Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 11 September 2018

रामभाऊ लांडे म्हणजेच... ✍️नितीनराजे अनुसे

रामभाऊ लांडे म्हणजेच,
धनगर समाजाला मिळालेला "कोहिनुर हिरा"
        सामाजिक चळवळीमधील माझ्या दृष्टीक्षेपातील आजपर्यंतचं अनन्यसाधारण, मनमिळाऊ, अभ्यासू तसेच परखड व्यक्तिमत्त्व म्हंटलं तर नकळतपणे रामभाऊंचेच नाव येते. धनगर समाजाचे प्रबोधन आणि समाजजागृती यामध्ये त्यांनी खरंतर जीव ओतून दिला आहे. होळकरशाहीचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्र राज्यभर आज त्यांची ओळख आहे. जेष्ठ साहित्यीक आदरणीय होमेश भुजाडे सर तसेच थोर साहित्यिक संजय सोनवणी सर यांच्या पाठोपाठ होळकर शाहीचा इतिहास उकरून समाजाच्या पुढ्यात मांडण्यासाठीच जणू काय रामभाऊंनी शपथ घेतलेली असावी. शिवाय धनगर आरक्षण चळवळीमध्ये देखील आदरणीय रामभाऊ लांडे यांचे मोलाचे योगदान आहे. सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा असो अथवा समाजावर जिथे कुठे अन्याय होत असेल तर रामभाऊ लांडे साहेब तिथे पोहचून शहानिशा करत असतात व समाजावर, समाजातील माता-भगिनींवरती होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडतात. प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेल्या या परखड व्यक्तिमत्त्वाबद्दल अर्थातच कोहिनूर हिऱ्याबद्दल मी लिहावे तेवढे कमीच आहे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समाजबांधवांना निस्वार्थीपणाने समाजासाठी लढणाऱ्या, झटणाऱ्या आणि झगडणाऱ्या या कोहिनूर हिऱ्याची चांगलीच पारख आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस त्या निमीत्ताने त्यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday 8 September 2018

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते? :नितीनराजे अनुसे

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते?
                       लेखन :- ✍️नितीनराजे अनुसे
     काल परवाच्या वर्तमानपत्रात मला वाचायला मिळाले की ५ सप्टेंबर रोजी जो शिक्षकदिन देशभर साजरा झाला त्यामध्ये शिक्षकांनी सरकारकडे संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. खरंतर भारत देशाव्यतीरिक्त अन्य काही देशांमध्ये गुरूंना (शिक्षकांना) सर्व क्षेत्रात व्ही आय पी दर्जा दिला जातो  परंतु त्याउलट भारतातील शिक्षकांना संरक्षण मिळावे अशी मागणी का करावी लागली? याचा विचार करत असतानाच गुलामांचा मुक्तिदाता म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे असे अमेरिकेचे ख्यातनाम माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक राष्ट्राध्यक्ष नव्हे तर एका वडिलांच्या नात्याने लिहलेले पत्र मला आठवले आणि त्यातील उपदेशात्मक शब्द आजच्या काळात उचित ठरणारे आहेत. ते पुढीलप्रमाणे...
        "अजून त्याला खूप शिकायचे आहे. प्रत्येक माणूस प्रामाणिक आणि सत्यवचनी असू शकत नाही हे मी जाणतो; पण शक्य असेल तर, पुस्तकांमध्ये किती जादू असते हे त्याच्या लक्षात आणून द्या. तसेच, निसर्गाच्या अनाकलनीयतेबद्दल विचार करायला त्याला वेळ द्या. पक्षी कसे उडतात, सूर्यप्रकाशात मधमाशा कशा गुणगुणतात आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरावर फुले कशी फुलतात, याचा विचार करायला त्याला प्रवृत्त करा. दुसऱ्याची फसवणूक करून, लबाडी करून यश मिळवण्यापेक्षा अपयशी झालेले चांगले, हे त्याला शिकवा. त्याचे विचार सगळ्या जगाने जरी मान्य केले, तरीही त्याला मनापासून काय वाटते यावरच विश्वास ठेवायला त्याने शिकलेच पाहिजे. सभ्य माणसांशी सभ्यतेने वागायचे आणि असभ्य माणसांशी कठोरपणे वागायचे, हे त्याला शिकवा. सामान्य लोकांच्या कळपात मेंढरासारखे न राहता, त्या गर्दीपासून वेगळा एकटेपणाने तो ताठ उभा राहू शकेल, एवढा त्याला कणखर बनवा. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायचे; पण त्यातले जे म्हणणे सत्याच्या कसोटीवर उतरणारे आणि योग्य असेल, तेच स्विकारायचे हे त्याला शिकवा.
         समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा हसतमुखाने सामना करायचा आणि डोळ्यातून आपसूकच ओघळणाऱ्या अश्रूंची शरम बाळगायची नाही, हे त्याला शिकवा. तऱ्हेवाईक माणसांशी जशास तसे वागायला आणि साखरपेरणी करत बोललेल्या शब्दांपासून सावध राहायला त्याला शिकवा. त्याचे सामर्थ्य आणि त्याची बुद्धी त्याला त्याने महत्त्वाचे स्थान दिलेच पाहिजे; पण कुठल्याही परिस्थितीत त्याने आपले मन आणि आत्मा यांची फसवणूक करता कामा नये. स्वतःचे म्हणणे, वागणे बरोबर आहे याची त्याला खात्री असेल, तर त्याविरुद्ध उठवल्या जाणाऱ्या गदारोळाकडे त्याने दुर्लक्ष करायला हवे, हे त्याला समजावून सांगा. त्याच्याशी हळूवारपणे वागा; पण त्याला अवाजवी संरक्षण देऊ नका; कारण फक्त दु:खात आणि कठीण प्रसंगातच माणसातले उत्तम गुण झळाळून उठू शकतात.
       त्याला इतका धीट, निर्भय बनवा की, प्रसंगी तो त्याचा आवाज उठवू शकेल आणि स्वतःची मर्दुमकी गाजवण्यासाठी निश्चयपूर्वक  प्रयत्न करेल. त्याला हेही शिकवा की, त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, म्हणजे 'माणुसकी'वर तो विश्वास ठेवेल.
       माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्या खूप आकांक्षा आहेत, त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या बाबतीत तुम्ही मला काय मदत करू शकता, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे.
      माझा मुलगा हा एक गोड आणि उत्तम मुलगा आहे, यात शंकाच नाही."
                     -अब्राहम लिंकन
         कधीकाळी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुसेवाडी (निंबवडे) ता.आटपाडी जि.सांगली या शाळेत असताना गुरूजींनी भिंतीवर टांगलेल्या भल्यामोठ्या चार चार्टवरतीचं हे अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहलेले पत्र आणि त्यावरची अक्षरे आज नकळतपणे आठवली. एक पालक अर्थातच वडील या नात्याने राष्ट्राध्यक्ष असताना अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना उपदेश केला होता. मात्र  दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या, गावोगावी भटकंती करणाऱ्या आमच्या आई-वडिलांनी खरंतर शाळेचे तोंड कधीच पाहिले नव्हते अथवा अशाप्रकारचे पत्र त्यांना कोणी ऐकवले नव्हते तरीही त्यांचा शाळेतील गुरूजींवरती/मुख्याध्यापकांवरती एवढा विश्वास होता की गुरूजीच आपल्या पाल्याला उत्तम ज्ञान देऊ शकतात जे आपल्या पाल्याला व्यवहारीक जीवनात उपयोगी पडेल. त्या काळात जर पाल्याने अर्थातच मुलाने/मुलीने घरी अथवा इतरत्र कुठेही आणि काहीही चूक केली, बेशिस्तपणे वागला/वागली तर पालक स्वतःहून शाळेत येऊन गुरूजींकडे तक्रार करून त्या पाल्याला शिक्षा द्यायला सांगत होते. शिक्षकांनी शिक्षा दिल्यानंतर पाल्य पुन्हा तशी चूक करणे अथवा बेशिस्तपणे वागणे शक्यच नव्हते  कारण त्या काळात शिक्षकांना(गुरूजींना) पालकांचा पाठिंबा होता आणि त्यातूनच शिस्तबद्ध विद्यार्थी घडत होते. परंतु त्या तुलनेत आजच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत काही बदल झाल्याची जाणीव न कळतपणे होऊन जाते. आजकाल जर शिक्षकांनी (सरांनी) जर विद्यार्थ्यांना केलेल्या चुकीबद्दल शिक्षा दिली अथवा अभ्यासासंदर्भात विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकावे म्हणून शिक्षा दिली तर तो विद्यार्थी पालकांकडे तक्रार करतो आणि पाल्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांला का शिक्षा केली असा जाब विचारला जातो. शिवाय कधीकधी 'आमचा मुलगा शिकू अथवा न शिकू तुम्हाला पगार मिळतोय ना? कमी तर होत नाही ना? पुन्हा जर आमच्या मुलाल/मुलीला हात लावाल तर बघा? अशी धमकी देखील दिली जाते तेव्हा शिक्षक हा नावासाठीच 'गुरू' म्हणून शिल्लक राहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कारण आजच्या पालकांचा जर शिक्षकांना पाठिंबा नसेल आणि स्वतःच्या पाल्यांना पाठिंबा असेल तर मग  शिक्षकांनी (गुरूंनी) काय फक्त पगारासाठी नोकऱ्या करायच्या का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात गोंधळ घालून बसलाय...
🙏माझ्या सर्व गुरूजनांना आणि सर्व पालकांना समर्पित🙏
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
https://nitinrajeanuse123.blogspot.com  

Wednesday 5 September 2018

माझा महाराष्ट्र तरसला... ✍️किर्ती नितीनराजे अनुसे

हा हा म्हणता म्हणता
तु केरळमध्येच बरसला....
        पावसा तुझ्या एका थेंबासाठी
        माझा महाराष्ट्र तरसला,
        माझा महाराष्ट्र तरसला....
नको नको म्हणता म्हणता
तु इथे बेभान होऊन पडला...
पण पाण्यावाचून माझा महाराष्ट्र
तिथे धाय मोकलून रडला...
        असला कसला रे न्याय तुझा
        करितोस उगाचि भेदभाव
        आता तुच सांग पावसा मला
        काय ठेऊ मी तुझे नाव...?
डोकं खूपसून गुडघ्यामध्ये
ढसा-ढसा रडतोय शेतकरी बाप...
मग तूच सांग आता आम्हाला
आमच्याकडून काय झाले रे पाप....
        बरसलास तु इथे असा...
        विस्कळीत केलेस जनजीवन
       मग कसे काय आम्ही म्हणू
       पाणी हेच आहे जीवन....
अवखळ होऊन एकाच ठिकाणी
बरसनं तुझं झालं आहे अति,
एकदा जरा जाऊन बघ माझी शेती
अजूनही कोरडीच आहे तेथील माती....
      भेगाळलंय रान सारं,
      थेंबासाठी तरसून झालंय तप्त...
      तरीही तु घेतली उडी इकडे,
      अन् देवाची नगरी तु केलीस उध्वस्त....
                -किर्ती नितीनराजे अनुसे
                     नितीनराजे अनुसे

Sunday 2 September 2018

आमखासवरील धनगरांच्या भुकंपाचे दिल्लीला हादरे : नितीनराजे अनुसे


औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ऐतिहासिक मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब.
आमखासवरील धनगरांच्या भूकंपाचे  दिल्लीला हादरे...
                         ✍️नितीनराजे अनुसे
        एकेकाळी महाराष्ट्र राज्याच नव्हे तर अखंड भारत देशभर प्रशासन आणि राजकारभार करणारी अर्थातच राजा समाज असणारी धनगर जमात आज आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहे झटत आहे आणि झगडत आहे. कोणीही उठले की सुटले आंदोलन मोर्चे करायला काही दुधखुळे नाहीत... त्यापाठीमागे प्रचंड तळमळ आणि अन्यायाच्या विरोधातील प्रचंड चीड असते आणि त्याचेच ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथील आमखास मैदानावर एकच वज्रमुठ घेऊन एकवटलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज. धनगरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गेल्या ७० वर्षांपासून या जमातीवर विनाकारण  वारंवार अन्याय व अत्याचार होत राहिला त्यास आजपर्यंतचे राज्य सरकार परस्पर कारणीभूत असून धनगर जमातीला त्यांच्या न्याय व हक्कापासून दूर ठेवणे यासारखा दुसरा मोठा देशद्रोह कोणताच नाही. 
समतेच्या पिवळ्या झेंड्याचे ध्वजारोहण करताना जेष्ठ समाजबांधव बल्लाळ महाराज

        शुक्रवारी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे जो ऐतिहासिक मोर्चा झाला त्या मोर्चाच्या अगोदर उलट-सुलट चर्चा होताना दिसत होत्या कोणी महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तम जानकर साहेब यांना भाजपचे दलाल म्हणून संबोधत होते तर कोणी भाजपची तितरं म्हणून त्यांचा उल्लेख करत होते. असो,  प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा संविधानिक अधिकार आहे. परंतु त्यांच्या आरोपाचे खंडन करण्याची मला काही गरज वाटत नाही कारण ते मोर्चा पाहून अथवा मोर्चामधील भाषण आणि उपस्थित जनसमुदाय यातून त्याचे उत्तर संबंधित समाजबांधवांना मिळालेच असेल. धनगरांचा मोर्चा रोखण्यासाठी राज्यसरकारला प्रशासकीय व्यवस्थेची गरज भासते असे का? मग तिथे रेल्वे विभाग असो, पोलिस सेवा अथवा प्रशासन विभाग असो... त्या विभागात धनगर समाजाची पोरं/पोरी जर IAS/IPS असती तर धनगर समाजाला आंदोलन करायची गरज कधी पडली नसती आणि आंदोलकर्त्यांना रोखायची देखील गरज सरकारला भासली नसती. दुसरा कोणता अभ्यास करत बसता वरील गोष्टीचा आणि घटनेचा अभ्यास त्या (सुज्ञ?) मुख्यमंत्र्यांनी करावा ज्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करायला रेल्वे प्रशासनाला भाग पाडले.
ड्रोन कैमरा द्वारे घेतलेले छायाचित्र
आमखास मैदानावर उपस्थित असलेला विराट धनगर समाज

      खरंतर औरंगाबादच्या आमखास मैदानावर जेवढा धनगर समाज उपस्थित राहिला होता तो एकूण लोकसंख्येच्या १०% देखील नव्हता कारण धनगर समाजातील जवळपास ५०% धनगर जमात आजही शेळ्या-मेंढ्या राखतेय तर ३०% धनगर समाज शेतीवरती अवलंबून आहे, १६-१७% धनगर समाज  छोट्या मोठ्या नोकऱ्या तर ३% धनगर समाज शासकीय नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्रात कार्यरत आहे. कोणत्याही मोर्चात माझा सर्वच मेंढपाळ बांधव सहभागी होऊ शकत नाही तर नोकरदार वर्ग महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार होता परंतु आंदलनाची दाहकता, पार्श्वभूमी तथा आक्रमता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या दळभद्री सरकारने मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक तसेच नागपूर वरुन औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून आंदोलन हानून पाडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी वाटेल त्या कुरघोड्या केल्या. हे आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचे थोतांड देखील त्यांनी माजवले परंतु प्रसतापितांचे ऐकून हार मानतील ते धनगर कसले? मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या बसने, मोटारसायकलवरुन धनगर समाजबांधव औरंगाबाद येथील आमखास मैदानावर पोहचले आणि महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रयत्नाला त्यांच्या तळमळीला यश आले आणि अखेरच्या धनगर आरक्षण लढ्याचा औरंगाबाद येथील आमखास मैदानावरील मोर्चा यशस्वी झाला. त्याबद्दल प्रत्येक स्वाभिमानी धनगर समाजबांधवांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तरीही एवढ्यावरच भागणार नाही तर धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या सवलती जोपर्यंत धनगर समाजाला मिळत नाहीत आणि अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (S T Certificate) जोपर्यंत धनगर समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. तोपर्यंत सरकारला बेजार करून त्यांच्या नाकीनऊ आणून सोडा. महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर जी जमात आहे ती दुसरी तिसरी कोणती धनगड जमात नसून ती फक्त धनगर हीच जमात आहे त्यामुळे लक्षात ठेवा या भारतामध्ये भिक मागून तुम्हाला कधीही काहीच मिळत नाही जर पाहिजेच असेल तर लाथ घालून हिसकावून घ्यायची सवय धनगर समाजाने लावून घेतली पाहिजे. 
महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब

            गेल्या दोन महिन्यांपासून घरदार सोडून गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब अहोरात्र तळमळीने पोटतिडकीने समाजासाठी पायाला भिंगरी लावून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले आणि झगडले प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजबांधवांनी देखील हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून तन मन धनाने मदत केली. धनगर समाजाचं दैवत असलेले आदरणीय आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांच्या ऐवजी मोर्चाला उपस्थित असलेले धनगर समाजातील जेष्ठ व्यक्ति आदरणीय शिवाजी बल्लाळ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाचा मोर्चा पार पडला हे मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणत्याही जाती-धर्माला न दुखवता, कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय मालमत्तेला हानी न पोहचवता अद्भुतरम्य तथा ऐतिहासिक मोर्चा पार पडला याचे श्रेय प्रत्येक धनगर समाजबांधवांना जाते. महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या रूपाने समाजाला खरंतर पुन्हा एक क्रांतीसुर्य मिळाला थोडक्यात सांगायचे झाल्यास युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामध्ये आम्ही क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही जण म्हणत होते की गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तम जानकर साहेब यांना आमदार खासदार व्हायचे असेल म्हणून त्यांना आता समाज आठवला. अरे मग तुम्ही त्यांच्याच भोवती घिरट्या मारुन कशाला भुंकत बसताय, होऊ द्या ना त्यांना आमदार खासदार आणि तुम्ही पण व्हा. या महाराष्ट्र राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत तुम्हाला वाटेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवा सर्व धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे. कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १०० तरी आमदार आणि खासदार धनगर समाजातून विधानसभा आणि संसदभवन मध्ये जायला हवेत. आपल्याच माणसांचे पाय ओढत बसण्यापेक्षा खेकडा प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्याच माणसांना सपोर्ट करा तरच समाजावरील अन्याय व अत्याचार थांबेल.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com