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी' अहिल्याई होळकर होत. अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेने जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. अहिल्याईंनी प्रजेच्या हितासाठी अनेक कायदे बनवले होते त्यातील महत्वाचे म्हणजे अबला महिलांना सबला बनविण्यासाठी विधवांना त्यांच्या पतीच्या संपत्तीवर असलेला हक्क, निपुत्रिकांना दत्तक घेण्याचा अधिकार, हुंडाबळीच्या विरोधातील हुंडा पद्धत बंद केली, स्वतः मनुस्मृतीच्या रूढी लाथाडून सतीप्रथेला विरोध, अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी तर ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत बारवे बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे. अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील. जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।। ✍️ नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली 8530004123

Thursday 11 August 2022

आजची भारतीय शिक्षणपद्धती आणि आपण... ✍️लेखन - नितीनराजे अनसे

काल परवा माझ्या एका पत्रकार मित्राची फेसबुक वर पोस्ट वाचली फिनलंडमध्ये मूल 7 वर्षांचे झाल्यावर त्याची शाळा सुरू होते. फिनलंडची शिक्षणपध्दती जगात सर्वोत्तम मानली जाते. शाळेचा तास ६० मिनिटांचा असतो त्यात ४५ मिनिटे शिकवणे व पंधरा मिनिटे छोटी सुट्टी अथवा ब्रेक. शाळा सोमवार ते गुरुवार दिवसाचे ८ तास, शुक्रवार दुपारी १ वाजे पर्यंत आणि शनिवारी सुट्टी. फिनलंडमध्ये शालेय शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. पालक कोणत्याही गोष्टीसाठी एक पैसाही देत ​​नाहीत. हे सर्व शिक्षण सरकारी खर्चाने आहे. प्रत्येक मुलाला सरकार कडून मोफत टॅबलेट मिळतो आणि सर्व पाठ्यपुस्तके टॅबलेटवर लोड केलेली असतात जेणेकरून मुलांची दप्तरापासून सुटका होते. शालेय भोजन मोफत असते. ते वैविध्यपूर्ण आणि स्वच्छ असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हवे तेवढे मिळू शकते. देशाच्या शिक्षणातील प्रत्येक गुंतवणूक ही त्याच्या भविष्यातील गुंतवणूक असते. ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. सुशिक्षित राष्ट्र हे अर्थव्यवस्था, आरोग्य शिक्षण आणि न्याय या सर्वांचा गाडा ओढते. भारतात अशी शिक्षण व्यवस्था सुरू व्हायला हवी भारतातील गो गरीब जनेसाठी या शिवाय पर्याय नाही असे त्याचे वैयक्तिक मत होते. परंतु भारत देशामध्ये याउलट चित्र पाहायला मिळते. भारतातील शिक्षणपद्धती ही शिक्षणसम्राटांनी स्वतःची जहागिरदारी बनवून ठेवली आहे. त्यासाठी जबाबदार आहे ती येथील सर्वसामान्य जनता जी १००-२०० रूपयांसाठी स्वतःला विकले गेले जातात जिथं गाढव १०-२० हजार रूपयांना विकले जाते. कर बुडवणारे, कर चोरी करणारे उद्योगपती आणि त्यावरती पांघरूण घालणारे आयकर विभागातील अधिकारी. भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी. डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी बांधलेला सुशिक्षित युवा वर्ग जो राजकारणी नेत्यांना आपला बाप मानतो आणि स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन घेतो ते फक्त भ्रष्ट नेत्यांसाठी आणि समाजमाध्यमावर नको तो वेळ खर्ची घालतो. विकला गेलेला लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना आपण पत्रकार, न्यूज चॅनल (इलेक्ट्रॉनिक मिडिया), प्रींट मिडिया म्हणून ओळखतो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जी एकमेकांशी जोडली गेली आहेत. ज्या देशाची व्यवस्था (System) डळमळणारी असेल त्या विरोधात आवाज न उठवता अन्य देशांमध्ये तेथील नागरिकांना मिळणाऱ्या सुविंधा सारख्या अपेक्षा करू नयेत कारण आपण स्वतः प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी जबाबदार असतो. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. विशेष म्हणजे काही अपवाद सोडले तर पूर्वी सारखे गुरू-शिष्य आजकाल इथे पाहायला मिळत नाहीत आणि पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणारे पूर्वी सारखे पालकही पाहायला मिळत नाही हे आजच्या भारत देशाचे फार मोठे दुर्दैव आहे. या सर्व कारणांमुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय शिक्षणपद्धती ही बॅकफूटवर जाताना दिसत आहे हे नाकारू शकत नाही. यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करून आपल्या देशाप्रती जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. ✍️ नितीनराजे अनसे अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली 8530004123

Tuesday 2 August 2022

पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे

       

माणदेशी सुपुत्र संकेत महादेव सरगर

          पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे माणदेशातील आटपाडी तालुक्याच्या मातीतला तळेवाडी गावचा सुपुत्र म्हणजे सध्या चर्चित असलेला सांगलीतील चहावाल्याचा मुलगा वेटलिफ्टर संकेत सरगर याने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे, त्याचे सुवर्णपदक फक्त एक किलोने हुकले.

         उज्वल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावरती प्रभुत्व गाजवणाऱ्या चक्रवर्ती सम्राट द ग्रेट अशोक पासून होळकरशाहीच्या गौरवशाली इतिहासाचा आणि जाज्वल्य परंपरेचा वारसा लाभलेली ही पोरं भारताला एकटं दुकटं रौप्य पदक नव्हे तर अशी अनेक सुवर्णपदकं देऊ शकतात. परंतु इथे त्यांना गरज त्यांच्यातील टॅलेंट ओळखून मार्गदर्शन करण्याची, गरज आहे सहकार्याची, प्रेमाची आणि आपुलकीची. 

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देणारा संकेत सरगर 

        वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या माणमातीनं आपलं इमान कधीच ढळू दिलं नाही. आम्ही दुष्काळात होरपळलो तरीही या माणमातीनं ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना सि इनामदार असे सातासमुद्रापार विख्यात तथा प्रख्यात साहित्यिक या महाराष्ट्राला परिणामी भारतभूमीला दिले, ११ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आदर्श संसदपटू माजी आमदार स्व भाई गणपरावजी देशमुख उर्फ आबासाहेब, आज कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य पदक देणारा संकेत सरगर सुद्धा याच माणमातीनं दिला पण माणदेशाच्या वाट्याला काय आले? हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर येतं ते म्हणजे बारमाही दुष्काळ... आणि कधीही न संपणारा संघर्ष... जेव्हा सांगली कोल्हापूर ला पूर येतो आणि ओला दुष्काळ जाहीर होतो तेव्हा राज्य सरकारच्या अगोदर याच माणदेशी मातीतील वाघ त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. मात्र पाण्याविना आमची पिकं जळून जातात, जनावरे तडफडून मरतात, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, पायऱ्या नसलेल्या खोल विहीरीतून पाणी काढण्यासाठी जीव पणाला लावून कसरत करावी लागते. तेव्हा कोणीच आम्हाला हातभार लावायला येत नाही म्हणून धडपड आम्ही कधी थांबवली नाही.

पान टपरी चालवणारा ते रौप्य पदक 🏅 (Silver Medal) जिंकणारा जिद्दी योद्धा 

        शेळ्या -मेंढ्या च्या पोटाची खळगी भरण्यासाठी मग भटकंती करावी लागते, भटकंती करत असताना तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा शिव्याशाप, मारहाण सहन करून मग पारंपरिक व्यवसायाला पूर्ण विराम देत महादेव सरगर सारखी अनेक माणदेशी मातीतील माणसं शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होतात तिथेच छोटा मोठा व्यवसाय सुरू करून, चहाचा गाडा, पानाची टपरी सुरू करतात आणि आपल्या पोरांना देशासाठी रौप्य पदक, सुवर्ण पदक मिळावं म्हणून घडवतात. भलेही राज्य सरकार, केंद्र सरकार, इथली प्रशासकीय व्यवस्था माणदेशाच्या दुष्काळ निवारणासाठी काही करू शकत नसेल, नद्या जोड प्रकल्प करू शकत नसतील म्हणून इथला माणदेशी माणूस कधी हरला नाही, दुष्काळाशी दोन हात करत तो नेहमीच जिंकत आला आहे. त्यामुळे एकच काय असे हजारो संकेत सरगर या माणदेशी मातीतून पुढे येतील आणि भारतासाठी पदकांचा पाऊस पाडतील. कष्टातून, संघर्षातून संकेत ला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना आणि आई-वडिलांच तथा गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं परिणामी भारताचं नाव उंचावणाऱ्या या माणदेशी सुपुत्राचे (संकेत महादेव सरगर चे) त्रिवार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

जय मल्हार जय! अहिल्या!! जय यशवंतराजे!!! 

           ✍️नितीनराजे अनुसे

  (अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली)

          📱 8530004123

Tuesday 21 June 2022

"झुंज" दिलीस तु आता "झेप" घे ... ✍️नितीनराजे अनुसे


हेमंत बिरा मुढे इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% गुण मिळवून समाजासमोर आदर्श ठेवणारा शेंडगेवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथील होतकरू विद्यार्थी 

        तसं पूर्वीपासूनच आमच्या हातात लगाम आलेत, मग ते परंपरेने असो अथवा स्वकर्तृत्वावर, स्वबळावर, जिद्ध तथा चिकाटीच्या जोरावर आमच्या पूर्वजांनी इथल्या जुलमी व्यवस्थेला लावलेले लगाम असोत... आणि हो त्याला इतिहास साक्षी आहे. तद्नंतर आमच्या बापजाद्यांच्या अज्ञानामुळे, भोळ्याभाबड्या स्वभावामुळे आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेल्या भटकंती दरम्यान अर्ध्या आयुष्याचं ओझं वाहणाऱ्या घोड्यांचे लगाम तेवढे हाती राहिले. पण आम्हाला कधी लगाम खेचायची गरजच भासली नाही कारण घोड्यावर मांड टाकली तर घोडे देखील आपोआपच उधळतात आणि वायू वेगाने धुरळा उडवत पाहतो न पाहतो तोच क्षणात ध्येयाकडे झेप घेऊन निघून जातात.
         हेमंत बिरा मुढे आज परिस्थितीशी "झुंज" देत इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% मिळवून तु सुध्दा अशीच एक ध्येयवेडी "झेप" घेतली आहेस की तुझ्या यशाकडे पाहून सर्वांच्याच माना उंचावल्या आहेत. शेळ्या -मेंढ्यांची पोटं भागली तर आपली पोटं भागतील आणि आपली लेकरं दोन शब्द शिकली तर आईबापाला सुख लावतील हे स्वप्न उराशी बाळगून काट्याकुट्याच्या वाटा तुडवून, अनवाणी पायानं दगडधोंड्यातून, कड्याकपाऱ्यांतून डोंगरदऱ्यांतून रक्तबंबाळ पायानं ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता दिवसरात्र मेंढ्यांचे रक्षण करणाऱ्या आई बापांनी पायाच्या पार नडग्या वाळवून घेतल्या त्यांची आणि त्यांनी केलेल्या कष्टाची आज तु किंमत राखलीस गड्या... 
         शेळ्या -मेंढ्या घेऊन भटकंती करताना कधी काय परिस्थिती ओढवेल त्याचा काही नेम नसतो हे मी देखील स्वानुभवातून चांगलेच ओळखतो. परिस्थिती माणसाला कसं जगायचं ते शिकवते हे ओळखून तु आज दहावीच्या परिक्षेतून दाखवून दिले आहेस. पण एवढ्यावरच आता थांबायचं न्हाय गड्या, तुला अजून खूप संघर्ष करायचाय. तसाही संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलाय आणि तो आपण कोळून प्यायलो आहे. आज तु जे यश संपादन केले आहेस त्याचे तुझ्या आईवडिलांच्या कष्टाला, शाळेतील शिक्षकांच्या कष्टाला, मार्गदर्शनाला आणि तुझ्या प्रचंड जिद्धीला मिळालेलं फळ आहे. अज्ञानी परंपरेने चालत आलेल्या काळोख्याच्या वस्तीत परिस्थितीच्या छाताडावर नाचून भविष्यात तु अशीच उज्वल तथा उत्तुंग भरारी घेऊन यशाच्या शिखरावर तुझ्या ज्ञानरूपी उजेडाचा झेंडा डौलाने फडकव जेणेकरून हा भोळा भाबडा समाज, समाजातील युवा पिढी तुझ्या पाऊलांवर पाऊल ठेवून त्या यशाच्या शिखरावर पोहोचेल. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, परंतु यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अथांग पसरलेल्या आकाशाला पायदळी तुडवण्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा 💐💐💐
         ✍️नितीनराजे अनुसे
(तुझ्यासारखाच एक मेंढपाळ पुत्र)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली


Saturday 9 April 2022

माझ्या सहचारिणीस लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा 💐💐💐... ✍️नितीनराजे अनुसे

माझ्या सहचारीणीस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
दूर असो अथवा जवळ, तरीही काळजी करतेस रात्रंदिनी ।
प्रेमाचा अथांग सागर असणारी अशी तु माझी अर्धांगिनी ।।

सातजन्माची शपथ घेऊनी हात दिलास तु मज हाती ।
प्रतिज्ञेला अंगीकृत करून सुख-दुःखातही तु माझ्या सोबती ।।

गुणदोषांसह स्विकारलेस गं सहचारिणी तु मजला ।
प्रत्येक संकटातही लाभते तुझीच गं साथ मजला ।।

दुःखातही संकटांना तोंड द्यायला बनतेस तु रणरागिणी ।
परिस्थीतीलाही लाजवतेस अशी पत्नी माझी स्वाभिमानी।।

सासू-सासऱ्यांनाही आपलंसं केलंस तु माता-पिता समजूनी ।
हसून-खेळून राहतेस नातेवाईकामध्ये कसे येते उमजूनी ।।

नशिबवान मी मला मिळाली, तु जणू अहिल्या माझी गुणी।
जन्मोजन्मी तूच मिळू दे, प्रार्थना मल्हारी मार्तंड चरणी ।।


Happy 5th Anniversary of Marriage to My Sweetheart
-Nitinraje Anuse

Saturday 19 March 2022

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा... ✍️नितीनराजे अनुसे

खरंतर ६-७ वर्षांपूर्वी लिहलेला हा ब्लाॅग https://nitinrajeanuse123.blogspot.com/2015/12/blog-post_14.html आज मुद्दामहून पुन्हा प्रकाशित करतोय.... वस्तुस्थिती अजून काही बदललेली दिसतच नाही. पिवळं वादळ कुठेतरी क्षमलं आहे, ती धमक, ते मोर्चे सगळे मूग गिळून गप्प बसले आहेत. आरक्षणाचा ब्र ही आजकाल ऐकायला भेटत नाही. सगळीकडे शांतता आणि शांतताच... पण त्या भयाण शांततेत मनात उठलेले वादळ कसं शांत बसणार म्हणूनच आजचा हा उपद्व्याप... डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच “धनगर” ऐवजी “धनगड” (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ७०- ७५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६० ते ७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणाऱ्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला खरंतर जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी पाठीमागचे आणि सद्याचे राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल परंतू झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाचं कसं होईल हे राम जाणे? ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली. गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित व्यवस्थेने आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोऱ्यात कुठेही पहावयास मिळत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणाऱ्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला, पिचडला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटनेची मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का? एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो. जसे Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते, Hawrah चे हावडा होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा. आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दरच पुढे होते. थोडक्यात काय तर चोर तर चोरी करायच्या हेतूनेच येतो आणि चोरी करणे त्याचा धर्म मग चोरालाच स्वतःच्या घरात चोरी करण्यासाठी मदत करणारे आणि त्यांना स्वतःच्या काहीतरी स्वार्थी हेतूंसाठी त्यांना उचलू लागणारे महाबहाद्दर आमच्या समाजात जन्माला येतात हे आमच्या समाजाचं दुर्देव... राज्यघटनेतील आदिवाशी असल्याचे निकष:- राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे. 1. धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत. (मग धनगर समाज शेळ्या मेंढ्या राखतो, गाई-म्हैसी पाळतो आणि जोडव्यवसाय म्हणून शेती पण करतो) 2. आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये. 3. संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत. 4. भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर बांधून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा. 5. लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे. संघटितपणे लढाई महत्वाची :धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिले असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणाऱ्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती. आज आदिवाशी समाजातील काही पोरं कोणाच्यातरी सांगण्यावरून लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणाऱ्यांपैकी नाहीये. जर मनात आणलं तर क्षणात उध्वस्त करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा. खरी चूक कोणाची? देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे राज्य सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो. धनगर समाजात नेतृत्वाचा अभाव आहे शिवाय जे जे नेतृत्व करत आहेत ते देखिल समाजाचे भांडवलीकरण करून स्वताचा स्वार्थ साधत आहेत अशीच परिस्थिती आजही पाहायला भेटते आहे. समाजाच्या नावावरती ज्यांना आमदारक्या, मंत्रीपदं मिळाली, खासदारकी मिळाली त्यांना कधी समाजाची आठवण झालीच नाही. अगोदरच्या कॉंग्रेस-रा.कॉंग्रेसची तर मानसिकताच नव्हती त्यात भाजप सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्येच आरक्षणाची तरतुद करू म्हणणाऱ्या फसणवीसांचा ५ वर्ष उलटून गेली तरी अजून अभ्यास चालूच होता त्यात देखिल गरज नसताना TISS चे भूत मानगुटीवर बसवले त्याला धनगर समाजातील संबंधित निष्क्रिय नेते जबाबदार आहेत. आणि तेच नेते चांगभलं बिरोबा म्हणत आरक्षणाचा खेळखंडोबा करत बसलेत. आणि आता तीन तिघाडी काम बिघाडी सरकार सत्तेवर आले असले तरी त्यांची काही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे समाजाचा आक्रोश अजून दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या सवलती अजून समाजाला न मिळाल्याने समाजाचे वाटोळे झाले आहे मग ते लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी बुद्धीजीवी वर्ग झटत असताना झगडत असताना समाजाची बाजू मांडणारेच लेखक हे विनाकारण बुद्धी पाजळवत आहेत असे मत समाजातील काही नेत्यांची धोतरं सांभाळणाऱ्यांचे आहे ते खरंतर चुकीचे ठरते असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही. कदाचित माझ्या या वाक्याचा काहीजनांना राग येईल पण मला त्याची पर्वा नाही. कारण समाजापेक्षा कोणतीही व्यक्ति थोर नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय त्यांना योग्य समाजप्रबोधनाची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तरच समाज प्रगतीपथावर वाटचाल करेल... 
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!! 
         ✍️नितीनराजे अनुसे 
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            +919531966943 
 nitinrajeanuse123.blogspot.com

Wednesday 16 March 2022

इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती

 

इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार राजे मल्हारराव होळकर
दि.१६ मार्च २०२२

      सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत शिवछत्रपतींनी उभा केलेल्या मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या तसेच त्याचा विस्तार वाढवत आजच्या पाकिस्तानातील पेशावर, अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२९ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...

एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच.... निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.


मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायची. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १८ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १९ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर स्वतंत्रपणे माळव्याचा राज्यकारभार पाहत होत्या आणि महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".   

          सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय. ज्या लोकांना आपला इतिहासच माहित नाही, आपण कोण होतो त्याची त्यांना जाणीव नाही अशी लोकं भविष्यात दुसऱ्यांची चाकरी आणि गुलामगिरी करू शकतात पण इतिहासाचा वसा आणि वारसा जपू शकत नाहीत. त्यामुळे आजच्या युवा पिढीसमोर आवाहन आहे की एकेकाळी राजा समाज असणाऱ्या आपल्या जमातीला इतिहास कोळून कोळून पाजावा लागेल तेव्हा आणि तेव्हाच आपण प्रगती करू शकतो नाहीतर दुसऱ्यांची धोतरं बडवत बसाल. आज १६ मार्च १६९३ हा दिवस म्हणजे तमाम मराठेशाहीचा, मल्हारशाहीचा एक नवीन सुर्योदय म्हणाल तरी ऐतिहासिकदृष्ट्या ते वावगं ठरणार नाही. तसेही काही ब्रिटिश लेखकांची री ओढत इथल्या मातृभूमीमधील काही नालायक तथा जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास मलिन करण्याचे पाप केले. परंतु कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी सुर्य उगवायचा काही थांबणार नाही तशाच प्रकारे चुकीच्या इतिहासकारांनी कितीही चुकीचा इतिहास लिहिला तरी समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समोर आल्याशिवाय राहणार नाही. अठराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या आणि मराठेशाहीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रणझुंजार अशा रणमर्दाची आज ३२९ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार...

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥

         ✍️नितीनराजे अनुसे✍️

   अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1827627237429824&id=305578499634713