Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Wednesday, 17 October 2018

आरेवाडीच्या दसरा मेळाव्यातून बिरूबाला साकडं ✍️नितीनराजे अनुसे

आरेवाडीच्या बिरोबा बनात दसरा मेळाव्यासाठी एकवटलेला धनगर समुदाय
आरेवाडीच्या दसरा मेळाव्यातून बिरूबाला साकडं ✍️नितीनराजे अनुसे
      काल दि १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धनगर समाजाचा दसरा मेळावा साजरा झाला. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून अखंड धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी पुकारलेल्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याला आणखीनच बळ मिळाले. गेल्या ७० वर्षांपासून प्रस्थापितांच्या अन्यायाखाली खचलेल्या पिचलेल्या, अन्यायाच्या भयानक उन्हात होरपळलेल्या धनगर समाजाला आजही न्याय हक्कापासून वंचित ठेवायचे पाप इथली प्रस्थापित व्यवस्था करत आहे. ज्या धनगर समाजाच्या जीवावर प्रस्थापित नेते मोठे झाले, सत्ता उपभोगली, त्यांना सत्तेची चरबी चढली ती चरबी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उतरवली आणि भाजप ला सत्तेत बसवले परंतु पाठीमागच्या आघाडी सरकारप्रमाणेच हे भटजातीचे सरकार नपुंसक निघाले. ज्या धनगर समाजाने त्यांना सत्तेत बसवले त्यांच्यावरच उलथले. सत्तेत आल्यावर १५ दिवसांत, पहिल्या कैबिनेट मध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवू म्हणणारे फसणवीस सरकार वेळकाढूपणा करत आरक्षणाचा अभ्यास करू लागले आणि अभ्यास करता करता टिस चे भूत मानगुटीवर आणून बसवले. राज्यात धनगड नावाची जमात आस्तित्वात नसताना, राज्यघटनेत दिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील धनगड जमातीची एखादी व्यक्ती औषधाला देखील शोधून सापडत नाही मग असे असताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या खाजगी संस्था धनगर आणि धनगड वेगळे असल्याचे (कोणाचे ऐकुन) कसे काय सांगते कोणास ठाऊक? हा कोणता जावई शोध म्हणायचा?
       मग धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर हे नक्की काय म्हणताहेत? तर ज्या धनगड या शब्दामुळे महाराष्ट्र राज्यात धनगर आणि धनगड चा घोळ घालून दीड ते दोन कोटी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवले गेले आहे त्या धनगड जमातीच्या लोकांचा ठावठिकाणा द्या नाहीतर धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. जर धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तर शैक्षणिक क्षेत्रात, शासकीय नोकरीत तर मेंढपाळांच्या पोरांना फायदा होईलच परंतु राजकीय क्षेत्रांत जर धनगर जमातीचे लोकसंख्येच्या आधारावर म्हणजेच जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या गणिताने धनगर जमातीची कमीत कमी ३५-४० पोरं विधासभेत जातील शिवाय जास्त नाही तर किमान १० तरी खासदार महाराष्ट्र राज्यातून संसदेत जातील यासाठी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती हव्या आहेत. परंतु धनगरांची पोरं जर राजकाणात आली, प्रशासनात आली तर प्रस्थापितांना रस्त्यावर भिक मागत बसायची वेळ येईल म्हणून धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या जात नाहीत.
       त्यासाठी धनगर समाजाने आपल्याच नेत्यांना सर्व गुणदोषांसह स्विकारले पाहिजे. जर कोणी चुकत असेल तर त्याला चुकतोय म्हणून सांगितले पाहिजे. जो चांगले काहीतरी करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि धनगर नेत्यांनाही समाजाच्या उपकाराची जाणीव पाहिजे तर आणि तरच धनगर समाजातील आमदार खासदारांचा टक्का वाढेल. काहीजण म्हणतात की नुसत्या सभा घेऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तर बरोबर आहे की नुसत्या घेऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही परंतु सभा घेऊन त्या त्या विधानसभा/लोकसभा मतदारसंघातून एखादे नेतृत्व पुढे करायला पाहिजे जे नेतृत्व समाजासाठी लायक असेल. काल आरेवाडीत बिरोबाच्या बनात लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते त्या सर्वांनी मिळून बिरोबासमोर साकडं घातलं आहे की या इढा पिढा टळू दे आणि धनगर जमतीला न्याय व हक्क मिळू दे. गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी जो धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा उभा केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे परंतु या लढ्याच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्रतिनिधित्व तयार करायला हवे तर आणि तरच आरक्षणाच्या अखेरच्या लढ्यातून धनगर समाजाची तरूण पोरं विधासभेत आणि संसदेत अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतील आणि धनगरांच्या न्याय व हक्कासाठी भांडतील...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
   📧nitinrajeanuse123@gmail.com


Monday, 15 October 2018

आरेवाडीचा दसरा मेळावा आणि सामाजिक सलोखा ✍️नितीनराजे अनुसे

आरेवाडीचा दसरा मेळावा आणि सामाजिक सलोखा 
                                  ✍️नितीनराजे अनुसे
          अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात महाराष्ट्र,  कर्नाटक, गोवा तसेच आंध्रप्रदेश या राज्यातून लाखो समाजबांधव बिरोबाच्या बनात एकत्रित येऊन मेंढपाळांच्या राजाची मनोभावे सेवा करत असतात. दरवर्षी हे मेंढपाळ बांधव एकत्रित येतात आणि यात्रा झाली की आपापल्या घराकडे, जिथे मुक्काम असेल तिकडे आपापल्या वाड्यावर निघून जात असतात. असेच हे दरवर्षी चालत राहिले तर समाजाचे वैचारिक प्रबोधन कधी होणार? असा विचार नकळतपणे आल्याने जर आपण आरेवाडी येथे दरवर्षी जर दसरा आयोजित केला तर विखुरलेल्या धनगर समाजाचे वैचारिक प्रबोधन करू शकतो अशी संकल्पना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा. गोपीचंद पडळकर साहेब यांना सुचली आणि २०१६ पासून दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे २०१७ ला देखील दसरा मेळावा पार उत्साहात पार पडला धनगर समाजाचे सर्व नेते त्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. खरंतर हा दसरा मेळावा म्हणजे धनगर समाजाचे वैचारिक प्रबोधन तथा मंथन असल्याने तेथे एक कार्यकर्ता या नात्याने सर्व समाजबांधवांनी दसरा मेळाव्याला यावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी २०१७ मध्ये केले होते आणि सर्वांना निमंत्रण देखील दिले होते.  ३१ ऑगस्ट २०१८ रोजी देखील त्यांनी औरंगाबाद येथील "आरक्षणाचा अखेरचा लढा" या जाहीर सभेतून दसरा मेळावा आयोजित करत असल्याचे सांगत त्या दसरा मेळाव्याला सभामंचावर कोणत्याही नेत्यांसाठी अथवा पाहुण्यांसाठी खुर्ची ठेवली जाणार नाही तर समाजातील जो कोणी जेष्ठ तथा बुजुर्ग समाजबांधव उपस्थित असेल तो सदरच्या दसरा मेळाव्याचा अध्यक्ष असेल असेही जाहीर केले होते जसे औरंगाबाद येथील सभामंचावर उपस्थितांपैकीच एका बुजुर्ग व्यक्तीला बसवले होते कारण निमंत्रण देऊनही काही कारणास्तव आदरणीय आमदार गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख उपस्थित राहू शकले नव्हते. त्याचप्रमाणे आरेवाडीचा दसरा मेळावा त्याच प्रमाणे साजरा करायचा परंतु त्यामध्ये धनगर समाजाच्या हितासाठी जो ज्वलंत प्रश्न सध्या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या भावनेचा विषय बनला आहे त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे या विचाराचे सर्वजण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत यात शंकाच नाही. परंतु ज्या तरूणाने पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरातमध्ये लढा पुकारला होता त्या मोर्चाचे नेतृत्व हार्दिक पटेल नावाचा एक तरुण पोरगा करत होता त्या हार्दिक पटेल ला जर धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात बोलावलं म्हणजे याचा तसा अर्थ होत नाही की धनगर समाजाचे नेतृत्व हार्दिक पटेल करेल... धनगर समाजाचे नेतृत्व हे धनगर समाजातीलच पोरं करू शकतात. दुसरा तिसरा चौथा कोणी धनगर समाजाचे प्रश्न सोडवू शकत नाही कारण शेळ्या-मेंढ्यांची अर्थातच मुक्या जणावरांची तहान-भूक हा धनगरच जाणू शकतो. हार्दिक पटेल मुळे महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमांचे लक्ष आरेवाडीच्या दसरा मेळाव्याकडे केंद्रीत करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांनी केला असावा. त्यामुळे आरेवाडीच्या दसरा मेळाव्याचे प्रक्षेपण, बातम्या अखंड देशभरातील टीव्ही चैनलवरती दिसतील त्यामुळे केंद्र अशी अपेक्षा त्यांना होती.
         मग माशी कुठे शिंकली कोणास ठाऊक? दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परंतु त्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने दसरा मेळावा साजरा व्हायला हवा होता पण तसे झाले नाही. एकाच समाजाचे, एकाच दिवशी दोन दोन दसरा मेळावे होणे म्हणजेच सरळसरळ धनगरांच्याच अधोगतीचे लक्षण असल्याचे दिसून येते. यामागची कारणं शोधायला गेले तर सर्वप्रथम अहंकार हेच दोन्ही दसरा मेळाव्याचे सर्वात मोठे कारण आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना निमंत्रण न देता हार्दिक पटेल यालाच का निमंत्रण दिले? धनगर नेते महाराष्ट्रात नाहीत का? असा सूर सहजपणे मला ऐकायला मिळाला. यात गोपीचंद पडळकर यांचीच चुकी असल्याचे माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांच्या समर्थकांनी मला सांगितले. तेव्हा मलाही वाटणे स्वाभाविकच होते की एक आयोजक नव्हे तर कार्यकर्ता या नात्याने गोपीचंद पडळकर साहेब यांनी सर्व धनगर नेत्यांना निमंत्रण द्यायला हवे होते. ती त्यांची चूक आहे परंतु औरंगाबाद येथील अखेरच्या आरक्षण लढ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आबासाहेबांना बोलावले होते परंतु ते आले नाहीत त्यामुळे कदाचित गोपीचंद पडळकर यांनी सर्व नेत्यांना वैयक्तिक निमंत्रण न देता अखंड धनगर समाजाला दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन केले असावे (त्यात नेते आलेच). दुसरीकडे धनगर समाजातील तर माजी मंत्री शिवाजी(बापू)शेंडगे यांचे सुपूत्र असलेल्या माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांना राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांनी उठवून बसवले असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर साहेबांच्या समर्थकांमधून होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपूर्वी पासून त्यांना दसरा मेळावा आयोजित करता आला नाही का? २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावरच दुसरा मेळावा आयोजित करण्याचे सुचलेच कसे? असेही आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.
       खरंतर दोघांवरही झालेले भयानक आरोप हे समाजाला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाणारे आहेत आणि सदरचा एकमेकांवर चिखलफेक करण्याचा जो प्रकार झाला त्यामुळे धनगर समाज इतरांपेक्षा अजूनही १०० वर्ष पाठीमागे असल्याचे समजायला फार वेळ लागत नाही. खरंतर एकमेकांवरती केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी माझा लेखप्रपंच नाही कारण दसरा मेळावा एकच व्हायला हवा या विचाराचा मी होतो आणि आजही आहे. परंतु कोणीतरी एक पाऊल मागे घेतले असते अथवा कोणीतरी दाखल्या बापाचे झाले असते आणि एकच मेळावा घेण्यासाठी प्रयत्न केले असते तर भविष्यात सर्वच धनगर नेत्यांना (एक-दोघांनाच नव्हे) मानसन्मान मिळाला असता. धनगर एकीचे बहुजन समाजातून कौतुक झाले असते. अथवा आमुक आमक्या नेत्याने मोठ्या मनानं समाज एकीकरणासाठी एक पाऊल माघारी घेतले म्हणून समाजातून त्याची वाहवा झाली असती पण माघारी घेणार कोण? तिथे प्रतिष्ठेचा विषय होता, अहंकाराचा प्रश्न होता. परंतु त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची अथवा ऐकून घेण्याची सहनशीलता नसल्याने कोणीही माघारी घेतली नाही. त्याचा परिणाम येत्या निवडणूकीत दिसून येईलच आणि फटका एकदोघाला नाही तर अखंड धनगर समाजाला बसणार आहे.
       असो धनगरी जत्रा कारभारी सतरा ही म्हण सार्थ करून दाखवण्यासाठी जी चढाओढ लागली होती ती काय संपुष्टात येणार नाही असे दिसत आहे तरीही शक्य झाल्यास अजूनही प्रयत्न होऊ शकतात कारण एका रात्रीत विरोधकांची मतं फोडली जातात, ग्रामपंचायत सदस्य फोडले जातात एवढेच काय तर आमदार खासदार पण फोडले जातात मग धनगर समाजाच्या हिताचा निर्णय व्हावा असे जर खरोखरच वाटत असेल तर एकाच रक्ताची अन् हाडामांसाची आपण माणसं आहोत मग समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकमेकांच्या हातात देऊन एकच दसरा मेळावा व्हायला हवा यासाठी का प्रयत्न करू नयेत? आजकाल सोशल मिडिया हे एक असे माध्यम आहे की एकच दसरा मेळावा म्हंटलं तर दहा मिनिटांत अख्ख्या महाराष्ट्राला हा एकीचा संदेश जाऊ शकतो आणि पेटलेले राजकारण संपुष्टात येऊ शकते हे मात्र नक्की...
असो तरीही सर्व धनगर समाजबांधवांनी आपल्या सर्वांचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात येऊन विचाराचं, प्रबोधनाचं सोनं लुटून धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी हातभार लावावा व कोणावरही टीकाटिप्पणी न करता सामाजिक सलोखा राखावा ही नम्र विनंती...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
   📧nitinrajeanuse123@gmail.com

Saturday, 13 October 2018

शेवटी टीस चे भूत धनगरांच्याच मानगुटीवर, क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न अधुरे : ✍️नितीनराजे अनुसे

शेवटी टीस चे भूत धनगरांच्याच मानगुटीवर
क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न अधुरे
                 ✍️नितीनराजे अनुसे


          जंगल वनात, डोंगर-दऱ्या-खोऱ्यात, माळरानावर भटकंती करणारी धनगर जमात ही आदिम जमात आहे. आदिवासींपेक्षाही बिकट परिस्थीतीचे जगणे ही धनगर जमात जगत आहे. एकवेळ आदिवासी हे स्थायिक स्वरूपाचे जगणे जगताहेत परंतु धनगर ही जमात आज इथे तर उद्या तिथे, जिथे शेळ्या-मेंढ्यांना मुबलक प्रमाणात चारा-पाणी मिळेल तिकडे लेकराबाळाचं आणि करडा-कोकरांचं लटांबणं घेऊन, घोड्याच्या पाठीवर अर्ध्या आयुष्याचा संसार लादून, रात्र होईल तिथे मुक्काम करायचा, तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून पोटाची खळगी भरायची, रोजच्या रात्रीच्या रात्री विंचू-काट्यांच्या गराड्यात तर हिंस्र पशूंच्या सान्निध्यात घालवायच्या ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे. तरीही पोटच्या पोरांसारख्या असलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे संरक्षण करून रोजचा दिवस सारखा जगत आणि प्रत्येक दिवस पुढे ढकलत संघर्षात्मक जगणं जगायचं असे जीवन जगणारी धनगरांव्यतिरीक्त दुसरी तिसरी चौथी अशी कोणतीही जात अथवा जमात शोधूनही सापडणार नाही.
        मुळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रीच्या रात्री धनगरवाड्यावर घालवून, धनगरांच्या सान्निध्यात राहून भौगोलिक स्थितींचा अभ्यास करत जीवनमान, राहणीमान, चालीरीती, संस्कृती, लाजरे-बुजरेपणा जे काही अनुभवले त्या आधारे बाबासाहेबांनी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये सामाविष्ट केले होते. परंतु धनगर या शब्दाचा  शब्दच्छल झाल्याने र चा ड झाला आणि धनगर जमातीवर गेल्या ७० वर्षांपासून एवढा प्रचंड अन्याय झाला की तेवढा अन्याय महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर अखंड भारतदेशातील कोणत्याही जमातीवर झाला नाही. धनगर जमातीचे गेल्या ७० वर्षामध्ये जे काही नुकसान झाले आहे ते पुढच्या १०० वर्षात देखील भरून निघणार नाही. तसे पाहायला गेले तर भटकंती पाचवीलाच पुजलेली असल्याने धनगर जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यघटनेत झालेला सावळा गोंधळ लवकर लक्षात आला नाही. जेव्हा काही लोक शिकले सवरले तेव्हा हा राज्यघटनेतील सावळा गोंधळ काहीजणांच्या लक्षात आला मात्र झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी धनगर जमातीचे प्रतिनिधित्व करणारे म्हणावे असे नेतृत्वच नव्हते. सर्वप्रथम क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांनी याविरोधात आवाज उठवला मात्र शरद पवारांसारख्या प्रस्थापित नेत्यांनी धनगर समाजातील काही लोकांना सोबत घेऊन धनगर समाजाचे सक्षम  नेतृत्व होऊ पाहणाऱ्या क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांची राजकीय हत्याच केली. धनगर समाजातील नेत्यांनी खरंतर अनुसूचित जमातीच्या सवलती मिळवण्यासाठी क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांना साथ द्यायला हवी होती परंतु तसे झाले नाही आजच्यासारखेच तेव्हाही मंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्यांनी धनगर समाजाच्या शत्रूंना साथ दिली ज्यांनी धनगर समाजाची मूळ मागणी लाथाडून धनगरांच्या पाठीत खंजीर खूपसला, माजी पंतप्रधान राजीव गांधींना सांगलीत बोलावून धनगर आरक्षणाचा ढोल बडवायला दिला आणि पदरात काय पडले तर अनुसूचित जमातीच्या सवलतींची मागणी असताना नव्यानेच वेगळी सुची बनवून धनगर जमातीला भटक्या जमाती क मध्ये घातले. त्यातही अनेक जाचक अटी होत्या वर्षातील नऊ महिने घरदार सोडून भटकंती करणाऱ्यांनाच प्रमाणपत्र देण्याची अट होती. पुढे क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांनी वारंवार आदोलने, मोर्चे करून ती अट सहा महिन्यांवरून तीन महिन्यांवर तर कालांतराने ती अट रद्द करायला लावली. क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांचा लढा हा अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी होता, त्या लढ्याला जर सर्व धनगर समाजाने आणि धनगर समाजातील नेत्यांनी एकत्रित येऊन एकमुठीने साथ दिली असती तर आजच्या आणि उद्याच्या पिढीला भीक मागायची गरज पडली नसती.
          खरंतर धनगर जमात ही अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत आहे शिवाय महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची जमात देखील आस्तित्वात नाही अन्यथा धनगर जमातीच्या मागणी विरोधात एक तरी धनगड रस्त्यावर आला असता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता परंतु जी जमात आस्तित्वातच नव्हती त्या जमातीमधील कोणी कसे पुढे येणार? राहिला प्रश्न TISS च्या अहवालाचा... तर त्याचे असे आहे की एखाद्या जातीला/जमातीला नव्यानेच अनुसूचित जातीच्या/जमातीच्या यादीत सामाविष्ट करायचे असल्यास संबंधित राज्य सरकार हे संबंधित शासकीय अथवा खाजगी सामाजिक संस्थांकडून अहवाल मागवू शकते. परंतु धनगर ही जमात अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत असेल तर संबंधित राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त दोन ओळींचे शिफारस पत्र पाठवायचे आहे त्यासाठी पुढचे संदर्भ अभ्यासावे लागतील...
संसदीय वाद-विवाद राज्यसभा प्रतिवेदन दि २२ डिसेंबर  १९८९ हे भारत सरकार मार्फत प्रसिद्ध होणारे राज्यसभेचे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेलच की राज्यसभेमध्ये खा. सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन  राज्यसभेचे  सभापति महोदय  रामविलास पासवान  यांनी सुद्धा कबूल केले होते की "राज्यघटनेत महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये  अ. क्र. ३६ वरती नमूद केलेली जमात ही धांगर अथवा धनगड नसून ती धनगर अशी आहे. महाराष्ट्र राज्यातील संबंधित धनगर समाजाला राज्यघटनेनूसार अनुसूचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात त्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारला तसे शिफारस पत्र पाठवायला हवे." याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार दि १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार दि १९ मार्च २००१ त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व शासकीय राजपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये अ. क्र. ३६ वरती ओरॉन, धनगर असा स्पष्ट आणि शुद्ध उल्लेख आहे. परंतु आदिवासी विकास संस्था आणि आदिवासी मंत्रालय सांगते की  तो उल्लेख धनगड असा आहे आणि धनगड ही जमात आजही महाराष्ट्र राज्यात आहे. तर बुद्धि पाजळणारे पुण्यातील काही प्राध्यापक बरळतात की "धनगड जमात महाराष्ट्र राज्यात नसून नमूद केलेली जमात ही धनगर हीच आहे" असा धनगर समाजाचा दावा चुकीचा आहे. पुढे तेच दिडशहाणे स्पष्टीकरण देताना म्हणतात की 'पूर्वी महाराष्ट्र राज्यात धनगड ही जमात होती ती १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याचे विभाजन झाल्याने ती जमात मध्य प्रदेश मध्ये गेली त्यामुळे महाराष्ट्र राज्यात धनगड जमात सापडत नाही.'  मग त्या प्राध्यापकांना माझे सांगणे आहे की आदिवासी विकास संस्थेचा अहवाल तुम्ही वाचला आहे का नाही कोणास ठाऊक ज्यांच्या रेकॉर्डनूसार एका व्यक्तिपासून १० वर्षात ७० हजाराच्या वरती धनगड जमात तयार होते हे काय गौडबंगाल आहे?  अशी कोणती प्रजनन क्षमता असलेली विशेष जमात आहे.  बर १९६० साली जर धनगड जमात मध्यप्रदेशात गेली तर मग १९९६,  २००१, २००७-०८२००९-१० या शासकीय राजपत्रांमध्ये ओरॉन, धनगर हा उल्लेख कसा काय येतोय?   सरकार काय भांग पिऊन राज्यकारभार करतंय का? की त्या त्या विभागाचे सचिव दुधखुळे आहेत? जर खरंच धनगड ही जमात मध्य प्रदेशात गेली असेल अथवा नामशेष झाली असेल तर मग महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जो काही कोट्यवधींचा शैक्षणिक, सामाजिक विकास निधी येतोय त्यामध्ये धनगर/धनगड जमातीसाठी सुद्धा निधी येत असेल तर मग गेल्या ७० वर्षापासून त्या  धनगर/धनगड जमातीच्या निधीचे नक्की काय झाले?  कोणाच्या घशात तो निधी गेला?  गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत आदिवासी विकास मंत्रालय विभागातील सर्व आजी/माजी मंत्र्यांची आणि आयुक्तांची यादी काढून (जे हयात आहेत) त्यांना जाब विचारला तर सत्य बाहेर पडेल. आणि जर खरंच धनगड जमात महाराष्ट्र राज्यात असेल तर धनगर समाज आपली मागणी माघारी घेईल नसेल तर संबंधित आदिवासी विकास संस्था, आदिवासी विकास मंत्रालय आणि धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला धनगर समाजाच्या वतीने दाखल करण्यात येईल. कारण थोर समाजसुधारक अब्राहम लिंकन म्हणतात की "लोकांनी लोकांच्या हीतासाठी, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय."  मग लोकशाहीत एखाद्या जमातीवर वर्षानुवर्ष विनाकारण अन्याय अत्याचार होत असेल,  एखाद्या जमातीला ७० वर्ष न्याय मिळत नसेल तर त्या त्या राज्याचा प्रतिनिधी त्यासाठी जबाबदार ठरतो. म्हणुन आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा.
     आज गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी राज्यभर 'अखेरचा लढा आरक्षणाचा' हा राज्यव्यापी लढा पुकारला आहे त्यापाठीमागे त्यांचे राजकारण नक्कीच आहे आणि असायला हवे, सर्व धनगर नेत्यांनी मिळून स्वतः देखील मोठे व्हावे आणि समाजाला देखील न्याय मिळवून द्यावा. तसंही धुतल्या तांदळासारखा कोणताच धनगर नेता सोज्वळ आणि निस्वार्थी नाही. असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो परंतु आज समाजातील सर्व स्थरातून आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याचे स्वागत होत आहे मात्र आजच्या धनगर नेत्यांची भुमिका पाहून एकाच गोष्टीची भिती वाटते आणि राहून राहून एकच प्रश्न डोक्यात गोंधळ उडवून जातोय की धनगरांच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या, लढणाऱ्या तथा धडपडणाऱ्या पडळकरांचा आणि जानकरांचा पुन्हा बी के कोकरे तर होणार नाही ना?
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
   📧nitinrajeanuse123@gmail.com

Sunday, 7 October 2018

धनगर नेत्यांनो एक व्हा, तुमाला बिरूबाची आण हाय।। ✍️नितीनराजे अनुसे

शेळ्या-मेंढ्या राखतू आमी
ही आम्हा धनगरांची ओळख हाय
रातंदिस भटकतू आमी
पण पायाला आमच्या पाय नाय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय ।।
पोटाची खळगी बडवतू आमी
लेकरा-बाळाला साळत घालाय
आज हिथं तर उद्या तिथं
जगणंच आमचं असं हाय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय ।।
येगयेगळ्या चुली मांडून
संसार करणं तसं बरं नाय
काय बी झालं तरी
आपली अहिल्याई एकच माय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय।।
राजकारण करा समाजकारण करा
आमी तुमच्या सोबत हाय
पण मोठ्या मनानं कमीपणा घ्या
त्यातच समाजाचं भलं हाय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय।।
तुमाला बिरूबाची आण हाय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123


Tuesday, 11 September 2018

रामभाऊ लांडे म्हणजेच... ✍️नितीनराजे अनुसे

रामभाऊ लांडे म्हणजेच,
धनगर समाजाला मिळालेला "कोहिनुर हिरा"
        सामाजिक चळवळीमधील माझ्या दृष्टीक्षेपातील आजपर्यंतचं अनन्यसाधारण, मनमिळाऊ, अभ्यासू तसेच परखड व्यक्तिमत्त्व म्हंटलं तर नकळतपणे रामभाऊंचेच नाव येते. धनगर समाजाचे प्रबोधन आणि समाजजागृती यामध्ये त्यांनी खरंतर जीव ओतून दिला आहे. होळकरशाहीचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्र राज्यभर आज त्यांची ओळख आहे. जेष्ठ साहित्यीक आदरणीय होमेश भुजाडे सर तसेच थोर साहित्यिक संजय सोनवणी सर यांच्या पाठोपाठ होळकर शाहीचा इतिहास उकरून समाजाच्या पुढ्यात मांडण्यासाठीच जणू काय रामभाऊंनी शपथ घेतलेली असावी. शिवाय धनगर आरक्षण चळवळीमध्ये देखील आदरणीय रामभाऊ लांडे यांचे मोलाचे योगदान आहे. सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा असो अथवा समाजावर जिथे कुठे अन्याय होत असेल तर रामभाऊ लांडे साहेब तिथे पोहचून शहानिशा करत असतात व समाजावर, समाजातील माता-भगिनींवरती होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडतात. प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेल्या या परखड व्यक्तिमत्त्वाबद्दल अर्थातच कोहिनूर हिऱ्याबद्दल मी लिहावे तेवढे कमीच आहे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समाजबांधवांना निस्वार्थीपणाने समाजासाठी लढणाऱ्या, झटणाऱ्या आणि झगडणाऱ्या या कोहिनूर हिऱ्याची चांगलीच पारख आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस त्या निमीत्ताने त्यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 8 September 2018

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते? :नितीनराजे अनुसे

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते?
                       लेखन :- ✍️नितीनराजे अनुसे
     काल परवाच्या वर्तमानपत्रात मला वाचायला मिळाले की ५ सप्टेंबर रोजी जो शिक्षकदिन देशभर साजरा झाला त्यामध्ये शिक्षकांनी सरकारकडे संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. खरंतर भारत देशाव्यतीरिक्त अन्य काही देशांमध्ये गुरूंना (शिक्षकांना) सर्व क्षेत्रात व्ही आय पी दर्जा दिला जातो  परंतु त्याउलट भारतातील शिक्षकांना संरक्षण मिळावे अशी मागणी का करावी लागली? याचा विचार करत असतानाच गुलामांचा मुक्तिदाता म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे असे अमेरिकेचे ख्यातनाम माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक राष्ट्राध्यक्ष नव्हे तर एका वडिलांच्या नात्याने लिहलेले पत्र मला आठवले आणि त्यातील उपदेशात्मक शब्द आजच्या काळात उचित ठरणारे आहेत. ते पुढीलप्रमाणे...
        "अजून त्याला खूप शिकायचे आहे. प्रत्येक माणूस प्रामाणिक आणि सत्यवचनी असू शकत नाही हे मी जाणतो; पण शक्य असेल तर, पुस्तकांमध्ये किती जादू असते हे त्याच्या लक्षात आणून द्या. तसेच, निसर्गाच्या अनाकलनीयतेबद्दल विचार करायला त्याला वेळ द्या. पक्षी कसे उडतात, सूर्यप्रकाशात मधमाशा कशा गुणगुणतात आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरावर फुले कशी फुलतात, याचा विचार करायला त्याला प्रवृत्त करा. दुसऱ्याची फसवणूक करून, लबाडी करून यश मिळवण्यापेक्षा अपयशी झालेले चांगले, हे त्याला शिकवा. त्याचे विचार सगळ्या जगाने जरी मान्य केले, तरीही त्याला मनापासून काय वाटते यावरच विश्वास ठेवायला त्याने शिकलेच पाहिजे. सभ्य माणसांशी सभ्यतेने वागायचे आणि असभ्य माणसांशी कठोरपणे वागायचे, हे त्याला शिकवा. सामान्य लोकांच्या कळपात मेंढरासारखे न राहता, त्या गर्दीपासून वेगळा एकटेपणाने तो ताठ उभा राहू शकेल, एवढा त्याला कणखर बनवा. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायचे; पण त्यातले जे म्हणणे सत्याच्या कसोटीवर उतरणारे आणि योग्य असेल, तेच स्विकारायचे हे त्याला शिकवा.
         समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा हसतमुखाने सामना करायचा आणि डोळ्यातून आपसूकच ओघळणाऱ्या अश्रूंची शरम बाळगायची नाही, हे त्याला शिकवा. तऱ्हेवाईक माणसांशी जशास तसे वागायला आणि साखरपेरणी करत बोललेल्या शब्दांपासून सावध राहायला त्याला शिकवा. त्याचे सामर्थ्य आणि त्याची बुद्धी त्याला त्याने महत्त्वाचे स्थान दिलेच पाहिजे; पण कुठल्याही परिस्थितीत त्याने आपले मन आणि आत्मा यांची फसवणूक करता कामा नये. स्वतःचे म्हणणे, वागणे बरोबर आहे याची त्याला खात्री असेल, तर त्याविरुद्ध उठवल्या जाणाऱ्या गदारोळाकडे त्याने दुर्लक्ष करायला हवे, हे त्याला समजावून सांगा. त्याच्याशी हळूवारपणे वागा; पण त्याला अवाजवी संरक्षण देऊ नका; कारण फक्त दु:खात आणि कठीण प्रसंगातच माणसातले उत्तम गुण झळाळून उठू शकतात.
       त्याला इतका धीट, निर्भय बनवा की, प्रसंगी तो त्याचा आवाज उठवू शकेल आणि स्वतःची मर्दुमकी गाजवण्यासाठी निश्चयपूर्वक  प्रयत्न करेल. त्याला हेही शिकवा की, त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, म्हणजे 'माणुसकी'वर तो विश्वास ठेवेल.
       माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्या खूप आकांक्षा आहेत, त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या बाबतीत तुम्ही मला काय मदत करू शकता, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे.
      माझा मुलगा हा एक गोड आणि उत्तम मुलगा आहे, यात शंकाच नाही."
                     -अब्राहम लिंकन
         कधीकाळी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुसेवाडी (निंबवडे) ता.आटपाडी जि.सांगली या शाळेत असताना गुरूजींनी भिंतीवर टांगलेल्या भल्यामोठ्या चार चार्टवरतीचं हे अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहलेले पत्र आणि त्यावरची अक्षरे आज नकळतपणे आठवली. एक पालक अर्थातच वडील या नात्याने राष्ट्राध्यक्ष असताना अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना उपदेश केला होता. मात्र  दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या, गावोगावी भटकंती करणाऱ्या आमच्या आई-वडिलांनी खरंतर शाळेचे तोंड कधीच पाहिले नव्हते अथवा अशाप्रकारचे पत्र त्यांना कोणी ऐकवले नव्हते तरीही त्यांचा शाळेतील गुरूजींवरती/मुख्याध्यापकांवरती एवढा विश्वास होता की गुरूजीच आपल्या पाल्याला उत्तम ज्ञान देऊ शकतात जे आपल्या पाल्याला व्यवहारीक जीवनात उपयोगी पडेल. त्या काळात जर पाल्याने अर्थातच मुलाने/मुलीने घरी अथवा इतरत्र कुठेही आणि काहीही चूक केली, बेशिस्तपणे वागला/वागली तर पालक स्वतःहून शाळेत येऊन गुरूजींकडे तक्रार करून त्या पाल्याला शिक्षा द्यायला सांगत होते. शिक्षकांनी शिक्षा दिल्यानंतर पाल्य पुन्हा तशी चूक करणे अथवा बेशिस्तपणे वागणे शक्यच नव्हते  कारण त्या काळात शिक्षकांना(गुरूजींना) पालकांचा पाठिंबा होता आणि त्यातूनच शिस्तबद्ध विद्यार्थी घडत होते. परंतु त्या तुलनेत आजच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत काही बदल झाल्याची जाणीव न कळतपणे होऊन जाते. आजकाल जर शिक्षकांनी (सरांनी) जर विद्यार्थ्यांना केलेल्या चुकीबद्दल शिक्षा दिली अथवा अभ्यासासंदर्भात विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकावे म्हणून शिक्षा दिली तर तो विद्यार्थी पालकांकडे तक्रार करतो आणि पाल्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांला का शिक्षा केली असा जाब विचारला जातो. शिवाय कधीकधी 'आमचा मुलगा शिकू अथवा न शिकू तुम्हाला पगार मिळतोय ना? कमी तर होत नाही ना? पुन्हा जर आमच्या मुलाल/मुलीला हात लावाल तर बघा? अशी धमकी देखील दिली जाते तेव्हा शिक्षक हा नावासाठीच 'गुरू' म्हणून शिल्लक राहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कारण आजच्या पालकांचा जर शिक्षकांना पाठिंबा नसेल आणि स्वतःच्या पाल्यांना पाठिंबा असेल तर मग  शिक्षकांनी (गुरूंनी) काय फक्त पगारासाठी नोकऱ्या करायच्या का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात गोंधळ घालून बसलाय...
🙏माझ्या सर्व गुरूजनांना आणि सर्व पालकांना समर्पित🙏
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
https://nitinrajeanuse123.blogspot.com  

Wednesday, 5 September 2018

माझा महाराष्ट्र तरसला... ✍️किर्ती नितीनराजे अनुसे

हा हा म्हणता म्हणता
तु केरळमध्येच बरसला....
        पावसा तुझ्या एका थेंबासाठी
        माझा महाराष्ट्र तरसला,
        माझा महाराष्ट्र तरसला....
नको नको म्हणता म्हणता
तु इथे बेभान होऊन पडला...
पण पाण्यावाचून माझा महाराष्ट्र
तिथे धाय मोकलून रडला...
        असला कसला रे न्याय तुझा
        करितोस उगाचि भेदभाव
        आता तुच सांग पावसा मला
        काय ठेऊ मी तुझे नाव...?
डोकं खूपसून गुडघ्यामध्ये
ढसा-ढसा रडतोय शेतकरी बाप...
मग तूच सांग आता आम्हाला
आमच्याकडून काय झाले रे पाप....
        बरसलास तु इथे असा...
        विस्कळीत केलेस जनजीवन
       मग कसे काय आम्ही म्हणू
       पाणी हेच आहे जीवन....
अवखळ होऊन एकाच ठिकाणी
बरसनं तुझं झालं आहे अति,
एकदा जरा जाऊन बघ माझी शेती
अजूनही कोरडीच आहे तेथील माती....
      भेगाळलंय रान सारं,
      थेंबासाठी तरसून झालंय तप्त...
      तरीही तु घेतली उडी इकडे,
      अन् देवाची नगरी तु केलीस उध्वस्त....
                -किर्ती नितीनराजे अनुसे
                     नितीनराजे अनुसे

Sunday, 2 September 2018

आमखासवरील धनगरांच्या भुकंपाचे दिल्लीला हादरे : नितीनराजे अनुसे


औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ऐतिहासिक मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब.
आमखासवरील धनगरांच्या भूकंपाचे  दिल्लीला हादरे...
                         ✍️नितीनराजे अनुसे
        एकेकाळी महाराष्ट्र राज्याच नव्हे तर अखंड भारत देशभर प्रशासन आणि राजकारभार करणारी अर्थातच राजा समाज असणारी धनगर जमात आज आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहे झटत आहे आणि झगडत आहे. कोणीही उठले की सुटले आंदोलन मोर्चे करायला काही दुधखुळे नाहीत... त्यापाठीमागे प्रचंड तळमळ आणि अन्यायाच्या विरोधातील प्रचंड चीड असते आणि त्याचेच ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथील आमखास मैदानावर एकच वज्रमुठ घेऊन एकवटलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज. धनगरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गेल्या ७० वर्षांपासून या जमातीवर विनाकारण  वारंवार अन्याय व अत्याचार होत राहिला त्यास आजपर्यंतचे राज्य सरकार परस्पर कारणीभूत असून धनगर जमातीला त्यांच्या न्याय व हक्कापासून दूर ठेवणे यासारखा दुसरा मोठा देशद्रोह कोणताच नाही. 
समतेच्या पिवळ्या झेंड्याचे ध्वजारोहण करताना जेष्ठ समाजबांधव बल्लाळ महाराज

        शुक्रवारी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे जो ऐतिहासिक मोर्चा झाला त्या मोर्चाच्या अगोदर उलट-सुलट चर्चा होताना दिसत होत्या कोणी महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तम जानकर साहेब यांना भाजपचे दलाल म्हणून संबोधत होते तर कोणी भाजपची तितरं म्हणून त्यांचा उल्लेख करत होते. असो,  प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा संविधानिक अधिकार आहे. परंतु त्यांच्या आरोपाचे खंडन करण्याची मला काही गरज वाटत नाही कारण ते मोर्चा पाहून अथवा मोर्चामधील भाषण आणि उपस्थित जनसमुदाय यातून त्याचे उत्तर संबंधित समाजबांधवांना मिळालेच असेल. धनगरांचा मोर्चा रोखण्यासाठी राज्यसरकारला प्रशासकीय व्यवस्थेची गरज भासते असे का? मग तिथे रेल्वे विभाग असो, पोलिस सेवा अथवा प्रशासन विभाग असो... त्या विभागात धनगर समाजाची पोरं/पोरी जर IAS/IPS असती तर धनगर समाजाला आंदोलन करायची गरज कधी पडली नसती आणि आंदोलकर्त्यांना रोखायची देखील गरज सरकारला भासली नसती. दुसरा कोणता अभ्यास करत बसता वरील गोष्टीचा आणि घटनेचा अभ्यास त्या (सुज्ञ?) मुख्यमंत्र्यांनी करावा ज्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करायला रेल्वे प्रशासनाला भाग पाडले.
ड्रोन कैमरा द्वारे घेतलेले छायाचित्र
आमखास मैदानावर उपस्थित असलेला विराट धनगर समाज

      खरंतर औरंगाबादच्या आमखास मैदानावर जेवढा धनगर समाज उपस्थित राहिला होता तो एकूण लोकसंख्येच्या १०% देखील नव्हता कारण धनगर समाजातील जवळपास ५०% धनगर जमात आजही शेळ्या-मेंढ्या राखतेय तर ३०% धनगर समाज शेतीवरती अवलंबून आहे, १६-१७% धनगर समाज  छोट्या मोठ्या नोकऱ्या तर ३% धनगर समाज शासकीय नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्रात कार्यरत आहे. कोणत्याही मोर्चात माझा सर्वच मेंढपाळ बांधव सहभागी होऊ शकत नाही तर नोकरदार वर्ग महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार होता परंतु आंदलनाची दाहकता, पार्श्वभूमी तथा आक्रमता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या दळभद्री सरकारने मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक तसेच नागपूर वरुन औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून आंदोलन हानून पाडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी वाटेल त्या कुरघोड्या केल्या. हे आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचे थोतांड देखील त्यांनी माजवले परंतु प्रसतापितांचे ऐकून हार मानतील ते धनगर कसले? मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या बसने, मोटारसायकलवरुन धनगर समाजबांधव औरंगाबाद येथील आमखास मैदानावर पोहचले आणि महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रयत्नाला त्यांच्या तळमळीला यश आले आणि अखेरच्या धनगर आरक्षण लढ्याचा औरंगाबाद येथील आमखास मैदानावरील मोर्चा यशस्वी झाला. त्याबद्दल प्रत्येक स्वाभिमानी धनगर समाजबांधवांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तरीही एवढ्यावरच भागणार नाही तर धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या सवलती जोपर्यंत धनगर समाजाला मिळत नाहीत आणि अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (S T Certificate) जोपर्यंत धनगर समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. तोपर्यंत सरकारला बेजार करून त्यांच्या नाकीनऊ आणून सोडा. महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर जी जमात आहे ती दुसरी तिसरी कोणती धनगड जमात नसून ती फक्त धनगर हीच जमात आहे त्यामुळे लक्षात ठेवा या भारतामध्ये भिक मागून तुम्हाला कधीही काहीच मिळत नाही जर पाहिजेच असेल तर लाथ घालून हिसकावून घ्यायची सवय धनगर समाजाने लावून घेतली पाहिजे. 
महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब

            गेल्या दोन महिन्यांपासून घरदार सोडून गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब अहोरात्र तळमळीने पोटतिडकीने समाजासाठी पायाला भिंगरी लावून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले आणि झगडले प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजबांधवांनी देखील हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून तन मन धनाने मदत केली. धनगर समाजाचं दैवत असलेले आदरणीय आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांच्या ऐवजी मोर्चाला उपस्थित असलेले धनगर समाजातील जेष्ठ व्यक्ति आदरणीय शिवाजी बल्लाळ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाचा मोर्चा पार पडला हे मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणत्याही जाती-धर्माला न दुखवता, कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय मालमत्तेला हानी न पोहचवता अद्भुतरम्य तथा ऐतिहासिक मोर्चा पार पडला याचे श्रेय प्रत्येक धनगर समाजबांधवांना जाते. महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या रूपाने समाजाला खरंतर पुन्हा एक क्रांतीसुर्य मिळाला थोडक्यात सांगायचे झाल्यास युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामध्ये आम्ही क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही जण म्हणत होते की गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तम जानकर साहेब यांना आमदार खासदार व्हायचे असेल म्हणून त्यांना आता समाज आठवला. अरे मग तुम्ही त्यांच्याच भोवती घिरट्या मारुन कशाला भुंकत बसताय, होऊ द्या ना त्यांना आमदार खासदार आणि तुम्ही पण व्हा. या महाराष्ट्र राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत तुम्हाला वाटेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवा सर्व धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे. कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १०० तरी आमदार आणि खासदार धनगर समाजातून विधानसभा आणि संसदभवन मध्ये जायला हवेत. आपल्याच माणसांचे पाय ओढत बसण्यापेक्षा खेकडा प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्याच माणसांना सपोर्ट करा तरच समाजावरील अन्याय व अत्याचार थांबेल.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Thursday, 30 August 2018

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे
       गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती विनाकारण अन्याय व अत्याचार होत आला आहे ते आम्ही निमूटपणे सहन करत आलो पण जातीचा धनगर आता शांत बसणार नाही.  आर नाहीतर पार ही भूमिका घेऊन धनगर समाजातील युवा वर्ग आक्रमकपणे अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने सहभागी होतोय.  धनगर समाजाचा स्वाभिमान जागा झाला असून आता प्रस्थापितांची खैर नाही हे निश्चित आहे.
      आजपर्यंत धनगर समाज हा गटातटात विभागल्याने लढाईला यश आले नाही याला इतिहास देखील साक्ष आहे परंतु उद्या दि.  ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज एकत्रित येणार आहे. कधी काळी शाळेत असताना गुरूजींनी "एकीचे बळ" यावरती एक गोष्ट सांगितलेली आठवते ती गोष्ट आज मुद्दामहून तुम्हा सर्वांना सांगतोय.  "एका आश्रमात गुरू आचार्य त्यांच्या शिष्यांना शिक्षण देत असताना ते पाचही शिष्यांना आश्रमाबाहेर बोलावतात. शिष्य गोंधळून जातात की आज गुरूंनी आपल्याला बाहेर का बोलवलं असावं?  पाचही शिष्य बाहेर आल्यानंतर गुरूवर्य प्रत्येकाच्या हातात एकेक काठी देतात व ती हाताने तोडायला सांगतात.  तेव्हा एकेक करून प्रत्येकजण ती काठी गुडघ्यावर वाकवून तोडून दाखवतात.  तेव्हा शिष्यांना काहीच विशेष वाटत नाही परंतु हे झाल्यावर आता गुरूवर्यांनी एका काठीऐवजी पाच काठ्यांचा गठ्ठा तयार करून पहिल्या शिष्याच्या हातात दिला व तो गठ्ठा तोडायला सांगितले. आता मात्र खरी कसोटी होती. पहिल्या शिष्याने हवे तसे खूप प्रयत्न करून देखिल तो गठ्ठा तुटला नाही.  एवढेच नव्हे तर तो दुसर्या तीसर्या चौथ्या पाचव्या शिष्यांना देखिल तुटला नाही. शेवटी त्यानी गुरूवर्य आचार्यांना विचारले की गुरूजी आम्ही एकेक काठी सहजपणे तोडली पण हा पाच काठ्यांचा गठ्ठा आम्ही खूप प्रयत्न करूनही तुटला नाही असे का? तेव्हा गुरूवर्य आचार्य म्हणाले की तुम्ही जर जीवनात एकटेच लढत बसाल तर तुम्ही त्या एकट्या काठीप्रमाणे तुटून पडाल आणि जर तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन लढाल तर तुम्ही कधीच तुटून जाणार नाही.
       धनगर समाजातील तमाम समाजबांधवांना मला एवढंच सांगायचे आहे की आजपर्यंत आपण वेगवेगळे गटातटात लढत बसलो होतो म्हणुन आपली दखल कोणी घेतली नाही आणि इथून पुढेही घेणार नाहीत. पण उद्याच्या ३१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची एकी दाखवून दिली तर जगातील कोणतीच शक्ति आपल्याला पराभूत करू शकणार नाही ही काळ्या दगडावरील रेखा आहे. एकजुटीचा नेहमी विजय होत असतो एवढी त्यामध्ये असते म्हणून एकीचं बळ महत्वाचं आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच धनगर समाजातील तळागळातील धनगर समाजबांधवांनी उद्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. वेगवेगळ्या चुल्हा मांडून वेगवेगळा संसार मांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित या.  सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारा धनगर समाज कधीच षंढ होणार नाही हे अख्खा जगाला कळू द्या आणि महत्वाचं म्हणजे थंड राहून षंढ राहण्यापेक्षा बंड करून गुंड झालेले अधिक बरे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंराजे!!
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        +918530004123
nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 27 August 2018

...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. :नितीनराजे अनुसे


...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. 
             📝नितीनराजे अनुसे
     केरळमध्ये झालेल्या भयानक नैसर्गिक आपत्तिजनक पूरामुळे सोशल मिडीया (फेसबुक/व्हाटसएप) पासून मी काही काळ दूर होतो. त्यामुळे खूप दिवसानंतर समाजकार्याच्या प्रवाहात पुन्हा त्याच तळमळीने, त्याच जिद्दीने, त्याच तडफडतेने तुमच्याशी संवाद साधतोय. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा आज महाराष्ट्र राज्यभर चांगलाच तापलाय, त्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज देखील पेटुन उठलाय. प्रत्येक समाजबांधव स्वताला या अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने झोकून देतोय ते फक्त उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच...
       धनगर समाजाने या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ हजारो वर्ष राज्यकारभार केला त्या धनगर समाजाच्या डोक्यावर प्रस्थापित राजकीय नेत्यांनी गेल्या ७० वर्षापासून अन्यायाची तलवार सदैव टांगतीच ठेवली आहे. म्हणजेच गेल्या ७० वर्षापासून त्या प्रस्थापित औलादींचा नंगानाच चालू असताना हा समाज निमूटपणे सहन करत होता पण आता ते शक्य नाही. धनगर समाजाच्या सहनशीलतेचा आता अंत झाला असून धनगर समाजातील युवा वर्ग आता पेटून उठला आहे आणि अन्याय करणार्या प्रस्थापित औलादींना पेटवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असे चित्र आज महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतेय. विश्वरूपी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीचा, धनगर जमातीच्या संस्कृतिचा, देवदेवतांचा,  राहणीमानाचा,  अभ्यास करूनच धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये सामाविष्ट केले होते तरीदेखील ७० वर्ष उलटली तरी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू केल्या नाहीत एवढा प्रचंड मोठा अन्याय धनगर जमातीव्यतिरीक्त इतर कोणत्याही जातीजमातीवर झाला नाही त्याचे कारण म्हणजे धनगर समाजाचे शैक्षणिक मागासलेपण होय. सर्वप्रथम १९८९ मध्ये  क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांनी धनगर आरक्षण चळवळीला जन्म दिला त्यानंतर हळूहळू ही चळवळ फोफावत गेली परंतु स्व बी के कोकरे साहेब आपल्यात असते तर धनगर समाजाला एवढा संघर्ष करावा लागलाच नसता.
       संसदीय वाद-विवाद राज्यसभा प्रतिवेदन दि २२ डिसेंबर  १९८९ हे भारत सरकार मार्फत प्रसिद्ध होणारे राज्यसभेचे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेलच की राज्यसभेमध्ये खा. सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन  राज्यसभेचे  सभापति महोदय  रामविलास पासवान  यांनी सुद्धा कबूल केले होते की राज्यघटनेत  महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये  अ. क्र. ३६ वरती नमूद केलेली जमात ही धांगर अथवा धनगड नसून ती धनगर अशी आहे. महाराष्ट्र राज्यातील संबंधित धनगर समाजाला राज्यघटनेनूसार अनुसूचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात त्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारला तसे शिफारस पत्र पाठवायला हवे.  याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार दि १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार दि १९ मार्च २००१ त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व शासकीय राजपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये अ. क्र. ३६ वरती ओरॉन, धनगर असा स्पष्ट आणि शुद्ध उल्लेख आहे. परंतु आदिवासी विकास संस्था आणि आदिवासी मंत्रालय सांगते की  तो उल्लेख धनगड असा आहे आणि धनगड ही जमात आजही महाराष्ट्र राज्यात आहे. तर बुद्धि पाजळणारे पुण्यातील काही प्राध्यापक बरळतात की "धनगड जमात महाराष्ट्र राज्यात नसून नमूद केलेली जमात ही धनगर हीच आहे" हा धनगर समाजाचा दावा चुकीचा आहे. पुढे तेच दिडशहाणे स्पष्टीकरण देताना म्हणतात की पूर्वी महाराष्ट्र राज्यात धनगड ही जमात होती ती १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याचे विभाजन झाल्याने ती जमात मध्य प्रदेश मध्ये गेली त्यामुळे महाराष्ट्र राज्यात धनगड जमात सापडत नाही. मग त्या प्राध्यापकांनी आदिवासी विकास संस्थेचा अहवाल वाचला आहे का नाही कोणास ठाऊक ज्यांच्या रेकॉर्डनूसार एका व्यक्तिपासून १० वर्षात ७० हजाराच्या वरती धनगड जमात तयार होते हे काय गौडबंगाल आहे?  ही कोणती प्रजनन क्षमता असलेली जमात आहे.  बर १९६० साली जर धनगड जमात मध्यप्रदेशात गेली तर मग १९९६,  २००१, २००७-०८,  २००९-१० या शासकीय राजपत्रांमध्ये ओरॉन, धनगर हा उल्लेख कसा काय येतोय?   सरकार काय भांग पिऊन राज्यकारभार करतंय का? की त्या त्या विभागाचे सचिव दुधखुळे आहेत? जर खरंच धनगड ही जमात मध्य प्रदेशात गेली असेल अथवा नामशेष झाली असेल तर मग महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जो काही कोट्यवधींचा शैक्षणिक, सामाजिक विकास निधी येतोय त्यामध्ये धनगर/धनगड जमातीसाठी सुद्धा निधी येत असेल तर मग गेल्या ७० वर्षापासून त्या  धनगर/धनगड जमातीच्या निधीचे नक्की काय झाले?  कोणाच्या घशात तो निधी गेला?  गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत आदिवासी विकास मंत्रालय विभागातील सर्व आजी/माजी मंत्र्यांची आणि आयुक्तांची यादी काढून त्यांना जाब विचारला तर सत्य बाहेर पडेल. आणि जर खरंच धनगड जमात महाराष्ट्र राज्यात असेल तर धनगर समाज आपली मागणी माघारी घेईल नसेल तर संबंधित आदिवासी विकास संस्था, आदिवासी विकास मंत्रालय आणि धनगर समाजाची फसवणूक करणार्या आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला धनगर समाजाच्या वतीने दाखल करण्यात येईल. कारण थोर समाजसुधारक अब्राहम लिंकन म्हणतात की लोकांनी लोकांच्या हीतासाठी, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.  मग लोकशाहीत एखाद्या जमातीवर वर्षानुवर्ष विनाकारण अन्याय अत्याचार होत असेल,  एखाद्या जमातीला ७० वर्ष न्याय मिळत नसेल तर त्या त्या राज्याचा प्रतिनिधि त्यासाठी जबाबदार ठरतो. म्हणुन आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा.
         गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा अखेरचा लढा युवकह्रदय सम्राट मा गोपीचंद पडळकर साहेब व मा. उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चालू आहे. त्याला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून धनगर समाजाचा, युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज आता अन्यायाच्या विरोधात पेटून उठला असून सर्व समाजबांधवांनी समज गैरसमज, राजकीय/सामाजिक मतभेद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे. कोणी म्हणतील त्यांना आमदार खासदार बनायचं आहे म्हणून हा उद्योग चालू आहे तर मग होऊ द्या ना... दोन कोटी धनगर समाजातून कमीत कमी १०० आमदार तरी होऊद्या त्यात हे दोघे झाले तर काय बिघडेल? तुम्ही पण आमदार व्हा खासदार व्हा परंतु अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी रस्त्यावर उतरा. ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा आणि महत्वाचं म्हणजे तोंड वाजवूून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंराजे
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
          +918530004123
   nitinrajeanuse123@gmail.com