Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Wednesday, 16 March 2022

इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती

 

इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार राजे मल्हारराव होळकर
दि.१६ मार्च २०२२

      सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत शिवछत्रपतींनी उभा केलेल्या मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या तसेच त्याचा विस्तार वाढवत आजच्या पाकिस्तानातील पेशावर, अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२९ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...

एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच.... निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.


मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायची. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १८ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १९ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर स्वतंत्रपणे माळव्याचा राज्यकारभार पाहत होत्या आणि महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".   

          सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय. ज्या लोकांना आपला इतिहासच माहित नाही, आपण कोण होतो त्याची त्यांना जाणीव नाही अशी लोकं भविष्यात दुसऱ्यांची चाकरी आणि गुलामगिरी करू शकतात पण इतिहासाचा वसा आणि वारसा जपू शकत नाहीत. त्यामुळे आजच्या युवा पिढीसमोर आवाहन आहे की एकेकाळी राजा समाज असणाऱ्या आपल्या जमातीला इतिहास कोळून कोळून पाजावा लागेल तेव्हा आणि तेव्हाच आपण प्रगती करू शकतो नाहीतर दुसऱ्यांची धोतरं बडवत बसाल. आज १६ मार्च १६९३ हा दिवस म्हणजे तमाम मराठेशाहीचा, मल्हारशाहीचा एक नवीन सुर्योदय म्हणाल तरी ऐतिहासिकदृष्ट्या ते वावगं ठरणार नाही. तसेही काही ब्रिटिश लेखकांची री ओढत इथल्या मातृभूमीमधील काही नालायक तथा जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास मलिन करण्याचे पाप केले. परंतु कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी सुर्य उगवायचा काही थांबणार नाही तशाच प्रकारे चुकीच्या इतिहासकारांनी कितीही चुकीचा इतिहास लिहिला तरी समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समोर आल्याशिवाय राहणार नाही. अठराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या आणि मराठेशाहीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रणझुंजार अशा रणमर्दाची आज ३२९ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार...

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥

         ✍️नितीनराजे अनुसे✍️

   अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1827627237429824&id=305578499634713

Saturday, 4 September 2021

इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे

 


इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे

दि.०४ सप्टेंबर २०२१

           आजच्या एकविसाव्या शतकात अर्थातच तंत्रज्ञान विकसित युगात इंटरनेट हे एक महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील खूप गरजेचे साधन झालेले आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. इंटरनेटची कल्पना काय आताच जन्माला आली नाही तर १९६९ मध्ये अमेरिकन लष्कराने संदेशवहनासाठी आर्पानेट नावाचे पायाभूत नेटवर्क सुरू केले होते. कालांतराने नवनवीन संशोधन व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी या नेटचा वापर करण्यात आला. म्हणजेच १९६९ साली इंटरनेट चा खरा जन्म झाला परंतु भारतात शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठी इंटरनेटचा वापर १९८८ पासून सुरू झाला. तसे पाहिले तर इंटरनेट मुळे सर्व काही सोयिस्कर झाले आहे असे वाटते कारण इंटरनेट मुळे इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो. जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात. आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करू शकतो. इंटरनेटमुळे जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो. शिवाय करमणुकीसाठी नवीन साधने देखील इंटरनेट वरती सहजपणे उपलब्ध होतात. काही सेकंदाच्या आतमध्ये ऑनलाईन पैसे देखील सहजपणे पाठवू शकतो.

          परंतु अलीकडच्या काळात इंटरनेट जेवढे फायद्याचे झाले आहे तेवढेच नुकसानदायक देखील ठरते आहे. आजची युवा पिढी या इंटरनेटच्या 'माया'जाळात सहजपणे अडकत चालल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. हल्ली कोरोना विषाणू रोगामुळे लॉकडाउन काळात तर इंटरनेटच्या वापराचा कहरच झाला. लॉकडाउनमुळे चार भिंतीत कंटाळवाणे जीवन जगण्याऱ्यांना करमणुकीसाठी म्हणून दूरदर्शन व्यतिरिक्त इंटरनेटचा वापर करणे स्वाभाविक होते परंतु यामध्ये भरडली गेली ती आजची युवा पिढी आणि उद्याच्या भारताचं उज्वल भविष्य... लॉकडाउनमुळे शाळा, विद्यालय, महाविद्यालयांना लॉक (टाळे) लागले मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याला टाळे लागणार नाहीत तर आणखी काय होणार? बर लॉकडाउनमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केली चांगली गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय त्याबद्दल दुमत नाही. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात स्मार्टफोन/लॅपटॉप/नोटपॅड आले आणि शिक्षण राहिले बाजूला परंतु विदेशी कंपन्यांनी भरमसाठ एप्लिकेशन्स बनवून ठेवलेल्या गेम्स खेळण्यात आणि नको ते व्हिडिओ पाहण्यातच भारताचं उज्वल भवितव्य व्यस्त झालेलं दिसून येते. तर दुसरीकडे आजची युवा पिढी नेट सर्फिंगमुळे भलतीकडेच जास्त आकर्षित झालेली दिसून येते. इंटरनेटचे फायदे बाजूला ठेवून सोशल मिडिया (समाज माध्यमा) वरती फालतू गोष्टींमध्ये अग्रेसर असल्याचे देखील दिसून येते. मग फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम याव्यतिरिक्त व्हिडिओ चॅटिंग च्या माध्यमातून लैंगिक शिक्षण व लैंगिक आकर्षणाकडे इंटरनेटच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन युवक युवतींचे प्रमाण आपसूकच वाढले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम वरती रील्स/व्हिडिओ पोस्ट करून लाइक्स, फॉलोअर्स च्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याकडे आजच्या युवा पिढीचा कल जास्त आहे. रात्र रात्रभर जागरण करणे, व्हिडिओ चॅटिंग, व्हिडिओ सर्फिंग केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक तथा शारिरीक संतुलन बिघडत असून शैक्षणिक ज्ञानावर भर देण्यापेक्षा किशोरवयीन मुला-मुलींचा लैंगिक आकर्षणाकडे जास्त भर असतो आणि सर्रास कंपन्या, वेबसाइट्स त्यांच्या अश्लीलतेच्या जाहिराती विकायला कुठेच कमी पडत नाहीत. इंटरनेट वरती महत्वाची माहिती पाहत असले तरी त्यावरती नको त्या जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे पालकांनी जर आपल्या पाल्यांवरती वेळीच अंकुश ठेवला नाही तर पाल्यांचं उद्याचं भविष्य हे इंटरनेटच्या मायाजाळात अडकून अंधारातच राहील. कारण योग्य वापर केल्यास इंटरनेट जेवढे फायद्याचे आहे तेवढेच त्याचा गैरवापर केला तर ते खूप आणि खूपच नुकसानदायक आहे.सदरच्या ब्लॉगमधून समाजप्रबोधन व्हावे हीच प्रामाणिक तळमळ आहे. 

                         ✍️नितीनराजे अनुसे

                         अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली

                         nitinrajeanuse123@gmail.com

Thursday, 3 December 2020

जातीयवाद्यांच्या तावडीत सापडलेला महान द्रष्टा योद्धा ✍ लेखन - नितीनराजे अनुसे

राष्ट्रपुरुष धुरंधर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर

        होय, मराठ्यांच्या इतिहासात मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रूंच्या चारी मुंड्या जीत करणाऱ्या, मराठ्यांचा इतिहास जाज्वल्यमान आणि दैदिप्यमान करणाऱ्या धुरंधर योद्ध्यांचा विसर मराठी माणसांना पडणे हे मराठी माणसांचेच नव्हे तर सबंध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा'राष्ट्रा'चे दुर्देवच म्हणावे लागेल. परंतु त्यापलीकडे जाऊन मी हेच म्हणेन की मराठ्यांच्या इतिहासात मर्दुमकी गाजवणऱ्या बहुजन समाजातील अशा धुरंधर योद्ध्यांचा इतिहास न अभ्यासने म्हणजेच त्या त्या मराठी माणसांना कदाचित जातीयवादाची झालेली कावीळ असावी...
       असेच धुरंधर लढवय्ये, शुन्यातून विश्व निर्माण करणारे  होळकर साम्राज्याचे सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे सुपूत्र म्हणजेच सळसळत्या रक्ताची आणि लखलखत्या तलवारीची धार असलेले धुरंधर योद्धे, एक महान तथा द्रष्टा योद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. तत्कालीन हिंदुस्तानचा अर्थातच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील क्रमांक एकचा शत्रू कोण असेल तर ब्रिटीशांचे नाव समोर येते. परंतु  छत्रपती शिवरायांपाठोपाठ असा एकला महाराजा यशवंतराव होळकर लढवय्या होता की ज्यांना स्वराज्यातीलच काही लालची शिलेदार आणि सरदारांकडून तितकाच अन्याय झाला जितका ब्रिटिशांनी या हिंदुस्तानच्या मातीवर केला. 
           तसे पहायला गेले तर तो काळ फार अंदाधुंदींचा होता, कोणाचा पायपोस कोणाच्याच पायात नव्हता. रणांगणात रक्त सांडून उभा केलेली होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी पेशव्यांचेच सरदार होळकरांचे सोबती  अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे टपून होते आणि पेशवे देखील मागचा पुढचा विचार न करता त्यांस भरीस पडत गेले. अशातच  भांबुर्ड्याच्या मैदानात काशीराव होळकरांना भरीस घालून शिंद्यांनी साखरझोपेत असतानाच तुकोजी बाबांचे द्वितीय सुपुत्र महाराजा मल्हारराव होळकर (द्वितीय) यांची हत्या केली तर यशवंतराव सुखरूपपणे तिथून निसटले. अशी दुर्बुद्धी सुचलेल्या शिंद्यांना आणि पेशव्यांना समजावून सांगणारा जाणकार कोणी या स्वराज्यात नव्हता जे होते त्या नाना फडणिसांना पेशव्यांनी कैदेत ठेवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु पुण्यातील पेशव्यांच्या व शिंद्यांच्या अशा कुटील राजकारणामुळे संपूर्ण रयत जात्यात भरडावी अशी भरडली जात होती. त्यात पेशव्यांच्या सरदारांनी खुद्द पेशव्यांच्या आज्ञेनुसार महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू महाराजा विठोजीराजे होळकर यांना सूडबुद्धीने अटक करून हत्तीच्या पायी दिले. एखादा कसाब जनावरांना जेवढा त्रास देत नाही त्यापेक्षा क्रुर पद्धतीने विठोजीराजेंना ठार मारले ते छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेल्या स्वराज्याच्या हिताचे मुळीच नव्हते. अशा वेळी शिंद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊन होळकरांची गादी राहावी की नको याची शहानिशा करण्यासाठी समोरासमोर पेशव्यांशी मसलत करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर दक्षिणेकडे कुच करतात. शिंद्यांची राजधानी उज्जैन काबीज करून वाटेत येणारी त्यांची ठाणी व महाल ताब्यात घेत नाशिक, बारामती  सुद्धा महाराजांच्या फौजेने ताब्यात घेतली. यालाच या मातीतले काही चुकीचे जन्माला आलेले जातीयवादी इतिहासकार म्हणतात 'होळकरी दंगा'. परंतु होळकरांचे महाल शिंद्यांनी घशात घातले होते, मल्हारराव होळकर द्वितीय यांची शिंद्यांनी हत्या केली पुढे महाराजा विठोजीराजे होळकर यांना देखील हत्तीच्या पायी देऊन क्रुर रित्या ठार मारले तेव्हा शिंद्यांचा आणि पेशव्यांचा दंगा इथल्या जातीयवादी आणि नालायक इतिहासकारांना दिसला नाही का? 

            असो किमान यानंतर तरी पेशव्यांनी समजदारीने विचार विनिमय करायला हवा होता परंतु 'विनाशकाली विपरीत बुद्धी' या म्हणीप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेला अडवण्यासाठी पेशव्यांनी शिंद्यांच्या आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या सांगण्यावरून सदाशिवराव बक्षी यांची कसलेली फौज उत्तरेतून बोलवली. राजधानीत रयतेच्या हिताची खलबते व्हायच्या ऐवजी होळकरांना कसं संपवायचे याचेच विडे उचलले जात होते. मराठ्यांच्या दौलतीत ज्या होळकरांनी भर घातली, उत्तर हिंदूस्थान घोड्याच्या टापांखाली आणून दिल्लीचे तख्तच नव्हे तर ज्या होळकरांनी अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडवले त्या होळकरांना संपवायची कटकारस्थाने शिंद्यांनी चालवली होती. परंतु रणांगणातून माघार घेइन तो जातीवंत योद्धा कसला?  यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते, ऐन पंचविशीतलं रांगडं धनगराचे पोरगं ते, अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. हडपसरच्या माळावर महाराजा यशवंतराव होळकर यांची छावणी पडली होती. पाराजीपंतांनी समजावून सांगूनही पेशव्यांनी शिंद्यांच्याच कारभाऱ्यांचे ऐकून घेतले आणि तिथेच छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचा घात झाला. शेवटी ऐन दिवाळीला अभ्यंगस्नानादिवशी सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले सरकारी फौजेकडून (शिंदे व पेशव्यांच्या फौजेकडून) वीस-पंचवीस तोफांचे बार उडाल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपल्या फौजेला हुकूम दिला आणि बघता बघता होळकरांच्या फौजेने शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. होळकरांचे सरदार आपापले मोर्चे शिताफीने सांभाळत शत्रूंवर चाल करत होते. मार्तंड मार्तंड असा जयघोष करत फौजेला प्रोत्साहित करत महाराजांनी लंकेवरून (महाराजा यशवंतराव होळकर यांची घोडी- लंका) खाली उडी मारली आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शिंद्यांच्या फौजेत घुसले आणि बघतो न बघतो तोपर्यंत सपासप वार करत हजार दोन हजार फौज त्यांनी कापून काढली होती. महाराजांची फौज देखील महारांजांचे अनुकरण करत शत्रूंवर तुटून पडत होते. त्याच आवेशात महाराजांनी विंचूरकरांना ओरडून सांगितले की तुम्ही माघारी फिरा तुम्ही आमचे शत्रू नाही तर शिंदे आणि शिंद्यांचे सरदार आमचे शत्रू आहेत. तोच विंचूरकरांना त्यांच्या फौजेने माघारी ओढले तोपर्यंत महाराजांच्या दांडपट्ट्याच्या फटक्यात सदाशिवराव बक्षींचे शिर धडावेगळे झाले. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांच्या तोफांच्या माऱ्याने पुणे जळले, आगीचे लोळ आकाशात उंच उंच दिसत होते. तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांचा(द्वितीय) पुत्र  खंडेराव होळकर (द्वितीय) यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला. 

       वसई ला जाऊन पेशव्यांनी गोऱ्यांशी तह करून महाराजा यशवंतराव होळकर यांना होळकर दौलत ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्याची पत्रे पाठवली तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर संतापले. पेशव्यांच्या तहानुसार ब्रिटिश फौज पुण्यावर चालून येत आहे असे समजताच त्यांच्या फौजेस फुटकी कवडी देखील मिळू नये या उद्देशाने व राष्ट्र बांधणी साठी फौजेच्या लष्करी खर्चासाठी मंदिरातील दाग दागिने पैसा महाराजा यशवंतराव होळकर यांनी बाहेर काढला, पेशव्यांची राजधानी असलेला शनिवार वाडा सोडला तर इतर सरदारांचे महाल लुटून फस्त केले. याचाच इतिहासात उल्लेख करताना तेव्हाचा शत्रू असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, लेखकांनी महाराजा यशवंतराव होळकर यांना बंडखोर लुटारू, होळकरी दंगा अशी विभूषणं लावून महाराजांना बदनाम करण्याची एकही कसर सोडली नाही आणि त्यांचीच री ओढत खोलात जाऊन अभ्यास न करता इथल्या जातीयवादी लेखकांनी इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांना तीच विभूषणं लावून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला.
         परंतु महाराजा यशवंतराव होळकर काही कमी नव्हते. जे इंग्रज भारतभुमीवर पाय पसरू लागले होते त्यांच्या विरोधात स्वकर्तृत्वावर दंड थोपटून ते उभे राहिले. भानपुऱ्यात त्यांनी तोफांचा आणि गोळाबारूदांचा कारखाना सुरू करून लढाईची धोरणं आखली. थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर म्हणायचे की गादीचा खरा वारसदार तोच असतो जो मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर लढाया मारून, कर्तृत्व गाजवून स्वराज्याचे रक्षण करतो. महाराजा यशवंतराव होळकर हे त्याच तालमीतून पुढे आलेला एक द्रष्टा योद्धे. होळकर साम्राज्याच्या, स्वराज्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी ब्रिटीशांना मातृभूमीतून हाकलून लावण्यासाठी हिंदूस्थान अवघे एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून तलवारीची मूठ घट्ट पकडली आणि घोड्याच्या पाठीवर मांड टाकून डोळ्यांच्या पापण्या पडायच्या आत समोरासमोरील लढाईत जगभर गाजलेल्या ब्रिटिश फौजेला कापून काढत, इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि अशा शिस्तबद्ध अजिंक्य मानल्या जाणाऱ्या ब्रिटीश कवायती फौजेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. एक नव्हे, दोन नव्हे तर ब्रिटीश फौजेशी मुकाबला करत तब्बल एकणिस लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी विजय मिळवला होता. समोरासमोरील लढाईत तर कधी कधी सपाट मैदानावर देखील गणिमी काव्याने ब्रिटीश फौजेवर चढाई करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेसमोर नवनवीन शस्त्रं असलेल्या ब्रिटिश फौजेचा टिकाव लागत नव्हता तेव्हा ब्रिटीशांनी होळकरांच्या सरदारांना फंद फितुरी करून होळकरांची फौज कमी करायला सुरुवात केली. हिंदूस्थातील सर्व राजा महाराजांना पत्रं पाठवून, विनवणी करून देखील एकही खरा माइचा लाल इंग्रजांच्या विरोधात लढायला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोबत आला नाही हे या राष्ट्राचे दुर्दैव होते. अन्यथा गोऱ्यांनी भारतावर कधीच राज्य केले नसते. योगायोगाने युरोपात नेपोलियन बोनापार्ट याची सुद्धा लढाई ब्रिटीशांच्या विरोधात होती. त्यावर सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख पोवाडा गाताना म्हणतात की,
"करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा,
भारत भुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा.
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला,
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला.
नेपोलियन युरोपात... ह्यो होळकर हिकडं...
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं"
      पुढे शाहीर म्हणतात की
शिवरायांमागे राजा एकला यशवंतराव
ज्याचं नाव पोवाड्यातून गावं आणि शाहीरानं डोक्यावर घेऊन नाचावं...
डोक्यावर घेऊन नाचावं... 

      अशा मुत्सद्दी योद्ध्याचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वाफगावच्या भुईकोट किल्ल्यात दि. ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. आज महाराजा यशवंतराव होळकर यांची २४४ वी जयंती आहे. त्यामुळे द्रष्टा योद्धा तथा राष्ट्रपुरुष महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खोलात जाऊन अभ्यासने व राष्ट्र उभारणी साठी त्यांच्या दूरदृष्टीचा अवलंब करणे हे आजच्या युवा वर्गासमोर एक आवाहन आहे.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123

Saturday, 16 May 2020

आम्ही नेमकं चुकतोय कुठे?

Old Post...
आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते.  आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग  (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय  नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र  काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
 आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल  हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         8530004123
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................


एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली  अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं  सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे.  "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...

ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...

उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..

उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...

कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...

अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...

तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...

हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,

फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.

म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती

जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            8530004123
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

Monday, 11 May 2020

गोपीचंद पडळकर साहेब आणि बिरोबा : ✍️नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन 💐💐💐

(सदरच्या ब्लॉगमधून सामाजिक तथा मानसिक भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही यातून बोध घेऊन समाजप्रबोधन व्हावे हीच अपेक्षा)
            लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेव्हा ज्यांना बिरोबा कुठे आहे? कसा आहे? नक्की कोणता देव आहे? हेच माहित नव्हते त्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यातील मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवायला लागली, आयुष्यभर प्रस्थापितांची गुलामगिरी चमचेगिरी करणाऱ्यांना, प्रस्थापितांचे बूट चाटणाऱ्यांना, अंडी-दारू-मटणासाठी तडफडणाऱ्यांना, दोन-चार नोटासाठी प्रस्थापित नेत्यांसमोर लाळ गाळणाऱ्यांना आणि स्वतःचा तथा समाजाचा स्वाभिमान प्रस्थापितांच्या बुटाखाली गहाण टाकणाऱ्यांना धनगर समाजाचे दैवत असलेला बिरोबा आणि गोपीचंद पडळकर यांची बिरोबाची शपथ आठवायला लागली.  विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागल्यावर गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला म्हणून बोंबलणाऱ्या औलादींना, आणि एकच छंद राजकारण बंद म्हणून पोटाची आतडी पिळवटणाऱ्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो आज खऱ्या अर्थाने गोपीचंद पडळकर यांना बिरोबा पावला आहे हे विसरू नका.
          मी २००६ पासून अगदी जवळून पाहतोय की मा.गोपीचंद पडळकर साहेब नावाचा सर्वसामान्य कुटुंबातील हा युवक संघर्ष कोळून पितोय. संघर्ष जणू काय त्यांच्या पाचवीलाच पुजलाय, तरीही हा संघर्षयोद्धा कितीही संकटे आली तरी आजपर्यंत कधीही डगमगला नाही. गोपीचंद पडळकर यांना नामोहरम करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेने कितीतरी षडयंत्र रचली, मंगळसूत्र चोरीसारख्या खोट्या केसेस दाखल केल्या, पोलिस कोठडीत ठेवले, शेवटी जिल्हा हद्दपारीचे नोटीस सुद्धा बजावले होते. तरी सुद्धा गोपीचंद पडळकर हा संघर्षयोद्धा थांबला नाही ना त्यांनी आपला संघर्षरथ थांबवला. तर हा योद्धा अन्यायाविरुद्ध लढला, प्रस्थापितांना भिडला आणि त्यांना अक्षरशः घामही फोडला. जेव्हा गोपीचंद पडळकर सांगलीच्या तुरूंगात होते तेव्हा हातात खुरपं घेऊन शेतात भांगलणारी याच संघर्षयोद्ध्याची आई म्हणाली होती की "कशाला राजकारणाच्या नादाला लागायचं, लोकं सुखानं जगू देत नाह्यती. पण पोरगं काय ऐकतच नाय." आज त्याच मायमाऊलीचं ते पोरगं, सर्वसामान्यांचं ते पोरगं शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज बनून बिनविरोध महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून आमदार झाले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला नाही तर त्यांना बिरोबा पावला आहे असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही.
          आज ज्यांना ज्यांना गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवते त्यांनी हे पण आठवून पहा...
१) सोनलवाडी (सांगोला) येथील एका मेंढपाळाच्या मेंढ्या काही गावगुंड उचलून घेऊन गेले होते त्या मेंढ्या मेंढपाळाला परत करायला बिरोबाचं रूप घेऊन गोपीचंद पडळकर साहेबच धावले होते.
२) कोल्हापूरच्या बहिणीवरती अन्याय अत्याचार झाला होता तेव्हाही त्या बहिणीच्या पाठीशी भावाप्रमाणे ठामपणे उभा राहिलेले गोपीचंद पडळकर आठवून पहा.
३) पुरंदरच्या ताईवर अतिप्रसंग झाला होता तेव्हा बारामतीचा मोठा म्हसोबा, त्या लोकसभा मतदारसंघाची मरीआई तिथं पोहचली नाही ना साधा धीर दिला. परंतु बिरोबाच्याच रूपाने गोपीचंद पडळकरांनी भेट घेऊन पुरंदरच्या ताईला आणि तिच्या कुटुंबीयांना धीर दिला.
४) कराड परिसरात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या मेंढ्या काही गावगुंडांनी पळवल्या होत्या त्या पडळकर साहेबांमुळेच माघारी परत केल्या होत्या.
५) माणदेश परिसरात कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर रात्री अपरात्री हाकेला धावून जाणारे गोपीचंद पडळकर साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बिरोबाचेच रूप वाटतात. अशा कितीतरी एक ना अनेक कितीतरी घटना सांगता येतील.
त्यामुळे बिरोबा गोपीचंद पडळकर साहेबांना कोपला नाही तर पावला आहे. आणि बिरोबा खरंच कोपला असेल तर तो त्या समाजावर कोपला आहे जो अजूनही एकजूट एकसंघ होत नाही. बिरोबाची शपथ फक्त गोपीचंद पडळकर यांनीच पाळायची होती आणि समाजाने प्रस्थापितांच्या पारड्यात भरभरून मते द्यायची होती का?  हीच का बिरोबाच्या भक्तांची भक्ती? जर समाजानेही बिरोबाची शपथ पाळली असती, एकी दाखवली असती तर गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासह अजून कित्येक धनगर नेते आज विधानपरिषदेतच काय तर लोकसभेत दिसले असते. कितीतरी आमदार विधानसभेत दिसले असते. परंतु समाजात एकी नसल्याने दिड-दोन कोटी धनगर समाजाचा केवळ एक आमदार विधानसभेत आणि आज एक विधान परिषदेवर ही वेळ समाजावर आली नसती.
          असो, बिरोबाच्याच आशिर्वादाने, लढाऊ प्रवृत्तीच्या आणि गोपीचंद पडळकर साहेबांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आणि संघर्षामुळे संघर्षयोद्ध्याचा संघर्षरथ कधीही न थांबता अविरतपणे धावतच राहिला त्या संघर्षवेलीवर आज विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकीचे गोंडस फुल बहरून आले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन  व पुढील वाटचालीस अगणित शुभेच्छा. कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, मेढपाळांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मल्हारी मार्तंड, श्री बिरोबा आपणास बळ बुद्धी तथा चातुर्य देवो हीच प्रार्थना 💐💐💐
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Thursday, 14 November 2019

वासुदेव आला हो वासुदेव आला... ✍️नितीनराजे अनुसे


समाजाच्या भल्यासाठी जय मल्हार बोला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

जागा हो धनगरा, आता संधी ही अनमोल।
तुझ्या प्रगतीला पूर्वजांच्या इतिहासाचं रं मोल।।
मनगटाच्या जोरावर कसा इतिहास घडविला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

अंधारल्या दाही दिशा, गोंधळला समाज।
घालूनि झडप, धावून येते हो सावज।।
समाजाच्या हाती आता ज्ञानरूपी कंदील दिला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

अज्ञानाचं लक्षण, आलंय समाजाच्या नशिबी।
समतेचे गणित सारं झालंय बेहिशोबी।।
आजपर्यंत धनगरांचा नुसता वापरच झाला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

धनगर जमात, तशी आहे इमानदार।
आजपर्यंत दुसऱ्यांचीच भरली हो घरं।।
बुद्धिजीवी वर्ग आतातरी शहाणा झाला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

नेत्यांच्या अहंकारातून झाली समाजाची दशा।
द्यावी म्हणतोय आता पुन्हा एक नवी दिशा।
क्रांतीच्या मशाली इथूनच पेटवायला आला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

समाजाच्या भल्यासाठी जय मल्हार बोला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
            ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday, 6 November 2019

आक्रोश मेंढपाळांचा... ✍️नितीनराजे अनुसे

 

         खरंतर नैसर्गिक आपत्ती कधी कोणाला सांगून येत नाही तर धुडगूस घालून निघून गेल्यावर नैसर्गिक आपत्ती आल्याचे समजते. या घटना घडू नयेत आणि घडल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)ची स्थापना करण्यात आली आहे. एकूण ११ ठिकाणी  बीएसएफ (BSF), सीआरपीएफ(CRPF), सीआयएसएफ(CISF), आणि आयटीबीपी (ITBP) यांच्या टीम आहेत. महाराष्ट्र राज्यात पुणे येथे तळेगाव जवळ सीआरपीएफ ची National Disaster Responce Force म्हणून टीम काम करते तर विदर्भातील नागपूर येथे National Disaster Management Training Institute आहे. ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या अखत्यारीत येणारी एनडीआरएफ ची टीम धावून येते. हे खरंतर सर्वांना माहीत असावे म्हणून लिहिले आहे. महाराष्ट्र राज्यात कितीतरी वेळा नद्यांना पुर येऊन गेला, भूकंप झाले, कधी मानवीकृत आपत्ती आली तर कधी नैसर्गिक परंतु अशा आपत्ती मध्ये श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्यांना काही फरक पडत नाही तर फरक त्यांना पडतो ज्यांचा संसार हातावर चालतो. म्हणजे कष्ट केल्यानंतरच एक वेळची भाकरी ज्यांच्या नशिबी असते त्याच संसाराला हातावर चालणारा संसार म्हंटलं जातं. प्रामुख्याने इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या, सत्ताधाऱ्यांच्या कृपेने देशोधडीला लागलेला शेतकरी, एकवेळच्या अर्ध्या-कोर भाकरीच्या तुकड्यासाठी मिळेल ते काम करणारा गोरगरीब मजूर/कामगार आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात वणवण भटकणारा मेंढपाळ यांचे संसार हे हातावरती चालणाऱ्या संसारापैकी आहेत.

         अशाच हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ कुटूंबांवरती नैसर्गिक आपत्तीने घाला घातला आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील गणेशपुर, लाखनवाडा, हिवरखेड या भागातील मेंढपाळ बांधवांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. एकीकडे प्रशासन व्यवस्था ही शेतीचे पंचनामे करण्यात व्यस्त आहे तर दुसऱ्या बाजूला मेंढपाळांवरती संकट आ वासून उभे राहिले आहे. आज इथे तर उद्या तिथे अशी भटकंती करत जीवन जगणारे मेंढपाळ बांधव हे फिरस्ते आहेत घरदार सोडून ते भटकंती करत असतात. चाऱ्याच्या शोधात ते सतत भटकत असतात त्यातूनच त्यांच्या पोटाची खळगी भरली जातात, लेकरांबाळांचे शिक्षण सुद्धा याच व्यवसायावर अवलंबून आहे. त्या भागात सततच्या पावसाने झालेल्या चिखलातून मेंढ्यांना चालणं तर मुश्कील झालेच होते त्यात पाऊस पडत असताना चारा न मिळाल्याने शेकडोंच्या वरती मेंढ्या उपासमारीने मेल्या तर पोटात अन्नाचा कण नसलेल्या मेंढ्या मुसळधार पावसातून वाहून सुद्धा गेल्या. ज्यांच्या जीवावर पोट भरायचं त्याच मेंढ्या डोळ्यासमोर तडफडून मरून जात असतील आणि शेकडो मेंढ्या वाहून जात असतील तर खरोखरच मेल्याहून मेल्यासारखे आहे. त्यांच्यासाठी कोणती एनडीआरएफ टीम धावून येऊ शकत नाही आणि नाही त्यावरती कोणते व्यवस्थापन...  कारण काही टग्यांच्या (ज्यांना धनगरांनी बहुमताने निवडून दिले अशा मस्तावलेल्या नेत्यांच्या) मते ती कोंबड्या-गाढवे-कुत्री आहेत म्हणूनच की काय जवळच्याच नागपूरच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण विभागाला सुद्धा जाग आली नसावी हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल. तरीही सुशिक्षित मेंढपाळ आनंद कोकरे यांचे सहकारी मेंढपाळपुत्र आंदोलनातील लढवय्ये आमचे मित्र सौरभ हटकर, डॉ. संतोष हटकर शिवाय अन्य सुशिक्षित मेंढपाळपुत्रांनी मेंढपाळांच्या हाकेला  धावून जात घटनास्थळी पोहचून संबंधित मेंढपाळ बांधवांना आधार दिला आहे, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सद्यस्थितीचा आढावा दिला आणि पंचनामे करून घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यांच्याच माध्यमातून शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष ना.बाळासाहेब दोडताले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पिडीत मेंढपाळ बांधवांना दिलासा दिला. त्याबद्दल या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत...

      असो याच धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे ही प्रस्थापित नेत्यांनी, सरकारने स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून लवासा सारखी सिमेटची जंगले वसवली आहेत, कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणाऱ्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणाऱ्या, एका धनगर समाजातील मंत्र्याचा पराभव केला म्हणून ३०-३० जेसीबी मधून गुलाल उधळणाऱ्यांनी आणि त्याच्या घरातील राज्यकर्त्यांनी पूर्वीच लक्ष घातले असते तर आज धनगर समाजावर ही वेळ आलीच नसती, धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणाऱ्या आणि झगडणाऱ्या भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना अशा नैसर्गिक तथा मानवीकृत आपत्तीमध्ये नुकसान भरपाई म्हणून थोडाफार का होईना मदतीचा हात द्यावा, प्रशासनाच्या वतीने जेवढा निधी उपलब्ध करता येईल त्यासाठी प्रयत्न करावेत शिवाय शेळ्या-मेंढ्यासाठी चराऊ कुरणे राखीव केली आणि मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
     एक मेंढपाळपुत्र...
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123

Saturday, 26 October 2019

धनगरांनो आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा : नितीनराजे अनुसे



       भारत हा तसा सर्वात मोठी लोकशाही असलेला लोकशाही प्रदान देश आहे. हे आजपर्यंत नागरिकशास्त्रात वाचायला भेटायचे परंतु खरंतर लोकशाही (?) म्हटलं की आता प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. खरंच इथे लोकशाही आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले, मतदानाचा अधिकार दिला परंतु आम्हाला त्याचा योग्य वापरच करता येत नसेल तर त्या व्यक्तिस्वातंत्र्याला आणि मतदानाच्या दिलेल्या अधिकाराला अर्थच काय उरतो बरे?
       असो आता थोडसं मी माझ्या धनगर समाजाकडे वळतो. कदाचित काहीजण मला जातीयवादी म्हणतील सुद्धा... पण हरकत नसावी कारण या भारत देशात मला कळतंय असे जातपात विरहित आणि धर्मनिरपेक्ष पणे राज्यकारभार चाललेला कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे मला जातीयवादी म्हणणारे अगोदरच जातीयवादी असतील त्यात तीळमात्र शंका नसेल. एकेकाळी राजा समाज असणाऱ्या या धनगर जमातीने आज स्वतःचीच अवस्था काय करून ठेवली आहे ते लोकसभा आणि विधानसभेच्या निकालातून स्पष्ट दिसून आलेच असेल. इ.स.च्या पूर्वीपासून या धनगर जमातीने हिंदुस्थानच नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावर जवळपास १८०० वर्षे राज्यकारभार केला होता. त्यावेळची सत्ताधारी आणि शक्तिशाली असलेली ही धनगर जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत बसली आहे यापेक्षा सर्वात मोठे दुर्दैव काहीच नसावे.
       जेव्हा बापूसाहेब कोकरे अर्थातच धनगरांचा क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब नावाचे वादळ महाराष्ट्र राज्यात घोंघावत होते. तेव्हा त्या माणसाने स्वतःच्या घरादाराची राखरांगोळी करून यशवंत सेना स्थापन केली आणि त्या माध्यमातून बी.के.कोकरे साहेब महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागे करत होते तेव्हा एका माजी मुख्यमंत्र्याला भरसभेतून सांगावे लागले की "बाबांनो या महाराष्ट्र राज्यातील जो धनगर समाज आहे तो धनगर समाज शांत निपचित झोपला आहे. त्या समाजाला तसेच झोपू द्या, हवं तर एकाऐवजी दोन दोन घोंगडी टाकून तसेच झोपी घाला. नाहीतर तो धनगर समाज जर जागा झाला आणि राजकारणात/सत्ताकारणात येऊ लागला तर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना राजकारण करता येणार नाही." त्या गुरूचे शब्द शिष्याने नीट ध्यानात ठेवले आणि पहिला बळी घेतला तो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांचा... प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एखाद्या समाजाला अजून ४०-५० वर्ष मागे फेकायचे असेल तर त्या समाजाच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे आणि नेतृत्व संपवायचे ही चाणक्य नीती नव्हे तर पवार नीती आहे. असे इतिहासातील कितीतरी दाखले देता येतील. त्यातीलच एक म्हणजे खुद्द चाणक्याने चंद्रगुप्त मौर्य यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मगधचा राजा धनानंदाचा नाश केला. आजही महाराष्ट्र राज्यातील चाणक्याच्या वारसदारांनी धनगरांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून धनगरांचेच नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला तो तर उघडच आहे.
         खरंतर आम्ही अभिमानाने सांगतो की कधीकाळी अर्धा संसार घोड्याच्या पाठीवर लादलेल्या त्या घोड्याचा लगाम हातात धरून आई-बापासोबत माळराने, दगडधोंडे तुडवत, काट्याकुट्यातून अनवाणी पायाने वाट काढत चालणारी धनगर समाजातील युवा पिढी शिकली/सवरली आहे तीच युवा पिढी आज समाजाला आंधकारातून आणि अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढेल. परंतु तसे झाले नाही उलट त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दोन-चार शब्द शिकायला शाळेत पाठवणाऱ्या त्या आई-बापाचा विश्वासघात झाला आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. अरे ज्या बापाने पायाच्या नडग्या वाळवत माळरानं तुडवली, जो पहाडासारखा शेळ्या-मेंढ्यामागे उभा राहिला. ऊन पाहिले नाही, वारा पाहिला नाही ना पाऊस... धो धो कोसळणाऱ्या पावसात सुद्धा तो उभा राहून मेंढ्या राखत होता तो दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नव्हे तर माझा पोरगा शिकला तर सावलीतली ती पण खुर्चीवरची नोकरी करून आम्हाला सुख लावेल म्हणून... भरपावसात त्या बापाने घेतला असता थोडासा अडोसा आणि घेता ही आला असता, झोपला असता डेरेदार वृक्षाच्या सावलीखाली शांत निपचित पण काय करणार एखादा गावगुंड आला तर कोकरू उचलून घेऊन जाइल, एखादा लांडगा आला तर मेंढरू पळवून घेऊन जाइल मग मी माझ्या पोराला शिकवायचा कसा? त्याला अधिकारी बनवायचा कसा? पोरीचं लग्न करायचं कसं? हा विचार करत करत पोटाच्या तुंबड्या भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, जिथे रात्र होईल तिथे तीन दगडाच्या चुलीवर स्वयपाक करून अर्धीकोर खाऊन जमिनीचे अंथरूण आणि आकाशाचं पाघरून करून दगड उशाला घेऊन झोपणारे व पाऊस आला तर भरपावसात चवढ्यावर बसून रात्र रात्र काढणारे आई-बाप आमच्या समाजातील पोरांना आठवले नाहीत मात्र पुढच्या सात पिढ्या राजकारणातून बरबाद होऊ नयेत म्हणून एकदाच पावसात भिजत भाषण ठोकणारे शरद पवार त्या पोरांना बाप वाटले. इथंच आमच्या पोरांच्या शिक्षणाचा आणि त्यांनी शिक्षण घेऊन प्रगती करावी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, त्यांच्यासाठी भर उन्हातान्हात, भर पावसात ठेचा खाणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचा पार सत्यानाश झाला.
          समाजाला काय हवं आहे आणि काय दिले आहे प्रस्थापित नेत्यांनी? याचा आम्ही कधी विचार केलाच नाही ना...? कदाचित करणार पण नाही कारण आम्ही आमची बुद्धी दुसऱ्यांच्या बुटाखाली गहाण ठेवली आहे. म्हणूनच... या महाराष्ट्र राज्यात कोपर्डी मध्ये ज्या बहिणीची हत्या झाली तिच्या समर्थनार्थ प्रत्येक जिल्ह्यातून क्रांती मोर्चा, मूक मोर्चा निघाला त्या कोपर्डी घटनेचा निषेध आम्हीही केला, आमचेही धनगर समाजबांधव त्यात सहभागी झाले. कारण विषय माणूसकीच्या नात्याचा आणि कोपर्डीच्या बहिणीचा होता. मग पुरंदर येथे आमच्या मेंढपाळांच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा कोणी साधा निषेधही करत नाही. तेव्हा कुठे जाते माणूसकी? तेव्हा कुठे असतात पावसात चिंब भिजून मजा घेत भाषण करणारे नेते? कुठे असतात जिजाऊंच्या लेकी? ज्या लोकसभा मतदारसंघात ती घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार सुप्रिया सुळे कुठे होती? एक स्त्री असूनसुद्धा ती कधी विचारायला तरी तिथपर्यंत गेली का? धनगर नेत्यांच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणी मॉसाहेबा जिजाऊचा शिवबा तिथे गेलाच नाही, नाही शिवबाचा मावळा तिथे पोहचला. मग त्या पिडीतांना कोण कोण भेटायला गेले होते, ज्या मेंढपाळांना मारहाण झाली त्यांना कोणी भेटी दिल्या? ज्यांच्या मेंढ्या कोणी उचलून नेल्या होत्या त्यांच्या मेंढ्या कोणामुळे परत मिळाल्या? कोण कोण मुंबईच्या विधनभवनात घुसून पुरंदरच्या ताईला न्याय मागत होते, कोणा-कोणावरती त्यासंदर्भात केसेस झाल्या ते बातम्या काढून बघा,  मग विचार करा धनगर नेत्यांव्यतिरीक्त कोणी केसेस घ्यायला का नाही आला? ज्यांच्यावर केसेस झाल्या त्या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करून सांगितले होते की बाबांनो धनगरांचे राजकीय आस्तित्व धोक्यात आहे त्यामुळे धनगर उमेदवारांना निवडून आणा... मग कितीजणांनी त्याचे आचरण केले? का त्यांनीच काय मक्ता घेतलाय का? घरात बसून सोशल मीडियावर गप्पा मारायला कोणालाही आणि खूप जमतं पण... ग्राउंड लेव्हलला कधी तुम्ही संघर्ष केला आहे का? जो धनगर समाजातील प्रत्येक नेत्यांनी केला आहे. कोणी मदतीला आला नाही कोणी निषेध करायलाही आला नाही तरीसुद्धा त्या धनगर नेत्यांनी घातलेली बिरोबाची शपथ तुम्हाला आठवते पण धनगर समाजाचं वाटोळं ज्या प्रस्थापितांनी केले तेच तुम्हाला बाप वाटतात वाह! रे पोट्टे हो... आणि पुन्हा सांगत बसता बिरोबाने कोप केला म्हणून...? तुमच्या लाचारीचे, तुमच्या उचलेगिरीचे, अन्याय अत्याचार सहन करण्याचे बिरोबाला तरी चांगले वाटते का? पण काय बिरोबाच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहचलेले धनगर नेते दिसत नाहीत, बिरोबाच्या रूपाने विधानभवनात घुसून न्यायासाठी घोषणा केलेले महाराष्ट्र यशवंत सेनेचे मावळे कदाचित दिसले नसतील. कारण त्या पुरंदरच्या घटनेतील ती बहिण आम्हाला आमची कधी दिसलीच नाही पण तेव्हा नक्कीच दिसेल जेव्हा तुमच्या-आमच्या पैकी स्वतःची बहिण तीच्या जागी असेल... तेव्हा धनगर नेत्यांच्या नावाने खडे फोडू नका म्हणजे झालं. परंतु इथून पुढच्या काळात एखाद्या मेंढपाळाची मेंढरं एखाद्याच्या शेतात गेली तर मारहाण झाल्यावर मुडदे जरी पडले तर कोण येणार आहे का विचारायला? तुमच्या-आमच्या आई-बहिणींची जरी अबू लुटली तर कोण येणार आहे का वाचवायला? तुमच्या जमिनी लुबाडल्या नरडीवरुन फासाचा नांगर जरी चढवला तर आता कोण आहे का तुम्हाला विचारायला? एकवेळ अशी होती जेव्हा ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेवजी जानकर साहेब मंत्री होते तेव्हा मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांच्या ऑफिसमधून फोन करायला लावले होते. पण आता अशा घटना घडल्यानंतर सांगायचे कोणाला? बोलायचे कोणाला? पावसात भिजत भाषण ठोकणाऱ्यां त्या बापाला धनगरांची एवढी काळजी असती तर स्वतःच्या पोरीला पुरंदरच्या त्या आमच्या ताईची विचारपूस पाठवले नसते का?
         दोन-चार शब्द लिहायला वाचायला शिकला, पुण्या-मुंबई सारख्या शहरात राहिला, दोन-चार रूपडं कमवायला लागला म्हणजे तुम्हाला फार मोठी अक्कल यायला लागली असे होत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असला तरी ५ वरून १ वरती येणे म्हणजे परिवर्तन नव्हे तर राजकारणापासून परावर्तन होय. राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने जाऊ द्यायचे असते भले ते भावनिकतेवरती चालत नसते हे जरी मान्य असले तरी प्रस्थापितांच्या गुलामगीरीचं ओझं कधीपर्यंत वाहायचं, अन्याय अत्याचाराच्या रहाटगाडग्यात कधीपर्यंत पिचत राहायचे? हे जर समजत नसेल तर त्या शिक्षणाचा काय अर्थ? जे शिक्षण आई-वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्हा-आम्हाला दिले. इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजातील नेतृत्व संपवण्यासाठी चंग बांधून बसली होती हे सर्वज्ञात असताना आपल्याच समाजातील खुळचट मंडळी स्वतःचाच आणि स्वतःच्या समाजाचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत बसत असतील तर धनगर समाजाचे २०१४ ला ५ आमदार विधानसभेत गेले होते त्यावरून ते २०१९ ला १ वरतीच येणार आणि हे असेच जर चालत राहिले तर २०२४ ला इतिहासात जमा होणार. राजकारणाच्या चाली एकट्या पवारांनी अथवा पेशव्यांच्या औलादींनी खेळाव्या असे नाही तर धनगर समाजाचा एखादा नेता अशी चाल खेळला तर भावनिक व्हायचे नसते. वस्तुस्थिती अशी आहे की धनगर
नेत्याचे आपणच असे खच्चीकरण करत असतो की शरद पवारांची आणि ब्राह्मणांची चाणक्य नीती आपल्यावर कधी लागू झाली तेच कळत नाही. कारण आम्ही अभ्यास करत नाही, इतिहास वाचत नाही. फक्त तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे होतो आणि निकाल हाती आल्यावर त्याच धनगर नेत्यांच्या नावाने तुणतुणे वाजवत बसतो हीच का आमची राजकीय प्रगल्भता? हीच का आमची सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता? यास नेते सुध्दा अपवाद नाहीत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत जेवढा समाज जबाबदार आहे... एखादा सांगायला गेला तर तो फार शहाणा वाटतो परंतु जो सांगतोय तो अभ्यास करूनच विचार करूनच सांगतोय याकडे लक्ष नसते. फक्त अहंकार नसानसात ठासून भरलेला असतो. आणि तोच अहंकार आज धनगर समाजाचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसलाय.
         खरंतर संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधी संपत नाही. जरी धनगर समाजातील नेते निवडणुकीत पडले असतील पण ते हरले नाहीत आणि हरणार सुद्धा नाहीत. खरंतर प्रस्थापितांच्या पवार नीतीमुळे नेत्यांचेच नाही तर अखंड धनगर समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे हे जर शिकलेल्या सवरलेल्या युवा पिढीला कळत नसेल, अन्यायची चीड येत नसेल तर काबाडकष्ट करून, भटकंती करण्यासाठी गेल्यावर शेतकऱ्यांच्या शिव्याशाप खाऊन तुम्हा-आम्हाला शहाणपण यावं म्हणून शिकवणाऱ्या आई-बापाचं कष्ट हे निरर्थक म्हणावे लागेल. जर समाजाचा विकास करायचा असेल/प्रगतीपथावर जायचे असेल तर समाजाला राजकारणाशिवाय दुसरा तिसरा कोणताही मार्ग नाही. अजून कधीपर्यंत झोपेचं सोंग घेऊन बसणार आहात? अजून कधीपर्यंत अन्याय सहन करणार आहात? आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा आणि घोंगड्याची ताकद दाखवून द्या. त्यासाठी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवूनच एक व्हा, नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     ✍️️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123

Saturday, 19 October 2019

समाजाने सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता जोपासावी : ✍️नितीनराजे अनुसे



          राजसत्ता आणि राजपथ कधी मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्त्व आदरणीय ना.महादेवजी जानकर साहेब आजही सांगतात.  शिवाय राजकारण हा विकासापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग आहे असे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. *आजच्या राजकारणात समाजकारणात तुमच्या-आमच्या सारख्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या व्यक्तिंमुळे आणि सहकार्यामुळे समाजातून अशी कितीतरी नवनविन नेतृत्वं घडत असतात तयार होत असतात.* अपवादात्मक काहीजण त्याचा गैरवापर करून स्वताची घरं भरत असतात म्हणून त्याचा दोष उर्वरित इतरांना देऊन चालत नाही अथवा सत्तेचा वापर केवळ जनतेच्या विकासासाठीच करणारे नेतृत्व खोडून चालणार नाही कारण ते नेतृत्व घडण्यासाठी फार मोठा संघर्ष केलेला असतो फार मोठा लढा दिलेला असतो. प्रस्तापितांकडून होणाऱ्या त्रासाला न जुमानता नजरेस नजर मिळवून छातीठोकपणे त्यांच्या विरोधत त्यांच्या नाकात दम ठोकून तयार झालेली नेतृत्व सहजासहजी मिळत नाहीत. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठीचा लढा अर्थातच धनगर समाजाचा जीवनमरणाचा, आत्मियतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सर्वजण आपापल्या परीने वेगवेगळ्या मार्गाने लढा उभारत आहोत. मग रस्त्यावरची लढाई असो अथवा ती न्यायालयीन लढाई असो. असे असताना आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये सर्वच पक्षातून तर कोणी अपक्ष मधून धनगर समाजाचे उमेद्वार जय्यत तयारी करून मैदानात उतरले आहेत. अर्थातच सामाजिक प्रबोधनातून जनजागृतीतून समाजात हळूहळू परिवर्तन होत चालल्यामुळे पुर्वीपेक्षा राजकारणात आणि समाजकारणात धनगर समाजाचा टक्का वाढतोय हे कोणीही नाकारू शकत नाही. पण एवढ्यावरच आपल्याला थांबून चालणार नाही तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर जास्तीत जास्त उमेद्वार पाठवल्यानंतर विधानसभा/विधानपरिषद आणि लोकसभा/ राज्यसभा यांसारख्या ठिकाणी धनगर समाजाची माणसं पोहचणे आवश्यक आहे जेथून जनतेच्या विकासाच्या चाव्या फिरवल्या जातात. ज्याठिकाणी कायदे बनवले जातात त्याठिकाणी आपली माणसं असायला हवीत आणि ती काय सहजासहजी तयार होत नाहीत ते नेतृत्व घडावयास फार काळ लागतो मग *विधानसभेच्या निवडणूकांमधून आपल्याच माणसांना पाडायचा विचार करत असाल तर महाराष्ट्र राज्यातून परिणामी भारत देशातून कित्येक नेतृत्व उभे करायच्या ऐवजी जर ते खोडायचंच काम करणार असाल तर मग कशाला हवंय समाजप्रबोधन? कशाला पाहिजे समाजजागृती?? कशाला पाहिजे समाजाला सत्तेत वाटा?? जे आजपर्यंत पुर्वीपासून चालत आले आहे तेच चालुद्या ना मग...* आम्ही पाठीमागे आहोत आमचा समाज पाठीमागे आहे, आमचा विकास होत नाही, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत आजपर्यंत धनगर समाजाव्यतिरिक्त ज्याला ज्याला पाठवले त्यांनी समाजाचे नव्हे तर जनतेचे काहीच काम केले नाही या गोष्टी ओरडून ओरडून सांगायची गरजच काय? इतर नेते चुकीचे वागले तर त्यांची चुक पोटात घालून ठेवता मग धनगर नेत्यांकडून चुका झाल्या तर लगेच पित्त का खवळते? का तर आपला आहे म्हणूनच ना? मान्य आहे की आपला आहे म्हणून परंतु तुमची माथी भडकवणारी इतर जातीमधील लोकं आपल्याच समाजात भांडण लावताहेत हे कधी समजणार आपल्याला?
         आज कुठेतरी संघर्षात्मक लढा देऊन धनगर समाजातून तयार झालेले नेतृत्व उदयास येत असताना त्याचा फायदा समाजाला मिळेलच त्यात काही वाद नाही पण भाजपाने धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल काही पाऊले उचलली नाहीत म्हणून जर त्या पक्षातील आपल्याच जमातबांधवांना पाडणार असाल तर मग विरोधकांच्यात आणि आपल्यात फरक तर काय राहिला? असेही विरोधकांनी धनगर आरक्षणासाठी किती दिवे लावून ठेवलेत? एकीकडे इतर समाजातील काही मंडळी त्यांच्या आरक्षणासाठी जातबांधवांनाच मतदान करायचे ठरवून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा कशा ताब्यात घेतां येतील याची व्यूहरचना आखून ते यशस्वी सुद्धा झाले, मग तो उमेद्वार कोणत्याही पक्षाचा असो एका पक्षातून मजबूत नेतृत्व उभा करायचे तर दुसऱ्या पक्षातून केवळ नाममात्र उमेद्वार द्यायचा जेणेकरून मजबूत आणि जनतेत ओळख असलेल्या उमेद्वारांना निवडून आणायचे ही त्यांची खेळी आहे. आपल्या समाजात मात्र तसे काही होताना दिसून येत नाही केवळ पाय ओढायचेच काम चालू आहे असे दिसून येतेय. मग आपल्यातलेच जमातबांधव आपल्यातल्याच जमातबांधवांना घरात बसवण्याच्या वल्गना करताना दिसून येतात यात कोणते शहाणपण आहे ते मला तर कळत नाही. मग कसा होणार समाजाचा विकास? कोण करणार समाजाचा विकास?? आजपर्यंत इतरांनी किती आपला विकास केला? म्हणून आता करणार आहेत? मग आपल्याच जमातबांधवांना घरात बसवून काय साध्य करणार आहात??
         बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत आहे अशातला विषय नाही पण मला जे विचार सुचले जे योग्य वाटले म्हणून ते मी या माध्यमातून मांडले. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात त्याबद्दल दुमत नाही पण आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाईसाठी देखिल आपण सज्ज आहोत. जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्या आरक्षणाच्या आधारे अनेक राखीव जागा मिळतीलही पण आतापर्यंत संघर्षातून तयार झालेले आणि संघर्षातून, सामाजिक लढ्यांतून तयार होणारे नवयुवकांचे नेतृत्व खोडून टाकले तर ते पुन्हा तयार व्हायला, पुन्हा नेतृत्व घडायला फार वेळ लागेल आणि त्यामुळे अजून कितीतरी पिढ्या यामध्ये भरडल्या जातील या गोष्टीची जाण असायला हवी. *पायात पाय अडकवून पाडणाऱ्यांपेक्षा हातात हात देऊन पडलेल्यांना उठवण्यास मदत करणारा श्रेष्ठ असतो हे लक्षात असु द्या.*विधानसभेच्या माध्यमातून आपल्या समाजबांधवांच्या मुलभूत गरजांची पुर्तता आपण करू शकतो म्हणूनच मला म्हणायचे आहे की *एकवेळ जास्तीत जास्त उमेद्वार उभे करायला शिका एकवेळ नाही निवडून आले तरी चालतील पण तो केवळ भाजपाचा आहे, राष्ट्रवादीचा आहे आमुक पक्षाचा आहे तमूक गटांचा आहे म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न करू नका एवढीच कळकळीची नम्र विनंती.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com