ज्या धनगर समाजानं ५००० वर्षापुर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरं आज धनगर समाजापर्यंत पोहचली नाहीत हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. ती अक्षरं आमच्यापर्यंत का पोहचली नाहीत? याचा उलगडा आम्ही कधी केलाच नाही. तितका विचार करण्याइतपत आम्ही सक्षम आहोत तरी कुठे? इंडोनेशिया मध्ये धनगर समाजातील एका मेंढपाळाने लोहचुंबकाचा शोध लावला त्या चुंबकीय शक्तीच्या आधारे आजच्या तंत्रज्ञानाने जगात एवढी प्रगति केली की प्रत्येक क्षेत्रात लोहचुंबाकाचा सर्रास वापर केला गेला आणि वैज्ञानिक क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवला.
खरंतर धनगर समाजाने अक्षरांचा शोध लावला, लोहचुंबकाचा शोध लावला, जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणारा आद्य मौर्य सम्राट राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी समृद्ध आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहिले, तद्नंतर राजा बिंदुसारा यांचा पुत्र म्हणजेच राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू राजा सम्राट अशोक यांनी भारताच्या दक्षिणेकडील काही भाग वगळता आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर अफगानिस्तान सह इशान्येकडील नेपाळ, भूटानपर्यंतचा प्रदेश एका छत्रीखाली एकत्रित आणला होता. पाकिस्तानातील अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी कर्मयोगिणी महाराणी अहिल्यामाई होळकर, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व शिवाजी महाराजानंतर राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर अर्थातच भारतीय नेपोलियन बोनापार्ट. वीरांगणा भिमाई होळकर, धनगर समाजाला हाक देऊन जागे करणारे लढवय्ये स्व बी के कोकरे साहेब व अन्यायाविरोधात आसूड उगारणारे आणि आजच्या तरूणांना लाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके आप्पा अर्थातच बोरगावचा ढाण्यावाघ बापू बिरू वाटेगावकर.
धनगर समाजाचा असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास जर आम्ही अभ्यासला तर आजच्या धनगर समाजाबांधवांच्या मनातील न्यूनगंड दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकेच सत्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाचा कधीही विकास होत नाही". धनगर समाजाच्या बाबतीत अगदी असंच घडलंय. पण आमचा खरा इतिहास आमच्यासमोर का आला नाही?? याचा आम्ही कधी विचारच करत नाही. धनगर समाजातील अशा थोर महापुरुषांचा इतिहास अभ्यासू नये आणि याचा विचार धनगर बांधवांनी कधी करूच नये म्हणून समाजाला लाचार आणि गुलाम बनवनारी सनातनी आणि प्रस्थापित व्यवस्था या भारतात असल्यामुळेच धनगर समाजाचा विकास खुंटला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणात समाजाला केलेला उपदेश असा की, "देवाधिकाच्या भोदूबाबांच्या आणि भट-ब्राह्मणांच्या नादाला लागून तुमचा कधीच उद्धार होणार नाही. जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर भारतीय संविधानानुसार जे कायदे बनवलेत त्या कायद्यांच्या आधारे राजसत्ता आणि राजपाठ हा मार्ग निवडला तरच समाजाचा उद्धार होऊ शकतो". आज धनगर समाज अज्ञानी असल्यामुळे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे आणि विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या धनगर समाजाला विकासाच्या प्रगतिपतावर यायचं/आणायचं असेल तर धनगर समाजबांधवांच्या डोळ्यावरील अज्ञानाचं घोंगडं झटकून अंधश्रद्धेपासून त्यांची सुटका केली पाहिजे.
कोणीतरी माझ्या मदतीला येउन माझा उद्धार करेन हा न्यूनगंड जर मनातून काढून टाकला तर धनगर समाज यशाच्या वाटेवरती असेल. धनगर समाजाच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही, धनगर समाजाचं नेतृत्व जर निस्वार्थी, सक्षम आणि सामर्थ्यशाली असेल तर धनगर समाजाची वाताहात होणार नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या मताधिक्याचा वापर परकियांनीच करून घेतला आणि आजही घेत आहेत पण धनगर समाजाच्या वाट्याला मात्र पाचवीला पुजलेलीच भटकंती आली आहे. राजकारण आपलं काम नव्हे असे म्हणून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष्य केल्याने प्रस्थापित जाती व्यवस्था धनगर समाजाच्या मताचा वापर करून स्वताची घरं भरू लागली. धनगर समाजाच्या मतावर प्रस्तापित आणि सनातनी लोक सरपंच, पं स. सभापति, जि.प. अध्यक्ष, आमदार, खासदार तसेच मंत्री झाले पण धनगर समाजाला या क्षेत्रात त्यांनी कधीच पुढे येवू द्यायचं नाही आणि या समाजावर सतत अन्याय करायचा असा त्यांनी डाव आखला.
दूरदृष्टी असलेले यशवंतराव चव्हाण त्यावेळी शरद पवारांना कानमंत्र देतात की धनगर समाजाला एकाऐवजी दोन घोंगडीने झोपवा कारण धनगर समाज जर जागा झाला तर या महाराष्ट्र राज्यात प्रस्तापितांना राजकारण करता येणार नाही. आज प्रस्तापितांचा एखादा उमेद्वार विधानसभा लढवत असेल तर आमचा भोळा-भाबडा धनगर समाज त्यांना मतदान करताना कधीही जातिभेद करत नाही पण धनगर समाजाचा एखादा उमेद्वार एखादी निवडणूक लढवत असेल तर प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेतील लोक धनगर समाजाच्या उमेद्वाराला मतदान करत नाहीत हे वास्तव आणि सत्य आहे. कारण धनगर समाज्याच्या उमेद्वाराला मतदान करायला त्यांना लाज वाटतेय अशातला विषय नसून धनगर समाजाला विधानभवनात आणि संसदभवनेत पाठवायचं नाही हा त्यापाठीमागचा खरा उद्देश्य आहे. जिथं कायदे बनवले जातात तिथंच जर धनगर समाजाची माणसं नसतील तर मग काय खाक धनगर समाजाचा विकास होईल?? मग यावरून आतातरी धनगर समाजाला कळायला हवं की जातिभेद नक्की कोण करतंय? धनगर समाजाचा खरा शत्रु नक्की कोण आहे?
आज धनगर समाजाची अवस्था अशी आहे की आपापल्यातच एकमेकांचे पाय ओढायची सवय लागून गेली आहे. बरणीतल्या खेकड्यांसारखी प्रवृत्ति जोपासल्याने धनगर समाजाची माणसं विधानभवनात आणि संसदभवनेत पोहचू शकत नाही आणि अशा प्रवृत्तीमुळे याचा फायदा प्रस्थापित आणि सनातनी व्यवस्थेला होतो, मग आम्ही आमच्यातल्या आमच्यात भांडायला सुरवात करतो. एकमेकांची जिरवाजिरवी अन् एकमेकांची डोकी फोडायला काठ्या कुल्हाडी हातात घेतो. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल क्रमांकावरती असल्यामुळे प्रस्तापित पक्षांची मक्तेदारी संपवून धनगर समाजाच्या संघटना व पक्षाच्या उमेद्वारांना ग्रामपंचायतीपासून, सोसायट्या, कारखाने, मार्केट कमिटी, सुतगिरणी, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद, विधानसभा अथवा लोकसभा असो प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाचा जर एखादा उमेद्वार निवडणूक लढवत असेल तर त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याऐवजी सर्वांनी त्या उमेद्वारास मतदान करून निवडून आणायला पाहिजे तरच धनगर समाजाला विविध पदे मिळतील. दक्षिण सोलापूर मध्ये मा. सिद्धेश्वर आवारे साहेब यांच्या "जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य" या संघटनेनं हा उपक्रम राबविला आहे आणि असाच उपक्रम जर महाराष्ट्र राज्यभर राबविला तर २०१९ चा मुख्यमंत्री धनगर समाजाचा असेल हे मी अवर्जून आणि अभिमानानं सांगेन.
धनगर समाज जर एक झाला तर नेते आपोआप एकत्र येतील कारण कोणताही नेता हा समाजापेक्षा मोठा नसतो. त्यामुळे धनगर समाज कधीच एकत्रित येणार नाही अशी वायफळ आणि फालतू बडबड करण्याऐवजी प्रत्येकांनी सकारात्मक विचार करून, आजपर्यं चालत आलेला पारंपरिक विचार आणि मनातील न्यूनगंड दूर करुन स्वतःपासून १% जरी समाजजागृतीचे कार्य केले तर धनगर समाज १००% प्रगतिपथावर असेल. राज्यात धनगर समाजाच्या भरपूर संघटना आणि पक्ष सुद्धा आहेत पण राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती त्या सर्व संघटना व पक्ष समाजहितासाठी/समाजरक्षणासाठी एकत्रित आले तरच राजा सम्राट अशोकांचं स्वप्न साकार होईल नाहीतर मग धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा असंच म्हणत बसायची वेळ येईल.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................
No comments:
Post a Comment