Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Thursday, 30 August 2018

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे
       गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती विनाकारण अन्याय व अत्याचार होत आला आहे ते आम्ही निमूटपणे सहन करत आलो पण जातीचा धनगर आता शांत बसणार नाही.  आर नाहीतर पार ही भूमिका घेऊन धनगर समाजातील युवा वर्ग आक्रमकपणे अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने सहभागी होतोय.  धनगर समाजाचा स्वाभिमान जागा झाला असून आता प्रस्थापितांची खैर नाही हे निश्चित आहे.
      आजपर्यंत धनगर समाज हा गटातटात विभागल्याने लढाईला यश आले नाही याला इतिहास देखील साक्ष आहे परंतु उद्या दि.  ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज एकत्रित येणार आहे. कधी काळी शाळेत असताना गुरूजींनी "एकीचे बळ" यावरती एक गोष्ट सांगितलेली आठवते ती गोष्ट आज मुद्दामहून तुम्हा सर्वांना सांगतोय.  "एका आश्रमात गुरू आचार्य त्यांच्या शिष्यांना शिक्षण देत असताना ते पाचही शिष्यांना आश्रमाबाहेर बोलावतात. शिष्य गोंधळून जातात की आज गुरूंनी आपल्याला बाहेर का बोलवलं असावं?  पाचही शिष्य बाहेर आल्यानंतर गुरूवर्य प्रत्येकाच्या हातात एकेक काठी देतात व ती हाताने तोडायला सांगतात.  तेव्हा एकेक करून प्रत्येकजण ती काठी गुडघ्यावर वाकवून तोडून दाखवतात.  तेव्हा शिष्यांना काहीच विशेष वाटत नाही परंतु हे झाल्यावर आता गुरूवर्यांनी एका काठीऐवजी पाच काठ्यांचा गठ्ठा तयार करून पहिल्या शिष्याच्या हातात दिला व तो गठ्ठा तोडायला सांगितले. आता मात्र खरी कसोटी होती. पहिल्या शिष्याने हवे तसे खूप प्रयत्न करून देखिल तो गठ्ठा तुटला नाही.  एवढेच नव्हे तर तो दुसर्या तीसर्या चौथ्या पाचव्या शिष्यांना देखिल तुटला नाही. शेवटी त्यानी गुरूवर्य आचार्यांना विचारले की गुरूजी आम्ही एकेक काठी सहजपणे तोडली पण हा पाच काठ्यांचा गठ्ठा आम्ही खूप प्रयत्न करूनही तुटला नाही असे का? तेव्हा गुरूवर्य आचार्य म्हणाले की तुम्ही जर जीवनात एकटेच लढत बसाल तर तुम्ही त्या एकट्या काठीप्रमाणे तुटून पडाल आणि जर तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन लढाल तर तुम्ही कधीच तुटून जाणार नाही.
       धनगर समाजातील तमाम समाजबांधवांना मला एवढंच सांगायचे आहे की आजपर्यंत आपण वेगवेगळे गटातटात लढत बसलो होतो म्हणुन आपली दखल कोणी घेतली नाही आणि इथून पुढेही घेणार नाहीत. पण उद्याच्या ३१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची एकी दाखवून दिली तर जगातील कोणतीच शक्ति आपल्याला पराभूत करू शकणार नाही ही काळ्या दगडावरील रेखा आहे. एकजुटीचा नेहमी विजय होत असतो एवढी त्यामध्ये असते म्हणून एकीचं बळ महत्वाचं आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच धनगर समाजातील तळागळातील धनगर समाजबांधवांनी उद्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. वेगवेगळ्या चुल्हा मांडून वेगवेगळा संसार मांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित या.  सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारा धनगर समाज कधीच षंढ होणार नाही हे अख्खा जगाला कळू द्या आणि महत्वाचं म्हणजे थंड राहून षंढ राहण्यापेक्षा बंड करून गुंड झालेले अधिक बरे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंराजे!!
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        +918530004123
nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 27 August 2018

...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. :नितीनराजे अनुसे


...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. 
             📝नितीनराजे अनुसे
     केरळमध्ये झालेल्या भयानक नैसर्गिक आपत्तिजनक पूरामुळे सोशल मिडीया (फेसबुक/व्हाटसएप) पासून मी काही काळ दूर होतो. त्यामुळे खूप दिवसानंतर समाजकार्याच्या प्रवाहात पुन्हा त्याच तळमळीने, त्याच जिद्दीने, त्याच तडफडतेने तुमच्याशी संवाद साधतोय. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा आज महाराष्ट्र राज्यभर चांगलाच तापलाय, त्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज देखील पेटुन उठलाय. प्रत्येक समाजबांधव स्वताला या अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने झोकून देतोय ते फक्त उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच...
       धनगर समाजाने या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ हजारो वर्ष राज्यकारभार केला त्या धनगर समाजाच्या डोक्यावर प्रस्थापित राजकीय नेत्यांनी गेल्या ७० वर्षापासून अन्यायाची तलवार सदैव टांगतीच ठेवली आहे. म्हणजेच गेल्या ७० वर्षापासून त्या प्रस्थापित औलादींचा नंगानाच चालू असताना हा समाज निमूटपणे सहन करत होता पण आता ते शक्य नाही. धनगर समाजाच्या सहनशीलतेचा आता अंत झाला असून धनगर समाजातील युवा वर्ग आता पेटून उठला आहे आणि अन्याय करणार्या प्रस्थापित औलादींना पेटवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असे चित्र आज महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतेय. विश्वरूपी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीचा, धनगर जमातीच्या संस्कृतिचा, देवदेवतांचा,  राहणीमानाचा,  अभ्यास करूनच धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये सामाविष्ट केले होते तरीदेखील ७० वर्ष उलटली तरी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू केल्या नाहीत एवढा प्रचंड मोठा अन्याय धनगर जमातीव्यतिरीक्त इतर कोणत्याही जातीजमातीवर झाला नाही त्याचे कारण म्हणजे धनगर समाजाचे शैक्षणिक मागासलेपण होय. सर्वप्रथम १९८९ मध्ये  क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांनी धनगर आरक्षण चळवळीला जन्म दिला त्यानंतर हळूहळू ही चळवळ फोफावत गेली परंतु स्व बी के कोकरे साहेब आपल्यात असते तर धनगर समाजाला एवढा संघर्ष करावा लागलाच नसता.
       संसदीय वाद-विवाद राज्यसभा प्रतिवेदन दि २२ डिसेंबर  १९८९ हे भारत सरकार मार्फत प्रसिद्ध होणारे राज्यसभेचे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेलच की राज्यसभेमध्ये खा. सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन  राज्यसभेचे  सभापति महोदय  रामविलास पासवान  यांनी सुद्धा कबूल केले होते की राज्यघटनेत  महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये  अ. क्र. ३६ वरती नमूद केलेली जमात ही धांगर अथवा धनगड नसून ती धनगर अशी आहे. महाराष्ट्र राज्यातील संबंधित धनगर समाजाला राज्यघटनेनूसार अनुसूचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात त्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारला तसे शिफारस पत्र पाठवायला हवे.  याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार दि १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार दि १९ मार्च २००१ त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व शासकीय राजपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये अ. क्र. ३६ वरती ओरॉन, धनगर असा स्पष्ट आणि शुद्ध उल्लेख आहे. परंतु आदिवासी विकास संस्था आणि आदिवासी मंत्रालय सांगते की  तो उल्लेख धनगड असा आहे आणि धनगड ही जमात आजही महाराष्ट्र राज्यात आहे. तर बुद्धि पाजळणारे पुण्यातील काही प्राध्यापक बरळतात की "धनगड जमात महाराष्ट्र राज्यात नसून नमूद केलेली जमात ही धनगर हीच आहे" हा धनगर समाजाचा दावा चुकीचा आहे. पुढे तेच दिडशहाणे स्पष्टीकरण देताना म्हणतात की पूर्वी महाराष्ट्र राज्यात धनगड ही जमात होती ती १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याचे विभाजन झाल्याने ती जमात मध्य प्रदेश मध्ये गेली त्यामुळे महाराष्ट्र राज्यात धनगड जमात सापडत नाही. मग त्या प्राध्यापकांनी आदिवासी विकास संस्थेचा अहवाल वाचला आहे का नाही कोणास ठाऊक ज्यांच्या रेकॉर्डनूसार एका व्यक्तिपासून १० वर्षात ७० हजाराच्या वरती धनगड जमात तयार होते हे काय गौडबंगाल आहे?  ही कोणती प्रजनन क्षमता असलेली जमात आहे.  बर १९६० साली जर धनगड जमात मध्यप्रदेशात गेली तर मग १९९६,  २००१, २००७-०८,  २००९-१० या शासकीय राजपत्रांमध्ये ओरॉन, धनगर हा उल्लेख कसा काय येतोय?   सरकार काय भांग पिऊन राज्यकारभार करतंय का? की त्या त्या विभागाचे सचिव दुधखुळे आहेत? जर खरंच धनगड ही जमात मध्य प्रदेशात गेली असेल अथवा नामशेष झाली असेल तर मग महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जो काही कोट्यवधींचा शैक्षणिक, सामाजिक विकास निधी येतोय त्यामध्ये धनगर/धनगड जमातीसाठी सुद्धा निधी येत असेल तर मग गेल्या ७० वर्षापासून त्या  धनगर/धनगड जमातीच्या निधीचे नक्की काय झाले?  कोणाच्या घशात तो निधी गेला?  गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत आदिवासी विकास मंत्रालय विभागातील सर्व आजी/माजी मंत्र्यांची आणि आयुक्तांची यादी काढून त्यांना जाब विचारला तर सत्य बाहेर पडेल. आणि जर खरंच धनगड जमात महाराष्ट्र राज्यात असेल तर धनगर समाज आपली मागणी माघारी घेईल नसेल तर संबंधित आदिवासी विकास संस्था, आदिवासी विकास मंत्रालय आणि धनगर समाजाची फसवणूक करणार्या आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला धनगर समाजाच्या वतीने दाखल करण्यात येईल. कारण थोर समाजसुधारक अब्राहम लिंकन म्हणतात की लोकांनी लोकांच्या हीतासाठी, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.  मग लोकशाहीत एखाद्या जमातीवर वर्षानुवर्ष विनाकारण अन्याय अत्याचार होत असेल,  एखाद्या जमातीला ७० वर्ष न्याय मिळत नसेल तर त्या त्या राज्याचा प्रतिनिधि त्यासाठी जबाबदार ठरतो. म्हणुन आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा.
         गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा अखेरचा लढा युवकह्रदय सम्राट मा गोपीचंद पडळकर साहेब व मा. उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चालू आहे. त्याला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून धनगर समाजाचा, युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज आता अन्यायाच्या विरोधात पेटून उठला असून सर्व समाजबांधवांनी समज गैरसमज, राजकीय/सामाजिक मतभेद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे. कोणी म्हणतील त्यांना आमदार खासदार बनायचं आहे म्हणून हा उद्योग चालू आहे तर मग होऊ द्या ना... दोन कोटी धनगर समाजातून कमीत कमी १०० आमदार तरी होऊद्या त्यात हे दोघे झाले तर काय बिघडेल? तुम्ही पण आमदार व्हा खासदार व्हा परंतु अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी रस्त्यावर उतरा. ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा आणि महत्वाचं म्हणजे तोंड वाजवूून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंराजे
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
          +918530004123
   nitinrajeanuse123@gmail.com

Thursday, 19 July 2018

आतातरी धनगर नेते एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील का? ✍️नितीनराजे अनुसे

            २०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकी दरम्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल भाषणबाजी करून धनगरांची मते खेचून घेतली. मोदींच्या त्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा आमच्याकडे आहेत. भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की "या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाने माझा यथोचित सन्मान केला त्या धनगर समाजाच्या पाठीत (अप्रत्यक्षरीत्या पवारांनी) सुरा  खुपसला" असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. शिवाय "कमीत कमी धनगर समाजाची मागणी काय आहे हे तरी ऐकून घ्यायला हवे होते." असेही ते म्हणाले होते. त्यावेळी सभामंचावर बाळासाहेब (तात्या) गावडे, ना.महादेवजी जानकर साहेब तसेच अन्य धनगर नेते देखील उपस्थित होते आणि सर्वजण मोदींच्या या डायलॉग वरती उभे राहून समाजाला हातवारे करत होते.
         जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर मधून बारामतीकडे आरक्षण दिंडी निघाली तेव्हा बघता बघता २१ जुलै पर्यंत पाच ते सहा लाख धनगर समाज त्या आरक्षण दिंडीत सामील झाला. बारामतीमध्ये पिवळे वादळ घोंघावत उठले, पवारांच्या घराला सुरक्षा यंत्रणेने छावणीचे स्वरूप दिले होते. धनगर समाजात क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या खंबाटकी घाटातील आरक्षण लढ्यानंतर पहिल्यांदाच कुठेतरी आरक्षणासंदर्भात असंतोषाची लाट उसळली होती. युवा वर्ग पेटून उठला होता परंतु धनगर समाजाची मागणी नक्की काय आहे हे ऐकून घ्यायला कोणताच प्रस्तापित नेता पुढे येत नव्हता. शेवटी धनगर समाजातील युवा वर्ग उपोषणाला बसला, काहीजणांची तब्येत ढासळू लागली शेवटी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही सत्तेत बसवा. सत्ता आल्यावर १० दिवसांत आम्ही आरक्षण देणार, पहिल्याच कैबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे सांगून उपोषण सोडायला लावले. मग सुरू झाला आश्वासनांचा खेळ धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालोय असे सांगून १५ दिवसांत निर्णय घेतो, TISS नेमल्यानंतर ९ महिन्यांत निर्णय घेऊ, अजून अभ्यास चालू आहे. असे सांगून सत्तेचा उपभोग घेत सत्तापिपासू भाजप सरकारने समाजावरती अन्याय करण्याचा अगदी नंगानाच चालवला. सोलापूर विद्यापीठ नामांतरण प्रकरणात देखील तीच अवस्था.  धनगर समाजातील नेत्यांचा वापर करून चार वर्ष सत्ता भोगली आणि शेवटी धनगर समाजाच्या हाती काय दिले तर धनगर आरक्षण विरोधी असणारा "से".
           मग अखंड धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजातील नेत्यांना मला विचारायचे आहे की तुम्ही मोठमोठ्या स्टेजवरून जाहीर भाषणं केली त्यांच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत गरज पडल्यावर त्या सोशल मीडियावरून प्रकाशित करू. समाजबांधवांना आणि त्या त्या नेत्यांच्या समर्थकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नयेत कारण इथे माझ्या घरचा नव्हे तर अखंड धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि अखंड महाराष्ट्र राज्यातून ज्या प्रतिक्रिया मला येतात त्या सर्वसामान्य धनगर समाजाला जे प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न मी इथे मांडलेत.
● नागपूर येथील सभेत बोलताना ना.महादेवजी जानकर साहेबांनी स्टेजवर बसलेल्या  मुख्यमंत्र्यांना ठासून सांगितले होते की जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर फडणवीस साहेब तुमचा आम्ही अजित पवार करू.... मग आता त्यांचा कधी अजित पवार करणार? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पडलाय.
●आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात ना.राम शिंदे साहेबांनी सांगितले होते की आम्ही आरक्षणासाठी प्रयत्न करतोय आणि भाजप सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे... मग आता सरकारची अनुकूलता कुठे गेली?  आता सरकारच्या विरोधात कधी बोलणार की RSS च्या पायाखलचं मांजर बनून राहणार?
●त्याच मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे मा.गोपीचंद पडळकर साहेब बोलले की जर भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर धनगर समाजाच्या सोबत राहून भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊ... आज "अखेरचा आरक्षण लढ्यासाठी" त्यांच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत पण अजून किती दिवस गप्प राहायचे? कधी आक्रमक पवित्रा घ्यायचा? सरकारला कधी जाब विचारायचा?
● खासदार विकास महात्मे साहेबांनी डिसेंबर २०१५ ला जो मोर्चा आयोजित केला होता त्याचे फलित काय झाले तर TISS चे भूत धनगरांच्या मानगुटीवर बसवले आणि अगोदरच राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या यादीत असलेला धनगर समाज अनुसूचित जमातीचे (आदिवासींचे) निकष पूर्ण करतो की नाही यासाठी त्या संस्थेमार्फत अहवाल मागवले त्याचा परिणाम म्हणजेच धनगर आरक्षण विरोधी "से". मग TISS चांगले आहे आणि भाजप सरकार आरक्षण द्यायला सकारात्मक आहे असे जाहीर सभांमधून सांगणाऱ्या महात्मे साहेबांनी सांगावे की आता काय करायचे?
● गणेश(दादा) हाके हे देखील शनिवारवाड्यावर बोलायचे फक्त भाजप सरकार आरक्षण देईल म्हणून छाती ठोकायचे आता कुठे गेले? आता सांगा कधी देईल भाजप सरकार धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण?
●असे कितीतरी धनगर नेते आहेत ज्यांची यादी वाढेल तेवढी वाढवता येईल, कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे म्हणत होते की आरक्षण दिले तर फडणवीस सरकारच देईल मग आता काय? कुठे गेले राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण? कुठे गेली पोकळ आश्वासने?
            समाज नोकऱ्या सोडून, आपापला छोटा-मोठा धंदा सोडून, मेंढपाळ हे शेळ्या-मेंढ्या वाड्यात कोंढून, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले-मुली, समाजातील माझ्या माताभगिणी आरक्षणासाठी एकत्रित येतात आणि रस्त्यावर उतरतात. पण ते सर्वजण धनगर नेते कधी एकत्रित आलेत का? सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी कधी चर्चा केली का? एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी जेवढी ताकद पणाला लावली तेवढीच ताकद सर्वांनी मिळून लावली असती तर भाजप सरकारचं काय घेऊन बसलाय? पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी आडवे आले असते तरी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात 'से' दाखल करायची हिम्मत कोणाची झाली नसती. समाजामुळेच धनगर समाजातील नेते आहेत, नेत्यांमुळे समाज नाही हे धनगर नेते आतातरी लक्षात घेतील का?  आणि विशेष म्हणजे 'इगो' सारखा महाभयानक राक्षस बाजूला ठेवून धनगर नेते ज्या भाजप सरकार बद्दल गोडगोड बोलत होते त्या भाजप सरकारला याचा जाब विचारतील का? नाहीतर पुन्हा कोणाचेतरी दलाल होऊन समाजाला कोण्या लांडग्यांच्या दावणीला बांधतील? आतातरी धनगर नेते एक होतील नेक होतील, सत्ताकारणापासून डावलेल्या विषम समाज घटकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील. जोपर्यंत हाताची पाच बोटं सोबत असतात तोपर्यंत त्या हाताची मूठ बळकट/मजबूत राहते. आणि मूठ बळकट/मजबूत असेल तरच अन्याय करणाऱ्यांचे थोबाड वाकडे करता येते. नाहीतर विस्कटून राहिलात तर तुमची दखल कोणी घेणार नाही आणि तुमचं आस्तित्व देखील कोणी शिल्लक राहू देणार नाही यावरती जरा आत्मचिंतन करुन इतर जाती-जमातींना धनगर नेते एकत्रित येऊन खरोखर सत्या स्थापन करतील.... असा आशावाद माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजमनात घुमतोय...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
 nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday, 11 July 2018

झु़ंज देण्या साथ द्या -📝किर्ती नितीनराजे अनुसे

झु़ंज देण्या साथ द्या
       -📝किर्ती नितीनराजे अनुसे

झुंज देत मृत्यूलाही राजे तुम्ही लढला
तुमच्या पराक्रमाचा पाढाही जगाने वाचला
झुंजारांची फौज घेउन राजे तुम्ही झुंज देत राहीला
मातीच रक्षन करण्यासाठी देह तुम्ही वाहीला
उजळुद्या परत एकदा ती होळकरशाही अन् उमलु द्या पुन्हा एकदा तुमच विर पुष्प
राजे यशवंत तुमच्या घामाचे थोडे दान द्या
पुन्हा एकदा झुंज देण्या हात द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या साथ द्या....

सिंहाची ती तुमची चाल अन्
गरुडाची ती नजर द्या
स्त्रीयांचा आदर अन् शत्रूचे मर्दन
करन्याची शक्ती द्या
ढाल चिरून शत्रुवर मात करनारी ती तुमची बळकट तलवार द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

होळकरशाही संपली तशी माणसंही बदलली
स्वत:चं घर भरण्यासाठी सर्वांनी माणूसकी सोडली
राजे तुम्ही केला गणिमी कावा शत्रुंवरती
आता आपलेच करती आपल्यांवरती
किड्यामुंगीपरी जीवन जगत आहेत तुमचे मावळे
त्यांना स्वाभिमानाची शिदोरी द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या.

लाख हत्तींचे बळ असूनही तुमची धनगरशाही आज निष्क्रीय आहे
कारण इथे स्वतःला धनगर म्हणवून घ्यायची लाज आहे
त्यांच्या मुठीमध्ये तुमचे पोलादी बळ द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

आपल्या हक्कासाठी राजे तुम्ही रात्रंदिवस झुरलात
जनतेच्या अंधारी दुनियेत तुम्हीच तर सुर्य ठरलात
आजच्या या मावळ्यांना सुर्याचे ते तेज द्या
आपल्या हक्कासाठी लढण्या त्यांना हिम्मत द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

राजे तुम्ही एकटेच सगळ्या इंग्रजांना पुरून उरलात
परंतू आजचे तुमचे मावळे हे पक्षा -पक्षात विभागलेत
या युवा वर्गाला क्रांतीची मशाल द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

घाबरून पळणारे शत्रु होते अन् घाबरवणारे राजे तुम्ही होतात
पण आज पळणारे ही आपलेच अन् पळवणारे ही आपलेच
तुम्ही आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जनतेच्या न्यायासाठी लढलात
पण आज आपल्यांच्याच विरोधात आपलेच मोर्चा काढतात
त्यांना इतिहासाची आठवण अन् धनगरी ताकतीची जाण करुन द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

भाऊबंधावर झालेल्या अन्यायामुळे राजे तुम्ही पेटून उठलात
पण आज भाऊबंधांच्या विरोधातच कट रचले जातात
या सर्वांना धनगरी तांड्याच्या एकजुटीची शिकवण द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या...
        📝किर्ती नितीनराजे अनुसे
                    प्रकाशक
           राजे प्रकाशन सांगली
📩rajepublications@gmail.com

Friday, 6 July 2018

बोकड निर्यातबंदी म्हणजे धनगरांच्या अधोगतीसाठीची घंटा... ✍️नितीनराजे अनुसे

                प्राचीन काळापासून धनगर जमातीचा व्यवसाय हा मुख्यत्वेकरून शेळी-मेंढी पालन हाच आहे हे आजच्या शेंबड्या पोराला सुद्धा माहीत आहे. मग बोकड निर्यातबंदीचा निर्णय घेणारे अधिकारी आणि सरकार कुठे शेण खात बसलंय कोणास ठाऊक? जैन धर्म अथवा धनगर ही आदिम जमात आजकाल नव्यानेच जन्माला आली नसून त्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे. आदिम काळापासून पशुपालक हे पशूंचा वापर दुध, मांस, शेती, व्यापार तथा दळणवळण इ.चे साधन म्हणून करत होते. हे इतिहासातच नव्हे तर भूगोलात देखील सर्वांनी अभ्यासले आहे. आजही गवळी-धनगर समाज हा गाई-बैल, म्हैस, घोडा यांचा दुधासाठी, व्यापारासाठी, शेतीच्या कामासाठी तसेच दळणवळण करण्यासाठी वापर करतो तर शेळ्या-मेंढ्यांचा विशेषतः दुध, मांस तथा व्यापारासाठी वापर करतो. हजारो वर्षाची ही परंपरा प्राणपणाने जपत आजही बहुतांश धनगर समाज शेळी-मेंढीपालन या व्यवसायावरती अवलंबून आहे.
             काही वर्षांपूर्वी जातीयवादी सरकारने कुरघोड्या करून गवळी-धनगर यांच्या वहिवाटीच्या जमिनी, गाईराने, चराऊ कुरणे घशात घातली तर काही माजलेल्या प्रस्तापित नेत्यांनी दादागिरी, गुंडगिरी करून शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुंड्या मुरगळून त्या जमिनी घशात घातल्या तर सत्तेचा गैरवापर करून गाईराने, चराऊ कुरणे ही देखील स्वताच्या तसेच पाहुण्या-राऊळ्यांच्या घशात घातली आणि पशुपालन करणाऱ्या समाजावर भटकंती करण्याची वेळ आली. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांचा शिव्याशाप खात तर कधीकधी वेळप्रसंगी प्रसाद (मार) खात गपगुमानं शेळ्या-मेंढ्यांची राखण करून पायाच्या नडग्या वाळेपर्यंत गावंच्या गावं पालथी घालून शेळ्या-मेंढ्यांसोबत स्वताच्या देखील पोटाची खळगी भरण्यासाठी माझा धनगर समाज बांधव वणवण फिरून व्यवसाय करू लागला, वाडवडिलांची बापजाद्यांची परंपरा तशीच पुढं चालवू लागला, दुष्काळाशी दोन हात करून आस्मानी संकटांना आवाहन करत टीचभर पोटाची कशीबशी खळगी भरून लेकरा-बाळांना शिकवू लागला. मागच्या एक-दोन महिन्यापूर्वी यूपीएससी चे निकाल लागले त्यामध्ये मेंढपाळांची चार पोरं परिस्थितीशी झगडून झगडून आय ए एस झाली, मागच्याच आठवड्यात एमपीएससी चे निकाल लागले त्यात आरक्षण नसताना देखील मेंढपाळांची २७ पोरं आणि एक मेंढपाळाचीच मुलगी असे एकूण २८ जण राज्यसेवेच्या परिक्षेत यशस्वी झाले. म्हणजे धनगर समाजाच्या विकासाचा आराखडा दिवसेंदिवस जसजसा वाढत जाईल तसतसा प्रस्तापितांच्या, मनुवाद्यांच्या पोटात भितीचा गोळा येऊ  लागला, त्यांच्या पोटात मळमळू लागले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर जेव्हा मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या विमानातून आखाती देशांमध्ये जाऊ लागल्या तेव्हा धर्माचे पुजारी जागे झाले आणि धनगर समाजाची जी उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी या कपटी भावनेने जैन धर्मातील काही मंडळींनी बोकड निर्यातीवर बंदी आणावी म्हणून आंदोलने केली निवेदने दिली त्यावरती आकलेचे तारे तोडणाऱ्या बेअक्कल अधिकाऱ्यांनी इतिहास/भूगोलात अभ्यासले असताना देखील धनगर समाजाचा मेंढपाळ व्यवसाय बंद पाडण्यासाठी जी काही पाऊले उचलली त्याबद्दल त्या त्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या पात्रतेची मला कीवच येते. शिवाय उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप सरकारने देखील त्या बोकड निर्यातीवर तात्काळ बंदी आणली आणि धनगर समाजाला अधोगतिच्या दिशेने घेऊन निघाले. धनगर समाजाबद्दलची सरकारची अशी आत्मियता पाहून अक्षरशः हसू की रडू असेच झाले आहे.
    ★      मग त्या जैन धर्मातील मानवतेच्या पुजाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत...
१) तुम्ही शाकाहारी आहात तर शाकाहारीच रहा तुमच्यामुळे आम्ही का शाकाहारी व्हावे? राज्यघटनेत खाण्या-पिण्याच्या बाबतीत देखील स्वातंत्र्य दिले आहे. मग ही उठाठेव कशासाठी?
२) तुमच्यामुळे आम्ही शाकाहारी व्हायला हवे असे निर्बंध तुम्ही आणत असाल तर मग आमच्यामुळे तुम्ही देखील मांसाहारी व्हावे यासाठी आम्ही तुमच्यावर निर्बंध आणावा का?
३) जिवीत हानी होण्याचे भाकीत तुम्ही आज करता आहात मग जेव्हा मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासून म्हणजे हजारो वर्षांपासून माणूस मांसाहार करतोय. मग नेमकी आजच (बोकड निर्यातीवेळी) तुम्हाला कशी काय जाग आली?
४) जीव हानी (प्राणी हत्या) होतेय असे तुम्हाला वाटत असेल तर मग वनस्पती हे सुद्धा जीव आहेत. कारण जीव शास्त्रात (Biology) प्राणी शास्त्र (Zoology) आणि वनस्पती शास्त्र (Botany) हे विभाग येतात.)  मग शेतातील पिकवलेला भाजीपाला, धान्य, कडधान्य यांची हत्या करून तुम्ही सुद्धा धर्म भ्रष्ट करत आहातच ना?
५) एवढेच नव्हे तर तुम्ही जे दही एवढ्या आवडीने चवीने खाता त्या दह्यामध्ये सुक्ष्मदर्शीतून पाहिल्यावर लाखो Bacteria दिसतात त्या सुद्धा एक प्रकारच्या जीव आहेत. (हे Biology जीवशास्त्र सांगते एकदा अभ्यास करा) मग तुम्ही पण प्राण्यांची (जीवाची) हत्या केलीच ना?
६) आज तुम्ही बोकडांची निर्यातबंदी करून आनंदी झाला असाल? तुमच्या आनंदाला पारावर उरलाच नसेल... पण ज्या धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय शेळी-मेंढीपालन असताना त्यांच्या व्यवसायांवर गदा आणून तुमचा जैन धर्म खरोखरच पवित्र झाला का? म्हणजेच धनगर समाजाची अधोगती करण्यासाठी तुमचा जैन धर्म तुम्हाला शिकवतो का?
७) तुमच्या निवेदनाद्वारे बोकड निर्यातीवर बंदी आणली खरी पण जीव हत्या होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर मेंढपाळांनी या बोकडांचे करायचे काय? का सोडायची .......?
    ★    सत्ताधारी नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, निर्यातबंदीवर तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही कृतिशील असल्याचे दाखवून दिले खरे पण मेंढपाळांनी शेळी-मेंढीपालन करायचे सोडून मग आता करायचे तरी काय? का तुमच्या घरी आणून सोडू द्या? इतर छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी प्रत्येक मेंढपाळ बांधवांना करोडो रूपये देण्याची तरतूद तुम्ही करून ठेवली आहे का? नसेल तर मग नको तिथे मुर्खपणा करायला तुम्हाला कोण सांगते? एवढीच चपळता एवढीच निर्णय क्षमता तुमच्यात आहे तर मग धनगर आरक्षणाचे घोडे कुठे पेंड खात बसलंय? तिथे का चपळता कशी काय दिसून येत नाही.
            जिकडे तिकडे धनगर समाजालाच विरोध होताना दिसतोय. राजकीय क्षेत्रांत देखील धनगर समाजाला दोन मंत्री पदे मिळाली की काही प्रस्तापित नेत्यांना ते बघवले नाही, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हायला लागली की लगेच शिष्यवृत्त्या बंद करणे, वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षण रद्द करणे, राज्य सेवा परिक्षांमध्ये आरक्षण न देणे असे प्रकार घडत गेले आणि धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येने असूनही अन्याय सहन करत राहिला. काहीजरी केले तरी धनगर समाज सर्व सहन करू शकतोय असे धर्माचा डंका पिटणाऱ्या (अचानक जागे झालेल्या) मानवतेच्या पुजाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना, प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना वाटू लागल्याने धनगर समाजाची होत उत्तरोत्तर प्रगती त्यांच्या डोळ्यात सलू लागली मग करायचे काय तर धर्माच्या नावाखाली, मानवतेच्या नावाखाली, प्राणी हत्या(जीव हत्या)च्या नावाखाली आखाती देशांमध्ये भारतातून होणारी बोकड निर्यात बंद करून धनगर समाजाला पोट भरण्यासाठीचे सर्व दरवाजे बंद करायचे ही कटूनिती येथील ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच जैन धर्माचे पाईक म्हणवून घेणारे करत आलेत आणि धनगर समाज, धनगर नेते, आमदार, खासदार, मंत्री मात्र आळी मिळी गूप चिळी अन् पार्टी करू संध्याकाळी असे म्हणत धनगर समाजाला अधोगतीसाठीच्या दिशेने घेऊन चाललेत यासाठी समाजाच्या नावाखाली ज्या संघटना काम करत आहेत त्या सामाजिक संघटनांनी जबाबदारी घ्यायला हवी, निर्यातबंदी उठवण्यासाठी आक्रमक पाऊले उचलायला हवीत नाहीतर उद्या कोणीही ऐरेगैरे उठून समाजाच्या डोक्यावर बसून लघूशंका करतील ते देखील सहन करणार आहात का? असेच जर चालत राहिले तर समाजाची होत चाललेली उत्तरोत्तर प्रगती थांबून अधोगति व्हायला वेळ लागणार नाही मग ये रे माझ्या मागल्या म्हणायची आवश्यकता सुद्धा पडणार नाही.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
           ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
       +91 853 000 4123
  nitinrajeanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday, 19 June 2018

ओबीसी विद्यार्थ्यांनी आता काय भिक मागायची का? ✍️नितीनराजे अनुसे


       काल परवा अनेक वर्तमानपत्रातून तसेच टीव्ही चैनेल वरतून बातम्या झळकल्या की वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना नियमानुसार असलेल्या २७% आरक्षणाऐवजी केवळ २ % एवढेच आरक्षण मिळणार आहे आणि उर्वरित २५% आरक्षण हे  खुल्या वर्गाला म्हणजेच ब्राह्मण आणि मराठा समाजाकडे वळविण्यात आले आहे. म्हणजेच डॉक्टर व्हायचे असेल तर  जवळ जवळ १०० % ओबीसी विद्यार्थ्यांपैकी केवळ ७.४०% ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश घेऊ शकणार आणि उर्वरित ९२.६०%  टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहणार हे नरेंद्राचे आणि देवेंद्राचे अजब धोरण आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात २१ महाविद्यालयात तर ओबीसी वर्गाला कसलेही आरक्षण नाही ही महाराष्ट्र राज्यातील ओबीसी साठी म्हणजेच बहुजन समाजासाठी खरी चिंतेची बाब आहे. देशभरात १७७ वैद्यकीय महाविद्यालयात ३७११ जागा असताना त्यातील २७% आरक्षणानूसार १००२ जागा ह्या एकट्या ओबीसींना मिळायला हव्या होत्या परंतु त्यामध्ये कपात करून २% आरक्षणाप्रमाणे केवळ ७४ जागा ओबीसींना उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्याखालोखाल अनुचित जाती या वर्गाला ५५५ तर अनुसूचित जमातीला २७७ जागा आहेत. ओबीसींच्या २७% आरक्षणानूसारच्या जागांपैकी २५% जागा खुल्या वर्गाकडे वळविल्याने खुल्या वर्गासाठी तब्बल २८११ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ओबीसींच्या वाट्याच्या २४५७ जागा खुल्या वर्गाला देण्यात आल्या आहेत मग बहुजनांच्या वाट्याला काय?
        गेल्या काही वर्षांपूर्वी ओबीसी वर्गाच्या शिष्यवृत्त्या बंद केल्यानंतर ओबीसी वर्गाने कुठेतरी आवाज उठवला खरा पण तो आवाज कसा बंद झाला कोणास ठाऊक? त्यानंतरही ओबीसी विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा अन्याय झाला आणि ओबीसी वर्गाने तो निमूटपणे सहन केला . अन्याय करणारे अन्याय करतच राहिले आणि सहन करणारे निमूटपणे सहण करत राहिले. मग अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार ठरतो मुर्ख. ठरतो. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर ओबीसींच्या म्हणजेच बहुजनांच्या वाट्याला जर अन्याय आणि अन्यायच येत असेल तर मग ओबीसी मंत्रालय ओबीसींच्या काय कामाचे? ओबीसी नेते झोपा काढत आहेत आणि सरकार मात्र हिटलरशाहीत वागत आहे त्यासाठी ओबीसी वर्गाने वेळीच जागे व्हायला हवे... बहुजन समाजातील युवक वर्ग शिकला सवरला असून योग्य काय आणि अयोग्य काय याची चाचपणी करून लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन राज्यव्यापी आंदोलन उभा करायला हवे आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायला हवा नाहीतर येणाऱ्या काळात बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना हातात वाडगा घेऊन भिक मागायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही याचा गांभीर्याने विचार बहुजन समाजाने करायला हवा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
        ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com


Sunday, 10 June 2018

धनगर समाजातील आजची नेतृत्वाची शोकांतिका : नितीनराजे अनुसे

        एकेकाळी राजा समाज म्हणून जन्माला आलेली आमची जमात म्हणजेच धनगर ही आदिम जमात आज कोणतं जगण जगत आहे यावरती चिंतन केले तर आमचीच आम्हाला लाज वाटावी? कोणाच्या उपकारातून अथवा परंपरागत नव्हे तर स्वकर्तृत्वावर, स्वबळावर तलवार गाजवून आणि रक्त सांडून मिळवलेली राजेशाही मग ती आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेले मौर्य साम्राज्य (Mourya Density) अथवा मराठी साम्राजाचे आधारस्तंभ तथा थोरले सुभेदार श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेली होळकरशाही (Holkar Density) तसेच शुन्यातून विश्व निर्माण करणारे, स्वबळावर पुनः राज्य स्थापून इंग्रज अधिकाऱ्यांचा थरकाप उडवून त्यांच्याच शिस्तबद्ध फौजेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची राजेशाही ती काय भिक मागून मिळवली नव्हती तर स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर रक्त सांडून उभा केलेली राजेशाही तथा राजवैभव आजचा धनगर समाज मात्र विसरूनच गेला आहे. ज्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युरोपातली राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली त्याच अहिल्याईंचा महाराष्ट्र, त्याच अहिल्याईंचा भारत देश आज अधोगतीच्या मार्गावर आहे त्याचे कारण असे की आम्ही राष्ट्रमाता अहिल्याईंना विचारांची नव्हे मंदिरातील देवी (मुर्ती) बनवून टाकले, आम्ही अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतले आणि जयंती निमित्त डीजे लावून धांगडधिंगा घालून आपल्याच इतिहासाचे हसू करून घेतले म्हणून आज धनगर समाजाची ही अवस्था झाली आहे.
      Ahilyabai Holkar was the greatest Administrator of the 18th Century म्हणजेच अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक उत्तम राज्यकर्ती म्हणून जगाने माझ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा गौरव केला. पण आज एकविसाव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या विचारातून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात एकही लायक नेतृत्व तयार झाले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर तसे नेतृत्व तयार झाले असते तर ज्या मायमाऊलीने खचलेल्या पिचलेल्या जनतेला, गोरगरीब प्रजेला न्याय मिळावा म्हणून अखंड भारतभर सर्वप्रथम न्यायालये उभा केली त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत ३१ मे २०१८ रोजी समाजासाठी न्याय मागणाऱ्या समाजबांधवांवरती निष्ठूर लाठीमार झालाच नसता. एकीकडे अहिल्याईंच्या माहेरकडील वारसदार म्हणून मिरवणारे धनगर समाजाचेच मंत्री समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नसतील आणि उलट समाजबांधवांनाच अडचणीत टाकत असतील तर समाजाने न्याय नक्की मागायचा तरी कोणाला? जर आपल्याच समाजाचे मंत्री आपला राजेशाही इतिहास डोळ्यासमोर ठेऊन समाजाला न्याय देऊ शकत नसतील, समाजाचे प्रश्न सोडवू शकत नसतील म्हणजेच आपल्या इतिहासाला साजेसे नेतृत्व करू शकत नसतील तर समाजाचे ते नेतृत्व समाजासाठी लायक नाही असे म्हणायला वावगे ठरणार नाही. काही समाजबांधवांच्या मते ज्या ठिकाणी गोंधळ झाला तो दिवस आणि ते ठिकाण चुकीचे होते मग समाजबांधवांनी न्याय कुठे आणि कोणाकडे मागायचा होता? ज्या मायमाऊलीने जात धर्म न पाहता सर्वांना समान न्याय दिला त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत न्याय मागितला तर काय गुन्हा? मग धनगरांच्या शंभर काय पुढच्या पिढ्या बरबाद झाल्या तरी बेहत्तर पण आश्वासन द्यायचे कधीच थांबणार नाही आणि अंमलबजावणी कधी करणार नाही अशी भुमिका आजपर्यंत मराठावादी आणि ब्राह्मणवादी राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी तशीच कायम ठेवली आणि त्यात उड्या मारून धनगर समाजाच्या मतदानावर समाजाचे बाजारीकरण आणि भांडवलीकरण करायचे काम धनगर नेत्यांनी चोखपणे केले असे म्हणायला काही वावगे ठरणार नाही.
          स्वताचा स्वाभिमान दुसऱ्याच्या बुटाखाली गहाण ठेवून समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न न सोडवता समाजाला प्रस्थापितांच्या म्हणजेच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेते खासदार आमदार मंत्री करत असतील तर कित्येक पिढ्या बरबाद झाल्या तरी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी जबाबदारी घेऊन समाजातून एक नव्हे तर अनेक नवनवीन नेतृत्व घडवून त्यांना राजप्रवाहात आणायला हवे. परंतु जे नेतृत्व आपण घडवतोय त्याला आई-वडिलांच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जान आणि समाजावरती होणाऱ्या अन्यायाचे भान असायला हवे तर आणि तरच ते नेतृत्व समाजासाठी लायक ठरेल आणि धनगर समाजातील आजच्या नेतृत्वाची शोकांतिका दूर होईल.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
        ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
Email :- nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 21 May 2018

...तर मग तिसऱ्या आघाडीचा पर्याय योग्यच - ✍️नितीनराजे अनुसे

पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यास उपस्थित जनसमुदाय

     गेल्या ७० वर्षांपासून कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी मिळून धनगर समाजेत्तर इतर बहुजन समाजाचा वापर करून त्यांना सत्तेपासून राजकारणापासून उपेक्षितच ठेवले आहे त्यातच पंढरपूर-बारामतीच्या आरक्षण दींडी मुळे बारामती मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची जी आक्रमता व्यक्त केली त्याची सहानुभूती दाखवून भाजप सरकारने धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून सत्ता हस्तगत केली मात्र धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून आघाडी सरकार प्रमाणेच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या....
     माझा भोळा धनगर समाज हा धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडला, गेल्या ७० वर्षांपासून प्रस्तापित मस्तवाल नेत्यांच्या अन्यायाखाली पिचत पडलेला समाज हा कवडस्यातून पडलेल्या आशेच्या किरणाप्रमाणे समाजाचा कुठेतरी विकास होईल म्हणून देवेंद्र फसणवीस यांच्या गुळमुळीत भाषणाला भुलून आगीतून उठला खरा पण पुन्हा फुफाट्यातच पडला. आघाडी सरकार प्रमाणेच केंद्र सरकारला धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची साधी शिफारस न पाठवणारे हे भाजप-शिवसेना सरकार देखील नपुंसक ठरले. मग धनगर समाजाने बघायचे कोणाकडे? त्यात धनगर समाजाचे नेते देखील त्याच लायकीचे एखादे आमदारकीचे, खासदारकीचे, मंत्रीपदाचे हाडूक चाटायला भेटले तर विधानसभेत, राज्यसभेत आरक्षण प्रश्नावर साधा ब्र देखील काढायचा नाही आणि निवडणुकीत मात्र ह्यांना धनगर समाज हवा असतो तो फक्त मतदानापुरताच... पाठीमागे काहीजण विचारत होते की धनगर समाजाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार नको, भाजप-शिवसेना युती नको तर पर्याय तरी कळवा...  तर मग हा घ्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप आणि धनगर समाज मिळून सत्ता हस्तगत करा... काहीजण म्हंटले डॉ बाळासाहेब आंबेडकर नको. तर का नको? तुम्हाला धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते चालतात ज्यांनी धनगर आणि धनगड चा घोळ घालून केंद्र सरकारला उलट-सुलट रिपोर्ट पाठवले... तुम्हाला ते नेते चालतात जिथे गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडून अहवाल मागविले जातात आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवायचे षडयंत्र रचतात मग भारिप का नको? चाखू द्या ना त्यांना सत्तेची फळं... बाकीच्यांनी सत्तेची फळं चाखली तर ती तुम्हाला चालतात मात्र इथेच का तुमच्या जातीयवादाचे घोडे पेंड खात बसले आहे. ज्यांनी मानवतेला लाजवणारी मनुस्मृती जाळून देशाचे संविधान लिहिले आणि माणसासारखे जगायला शिकवले त्यांच्या वारसदारांनी फळे चाखली तर मनुवाद्यांच्या आणि त्यांची विचारसरणी जोपासणाऱ्यांच्या पोटात माथेसुळ उठणारच यात काही शंकाच नाही.
         आघाडी सरकार आणि युती सरकार यांना त्रासलेल्या धनगर समाजाचा असंतोष शिगेला पोहोचण्याचे कारण म्हणजे आजपर्यंत धनगर समाजाची झालेली फसवणूक त्यामुळे तिसरी आघाडी धनगर समाजाला सत्तेत घ्यायला तयार आहे पण धनगर समाजातील किती नेतृत्व यासाठी पणाला लागणार आहे याचा देखील करणे गरजेचं आहे. आजपर्यंत धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी आणि बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांनी धनगर समाजातून लोकसंख्येच्या तुलनेने पाहिजे असे सक्षम नेतृत्वच घडवले नाही उलट एखादे तयार होत असेल तर माझ्यापेक्षा तो मोठा होईल या भितीने हातातोंडाशी आलेले नेतृत्व बाद करण्याचेच राजकारण केले त्यामुळे धनगर समाजाचा विधानसभेतील आणि लोकसभेतील टक्का वाढलाच नाही. एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या आणि एकमेकांच्या उरावर बसण्याच्या स्पर्धेत धनगर नेत्यांनी धनगर समाजाचे फार मोठे वाटोळे केले आहे.
      काल पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यात प्रचंड संख्येने धनगर समाजेत्तर बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तेव्हा आंबेडकर म्हणाले की धनगर समाजाने आता सावज न होता शिकारी बनायला हवं. मग आता धनगर समाजातील संघटनांनी धनगर समाजातील नेत्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायला हवे की जर धनगर समाजाला शिकारी व्हायचेच असेल कोण-कोणत्या आणि किती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातून तुम्ही शिकार करणार? कोण आणि कशी करणार? कारण निवडणूका तर जवळ आल्यात... आणि एवढ्या अल्पावधीतच समाजातून किती नेतृत्व घडणार या प्रश्नांनी डोक्यात नुसता धुमाकूळ घातलाय.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 14 May 2018

सामाजिक संघटनांनी आत्मपरिक्षण करावे : नितीनराजे अनुसे

        समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संघटनांची उभारणी करण्यात येते स्थापना करण्यात येते परंतु संघटनेचे मुळ उद्धिष्ट बाजूला राहून समाजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी नुसती बैनरबाजी आणि स्वतःची प्रसिद्धी करण्यात व्यस्त असलेल्या मंडळींना/संघटनांना समाजाकडे वळून पाहायला आज फुरसत देखील नाही. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजातून नवनवीन नेतृत्व घडायला हवे होते पण तसे झाले नाही. स्वताच नेते बनून एखादी विधानपरिषद मिळतेय का .. यावरती डोळा ठेवून असलेले संघटनांचे नेते समाजाचा काय खाक विकास करणार का? काल परवा कोणीतरी म्हंटले आमचा इतिहास आमूक आहे आमचा इतिहास तमूक आहे म्हणून आमच्याकडे नेतृत्व द्या... अरे नेतृत्व हे काय मागून घ्यायची गोष्ट आहे का? राजसत्ता आणि राजपथ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. आज तुम्ही ज्या संघटना उभा केल्या आहेत त्यातून नेतृत्व घडवा आणि त्या त्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रश्न सोडवा , मेंढपाळांचे प्रश्न सोडवा, मेंढपाळांच्या पोरांचे, शिक्षणाचे, नोकरीचे तसेच पारंपरिक व्यवसायाचे प्रश्न सोडवा तर आणि तरच समाज तुमचे नेतृत्व मान्य करेल आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार झालेले नेतृत्व विधानसभेत आणि लोकसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जातील तेव्हाच धनगर समाजाचा टक्का लोकसभेत आणि विधानसभेत वाढेल.
         समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या एकत्रिकरणासाठी जर सामाजिक संघटना कार्यरत नसतील अथवा एकत्रित येत नसतील समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वरती दबाव आणू शकत नसतील तर त्या संघटना काय जाळायला काढल्यात का? हा प्रश्न मला एकट्याला पडत नाही तर प्रत्येक धनगर समाजबांधवांना पडतोय म्हणून सामाजिक संघटनांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून समाजहितासाठी कार्यरत रहावे. धनगर समाजाचे नेतृत्व जर मजबूत आणि लायक असेल तर धनगर समाजाला कोणाकडे भिक मागायची गरज पडणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Friday, 27 April 2018

धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का? ✒नितीनराजे अनुसे



धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का?
खरंतर हा एक चिंतेचा विषय बनून गेला आहे. कालपरवा मी मुद्दामहून दोन पोस्ट टाकल्या होत्या त्यातील पहिली म्हणजे "धनगर नेत्यांनो तुम्ही आमच्यामुळे मोठे झाला आणि गाजला पण धनगर समाजाचे प्रश्न न सोडवताच तुम्ही एवढे कसे काय माजला?" आणि कालची दुसरी पोस्ट म्हणजे "तर धनगर समाज आक्रमक होणारच " या आशयाचा लेख लिहून समाजातील समाजबांधवांच्या आणि सामाजिक संघटनांच्या भावना जाणून घेतल्या. तो लेख लिहण्यापाठीमागे कोणाचे समर्थन करणे, कोणाला शिव्या देणे हा उद्देश्य नव्हता तर धनगर समाजातील सामाजिक संघटनांचे धनगर नेत्यांबद्दल नक्की काय विचार आहेत? धनगर नेत्यांबद्दल त्यांचा किती रोष आहे?  या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले त्यातून ज्यांनी ज्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक विचार करून त्यावर मत मांडले त्याबद्दल त्यांचे खरंतर आभार.
     आता धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का?  हा प्रश्न मला एकट्यालाच नव्हे तर तळागळातील सर्व समाजबांधवांना आणि युवा वर्गाला पडलेला दिसतोय. आंबेडकरांची तिसरी आघाडी ही धनगर समाजाला कशावरून आरक्षण देऊ शकते हे आंबेडकरांनाच विचारायला हवं पण तत्पूर्वी त्या मंत्रिमंडळात धनगर समाजाच्या वाट्याला लोकसंख्येच्या तुलनेत किती विधानसभेच्या किती जागा मिळतील? धनगर समाजाचे किती मंत्री आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात असतील? या बद्दल शहानिशा करणे उचित वाटते. तसे पाहायला गेले तर सध्य परिस्थितिला आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघ सोडला तर अन्य कोणत्याही धनगर नेत्यांसाठी सुरक्षित असा मतदारसंघ दिसत नाही. करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील व आमदार अनिल (आण्णा)  गोटे यांचा देखिल मतदारसंघ पूर्णतः नव्हे तर काहीअंशी सुरक्षित आहे. पदुम मंत्री ना.महादेवजी जानकर साहेब, जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे साहेब, माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, मा. गोपीचंद पडळकर साहेब, आमदार दत्ता (मामा) भरणे, आमदार रामहरी रूपनर (आप्पा), आमदार रामराव वडकुते साहेब,  माजी आमदार भदे साहेब, प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर या बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांना तरी सुरक्षित असा लोकसभा/विधानसभा मतदारसंघ कुठेच सुरक्षित दिसत नाही. मग तिसरी आघाडी एका वर्षात असे कोणते नेतृत्व तयार करणार आहे हे राम जाने... आणि तसेही रिडालोस (रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी) धनगर समाजाचे किती आमदार निवडून आणू शकले? एकही नाही कारण धनगर समाजातील नेत्यांसाठी एकही मतदारसंघ सुरक्षित नाही असे असताना आजपर्यंत कोणत्याही सामाजिक संघटनांनी नविन नेतृत्व बळकट करण्याचे अथवा तयार करण्याचे प्रयत्न केले नाहीत उलट धनगर समाजाचे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याशिवाय दुसरे उद्योग त्यांना जमलेच नाही. मग तिसरी आघाडी म्हणुन मिरवल्या जाणार्या आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात नक्की कोणतं नेतृत्व पुढे येणार हे कोणास ठाऊक?
         आजकाल तास अर्ध्या तासात अनेक स्वयंघोषित व बालिश नेतृत्व तयार होतात पण ज्याप्रमाणे लाल मातीत अंग घोसळलेल्या, मल्लविद्यामध्ये पारंगत असलेल्या पैलवानाला जसा पट्टीचा खेळाडू, कुस्तिपट्टू बनायला जसा काळ लागतो तसाच पट्टीचा राजकीय नेता बनायला देखिल काळ वेळ लागतो. त्यासाठी राजकीय डावपेच खेळायला जमलं पाहिजे तर आणि तरच विधानसभेत आणि लोकसभेत धनगर आमदार खासदारांचा टक्का वाढेल यासाठी सामाजिक संघटनांची भूमिका नेतृत्व घडविण्यासाठी उपयोगात यायला हवी होती पण तसे न करता सामाजिक संघटनांनी आणि संघटनांच्या पदाधिकारी यांनी धनगर नेत्यांचेच पाय ओढण्यासाठी उर्जा व्यर्थ खर्च केली म्हणून धनगर समाजाचे नेतृत्व ना घडले ना बळकट झाले.
      एखादा प्रस्थापित नेता स्टेजवर येऊन आपल्या धनगर समाजाच्या नेत्यांना शिव्या घालत असतो तेव्हा धनगर समाजातील खाली बसलेली मंडळी तसेच युवा वर्ग हा टाळ्या वाजवत बसतो हे चित्र जरा विचित्रच दिसतं. खरंतर तेव्हा लाज वाटते धनगर म्हणवून घ्यायची... पण जेव्हा तीच टाळ्या वाजवणारी तरणीबांड पोरं जेव्हा हातात चप्पल घेऊन त्या शिव्या देणार्या प्रस्थापित मस्तावलेल्या नेत्यांच्या दिशेने भिरकवतील तेव्हाच खर्या अर्थाने धनगर समाज राजकीय क्षेत्रात मुसंडी मारेल व नवनविन नेतृत्व तयार होऊन लोकसभेतील आणि विधानसभेतील सदस्यांचा टक्का वाढेल. पुढे कोणाच्या बापाची देखिल हिम्मत होणार नाही धनगर नेत्यांना शिव्या घालायची.... ज्या उद्देशाने पावलापावलावर संघटनांच्या स्थापना झाल्या तो उद्देश्य धुळीस मिळवून नेतृत्व घडविण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी अपयशी ठरलेल्या संघटना मात्र नेत्यांना शिव्या घालत आपल्याच धनगर नेत्यांच्या विरोधात दंड थोपटून उभा आहेत. आणि नेते देखिल समाजाकडे पाठ फिरवताहेत अशाने धनगर नेेतृत्वांचे नामोनिशान मिटून जाईन. ही खेकडा प्रवृति जो पर्यंत समाजातून हद्दपार होत नाही आणि धनगर नेतृत्व ना वाढणार ना बळकट होणार. त्यासाठी धनगर समाजातील युवक-युवतींनी विचार करून त्यावर आत्मचिंतन करायला हवं आणि धनगर नेतृत्व मात्र अबाधित राखायला हवं.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंराजे
✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
📞+918530004123
📨 nitinrajeanuse123@gmail.com